हरिनामाच्या गजरात रोटी घाट पार; तुकोबांचा पालखी सोहळा बारामतीत दाखल

हरिनामाच्या गजरात रोटी घाट पार; तुकोबांचा पालखी सोहळा बारामतीत दाखल

>> अमोल होले, पाटस

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा वरवंड येथील मंगळवारचा मुक्काम आटोपून भक्तिमय वातावरणात रोटी घाट सर करत बारामती तालुक्यातील उंडवडीच्या दिशेने आज मार्गस्थ झाली. संध्याकाळच्या पाचच्या सुमारास पालखी सोहळ्याने विठुनामाच्या जयघोषात दौंड तालुक्याचा निरोप घेऊन बारामती तालुक्यात दाखल झाला.

तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील देहू ते पंढरपूर प्रवासामधील पहिला घाट म्हणून रोटी घाटाची ओळख आहे. पाटसपासून काहीच अंतरावर असलेल्या रोटी घाटामध्ये तुकोबांच्या पालखीने सहा बैलजोड्यांच्या साहाय्याने घाट पार केला. रोटी घाटामध्ये रोटीच्या ग्रामस्थांकडून पालखीमधील तुकोबांच्या पादुकांची पूजा आणि आरती करण्यात आली.

तुकोबांच्या पालखी सोहळ्याचा मंगळवारी (दि. २४) वरंवड येथे मुक्काम होता. आज सकाळी सातच्या सुमारास हरिनामाच्या गजरात वरवंडचा निरोप घेऊन पालखी पाटसकडे मार्गस्थ झाली. पालखीचा दुपारचा विसावा आणि भोजन पाटस गावात असल्याने सकाळी नऊच्या सुमारास हा पालखी सोहळा पाटसमध्ये दाखल झाला. यावेळी सरपंच तृप्ती भंडलकर, उपसरपंच आदी मान्यवरांसह ग्रामस्थांनी वैष्णवजनांचे उत्साहात स्वागत केले.

पालखी पाटसच्या ग्रामदैवत नागेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि विसाव्यासाठी ठेवण्यात आली होती. यावेळी पाटस आणि पंचक्रोशीतील हजारो भाविकांनी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे आणि अश्वाचे दर्शन घेतले.

विसाव्यावेळी दिंड्यादिंड्यांमधून भजन, कीर्तनाचे सूर उमटत होते. दरम्यान, यावेळी पाटसमधील अनेक भाविक, सामाजिक संस्था व संघटनांच्या वतीने वारकर्‍यांना चहा, पोहे, पाणी बाटली, केळी यांचे वाटप केले. तसेच वरवंड आरोग्य केंद्राच्या पथकाने वारकर्‍यांची आरोग्य तपासणी केली. याचा अनेक वारकर्‍यांनी लाभ घेतला. दुपारचे भोजन आणि विसावा घेऊन पालखी आणि वारकर्‍यांनी रोटीकडे वाटचाल केली.

संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा रोटी घाटात दुपारी साडेबाराच्या सुमारास दाखल झाला. रोटी घाटातील पालखी रथाचे अभूतपूर्व चित्र पाहण्यासाठी अनेकांनी उंच ठिकाणी जाऊन हजेरी लावली होती. पालखी रथाला अधिकच्या सहा बैलजोड्या जुंपून रोटी घाट पार करण्यात आला. रोटी घाटामध्ये ठिकठिकाणी विसाव्यासाठी पालखी रथ थांबवण्यात आला होता. रोटी, िंहगणीगाडा, वसुंदे येथील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे मोठ्या भक्तिभावाने उत्साहात स्वागत करत दर्शन घेतले.

दरवर्षीप्रमाणे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक दुपारी एक वाजेपर्यंत बंद करण्यात आली होती. तसेच प्रशासनाने योग्य नियोजन केले होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्येष्ठांमध्ये डिमेन्शिया आजार बळावण्याचा धोका वाढला! आजार नियंत्रित ठेवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक ज्येष्ठांमध्ये डिमेन्शिया आजार बळावण्याचा धोका वाढला! आजार नियंत्रित ठेवण्यासाठी मानसिक आणि शारीरिक आरोग्याचे योग्य व्यवस्थापन आवश्यक
एकलकोंडेपणा, मोबाईल, टीव्हीसारख्या माध्यमांवर तासन्तास वेळ घालणे, शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे सध्या ज्येष्ठांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘डिमेन्शिया’ आजाराचा धोका वाढत आहे....
Chandrapur news – आयकर विभागाचा अजब कारभार, हातावर पोट असणाऱ्या तरुणाला धाडली 15 कोटींची नोटीस
हिंदी सक्ती केल्यास मातृभाषा बाजूला पडेल, शरद पवार यांचे मत
तुमच्याही बाथरुममधून वारंवार गोम येते का? मग हे उपाय नक्की करुन बघा
ही सत्तेची मुजोरी कुणा मुळे? बबनराव लोणीकरांच्या विधानावरून जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
टीम इंडियाचा संक्रमण काळ सुरू, थोडा वेळ द्या! किरण मोरे यांनी केली ‘गिल’सेनेची पाठराखण
Home Cleaning Tips – घराची साफसफाई करताना या चुका अजिबात करु नका