शेवगाव तालुक्यात खरीपाच्या 42 टक्के पेरणी पूर्ण
शेवगाव व परिसरात सध्या पावसाने विश्रांती घेतल्याने खरीप पेरण्यांना वेग आला असून, तालुक्यात आज अखेर सुमारे ३६ हजार ४४० हेक्टर क्षेत्रात उद्दिष्ट क्षेत्राच्या ४२ टक्के खरीप पेरण्या झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयातून देण्यात आली. तालुक्यात यंदा तुरी, उडदाच्या क्षेत्रात वाढ होण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे.
गेल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा तालुक्यात मे महिन्यात प्रथमच बिगर मोसमी पावसाने हजेरी लावली. मे महिन्यात तालुक्यात जवळपास १७७ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, जून महिन्यात आजअखेर ६२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील जवळपास सर्वच मंडळांत पाऊस झाला असून, बोधेगाव व चापडगाव मंडळांत अजूनही कमी पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आजअखेर २७ हजार ९९७ हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली असून, तूर ४८६२ हेक्टर, उडीद १ हजार ५१६ हेक्टर, सोयाबीन ६०९ हेक्टर, मूग ४९५ हेक्टर, बाजरी ६३७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, तालुक्यात उद्दिष्ट क्षेत्राच्या ४२ टक्के खरीप पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यंदाच्या खरिपासाठी तालुक्यात ६६ हजार ६६० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, त्यात ४२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात कापूस, १२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रात तूर, ३ हजार ८५० हेक्टर क्षेत्रात उडीद, ३०५० हेक्टर क्षेत्रात सोयाबीन, तर ७५० हेक्टर क्षेत्रात मुगाचे पीक प्रस्तावित आहे.
शेवगाव तालुक्याच्या विविध भागांत ११ आणि १२ जून रोजी वादळी पावसाने थैमान घातले. त्यात दहिफळ येथील मीराबाई अशोक भोसले ही ५७ वर्षांची महिला बैलगाडीतून आपल्या नातवांसमवेत घराकडे निघाल्या असताना, त्यांच्या बैलगाडीवर झाड पडले. यामध्ये महिलेचा मृत्यू झाला, तर ओंकार (वय १६) व विराज (वय १३) त्यांचे दोन नातू जखमी झाले. वादळी वार्याचा तालुक्यातील दहिगावने, दहिफळ रांजणी, भावी निमगाव, मठाची वाडी, शहर टाकळी, मजले शहर, भायगाव, एरंडगाव, लाखेफळ, भातकुडगाव, बोडखे, ताजनापूर, खुंटेफळ, ढोरजळगावने, बक्तरपूर, सुलतानपूर, खामिंपपरी, खडके मडके, गदेवाडी अशा जवळपास २३ गावांना फटका बसला. शेतकरी नागरिकांची राहती घरे, शेती, वस्तीवरील शेडचे पत्रे तसेच शेतकर्यांच्या विविध पिकांचे व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार मोनिका राजळे व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी स्वतंत्ररीत्या अनेक गावांना भेटी देऊन नुकसानीची माहिती घेऊन जिल्हा व तालुका प्रशासनाकडे नुकसानीचा अहवाल तातडीने वरिष्ठ स्तरावर सादर करण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या. त्यानुसार शेतकर्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून त्याचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला असून, आता नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासन व प्रशासनाकडून नुकसानभरपाई मिळण्याची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
एकंदरीत तालुक्यात कधी नव्हे तो मे महिन्यात व त्यानंतर यंदाच्या जून महिन्यात काही प्रमाणात पावसाचे आगमन झाल्याने शेतकर्यांची खरीप पेरण्यांसाठी लगबग वाढली आहे. तालुक्यात आजअखेर खरिपाच्या उद्दिष्ट क्षेत्राच्या जवळपास ४२ टक्के पेरण्या झाल्या असून, उर्वरित पेरण्या येत्या आठ-दहा दिवसांत पूर्ण होऊन पिकांच्या दमदार वाढीसाठी शेतकर्यांचे लक्ष पावसाकडे लागून राहिले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List