मुश्रीफांची सत्ता नावालाच; जिल्ह्याची आर्थिक नाडी भाजपच्या हाती
शीतल धनवडे, कोल्हापूर
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मंत्री हसन मुश्रीफ पुत्र नविद मुश्रीफ यांची अध्यक्षपदी निवड झाली. या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या संस्थांमुळे जिल्ह्याची आर्थिक नाडी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हाती आली असली तरी, गोकुळच्या इतिहासात आतापर्यंत प्रथमच ज्याप्रकारे महायुतीने शिरकाव केला. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी ज्यापद्धतीने सुत्रे हलवली, तसेच मंत्री मुश्रीफ यांच्याबाबत ईडीच्या कारवाईची पार्श्वभूमी पाहता, जिल्ह्यात खोलपर्यंत रुजलेल्या या सहकारी संस्थांच्या नाड्या मात्र महायुतीच्या विशेषतः मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या हातात ठेवल्याचे चित्र आहे. नवीद मुश्रीफ यांची झालेली ही निवड आपल्यासाठी हतबलता असल्याची खंत व्यक्त करत, यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मार्गदर्शन केल्याची हसन मुश्रीफ यांनी दिलेल्या कबुलीतूनच हे स्पष्ट होत आहे.
साहजिकच केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा आणि राज्यातील सत्तेच्या जोरावर यातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या राजकीय सत्तेचे इप्सित भाजपकडून साधले जात असून, मुश्रीफ यांच्या मजबुरीचा पुरेपूर वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. यानिमित्ताने अत्यंत चांगल्या पद्धतीने चाललेल्या या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोकुळ दूध संघातही महायुतीचा मिठाचा खडा पडला असून, हा संघच आता नासवण्यास सुरुवात झाल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जाऊ लागले आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) ची जिल्ह्यात खोलवर पाळेमुळे रुजली आहेत. गेल्या पंचवीस वर्षांहून अधिक काळ हसन मुश्रीफ यांचे जिल्हा बँकेवर वर्चस्व आहे. सध्या दररोज १८ ते २० लाख लिटर दूध संकलन आणि वार्षिक साडेतीन ते चार हजार कोटींपर्यंत उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघात सत्तांतर करून, त्यांनी वर्चस्व ठेवले आहे. जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत नेहमीच केडीसीसी आणि गोकुळ दूध संघाच्या सत्तेचा
वापर झाला आहे. एकवेळ आमदारकी, खासदारकी नको; पण ‘गोकुळ’चा संचालक होण्यासाठी धडपडणाऱ्या या दूध संघात माजी आमदार महादेव महाडिक, पी. एन. पाटील तसेच अरुण नरके यांच्या नेतृत्वाखाली असलेली २५ वर्षांची सत्ता उलथवून मंत्री मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, मंत्री प्रकाश आबोटकर, आमदार विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीची सत्ता आली. पहिली दोन वर्षे सतेज पाटील समर्थक विश्वास पाटील अध्यक्ष झाले. त्यानंतर मुश्रीफ समर्थक अरुण डोंगळे अध्यक्ष झाले. ‘गोकुळ’च्या आजपर्यंतच्या इतिहासात अध्यक्ष निवडीत कधीही राज्य नेतृत्वाने सहभाग घेतला नव्हता. पण भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी महायुतीचाच अध्यक्ष होईल, अशी प्रतिक्रिया देत, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा तसेच राज्यातील सत्तेच्या जोरावर भाजपकडून गोकुळ संस्था ताब्यात घेण्याची हालचाल स्पष्ट केली. यानंतरअरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास स्पष्टपणे नकार देत, महायुतीचा अध्यक्ष करण्याची भूमिका स्पष्ट केली.
जिल्ह्यातील राजकीय नेत्यांकडून ‘गोकूळ’ चे राजकारण चालत असल्याने, यामध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप करू नये, अशी विनंती वजा मागणी मुश्रीफ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे नंतर पुढे आले. मिंधे गटाचे अजित नरके यांनी डोंगळे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून, स्वतःला अध्यक्षपद मिळवण्यासाठी मुंबईतून जोरदार फिल्डिंग लावली. येथेही सत्तांतरासाठी गुवाहाटीप्रमाणे जोडण्या व वाटाघाटी होऊ लागल्याचे दिसून येत होते. त्यात ज्यांनी गोकुळ दूध संघ स्थापन केला, त्या दिवंगत आनंद पाटील यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले. त्यामुळे महायुतीचा हस्तक्षेप थांबल्याचेही वातावरण निर्माण झाले. पाटील यांची निवड घोषित करण्याची औपचारिकता शिल्लक होती. पण रातोरात चक्रे फिरली आणि राजकीय नाट्यमय घडामोडीत नवीद मुश्रीफ यांचे नाव बंद लिफाफ्यात पुढे आले. गोकुळ दूध संघात पहिल्यांदाच संचालक म्हणून आलेल्या आणि वयाने सर्व संचालकांमध्ये लहान असलेल्या नवीद यांच्या या निवडीने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.
जिल्ह्याचे मोठे राजकीय नेतृत्व असलेले मंत्री मुश्रीफ हे भाजपच्या किरीट सोमय्यांमुळे ईडी कारवाईच्या गोत्यात सापडले होते. राज्याच्या सत्तेत अजित पवार हेसुद्धा भाजप आणि मिंधेंच्या मांडीला मांडी लावून बसले. मुश्रीफही तिकडे गेल्याने त्यांच्यावरील ईडीच्या कारवाईचा तिढा सैल झाला आहे. ‘गोकुळ’मध्ये नवीद मुश्रीफ यांची वर्णी भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. महायुतीच्या नावाखाली जिल्ह्याच्या आर्थिक नाड्या व सत्तेची मोट भाजपच्या हातात ठेवण्यासह गेल्या वीस वर्षांपासूनचा मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा राजकीय दोस्ताना तसेच जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील वर्चस्व संपविण्याचा हा प्रकार दिसून येत आहे. जिल्ह्यातील महाविकास आघाडीचे महत्त्वाचे नेते व काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांना एकाकी पाडण्याची भाजपची राजकीय खेळी अधोरेखित होत आहे.
एकीकडे ‘गोकुळ’चे अध्यक्ष हे महायुतीचेच असल्याचा पुनरुच्चार खासदार धनंजय महाडिक करत आहेत. नवीद मुश्रीफ यांना आपण राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी म्हणून अध्यक्ष असल्याचे सांगावे लागत आहे. आमदार सतेज पाटील हे ‘गोकुळ’च्या या अध्यक्षपद निवडीत राज्यस्तरीय हस्तक्षेप झाला नसल्याचे सांगत आहेत. त्याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनामुळे ही निवड झाल्याचे मुश्रीफ सांगत आहेत. मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची राजकीय कोंडी करून, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर वर्चस्व निर्माण करण्याचा भाजपचा हा डाव असल्याचे दिसून येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List