Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांना लिहिता वाचता येत असेल तर त्यांनी… संजय राऊत यांचा खोचक टोला काय?
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झाले. राऊत हे तुरुंगात असतानाच्या काही दिवसांचे अनुभव आणि त्यांचे विचार त्यांनी या पुस्ताकत लिहीले असून अनेक गौप्यस्फोटही करण्यात आले आहेत. प्रकाशनापूर्वीपासूनच राऊतांचं हे पुस्तक चर्चेत असून त्यांनी ते राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांनाही वाचण्यासाठी पाठवलं होतं. मात्र त्यासोबतच त्यांनी एक पत्रही धाडलं होतं. आज माध्यमाशी संवाद साधतानाच राऊतांना त्या पुस्तकावरून आणि पत्रावरूनच एक सवाल विचारण्यात आला होता. त्यावेळी उत्तर देतानाच राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सणसणीत टोला लगावला आहे. ” एकनाथ शिंदेंनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. वाचायलाच पाहिजे. त्यांना व्यवस्थित लिहिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे या पुस्तकाचा गाभा समजून घेतला पाहिजे” अशा शब्दांत राऊतांनी एकनआथ शिंदेवर हल्ला चढवला.
काय म्हणाले संजय राऊत ?
भाजप पुरस्कृत ज्या यंत्रणा आहेत, ज्यांनी राजकारणात दहशतवाद, दबाव अशा प्रकारचं काम करून नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पक्षाला मदत होईल अशा पद्धतीने कारवाया केल्या. सर्वाधिक नव्हे तर १०० टक्के कारवाया भाजप विरोधकांवर करून त्यांच्या मदतीने विरोधकांचे पक्ष फोडले. आमदार खासदार फोडले. सरकारं पाडलं. तरीही या देशात आमच्यासारखे लोक आहेत, जे या दहशतीला बळी पडले नाहीत. स्वाभिमानाने तेव्हाही जगले आणि आजही जगतात. आणि निष्ठेने आम्ही आमच्या पक्षा सोबत आहोत. अशा पद्धतीने संघर्ष करूनही आपल्याला उभं राहता येतं. हेच या पुस्तकातून सांगितलं, त्याचं प्रयोजन तेच आहे असं राऊत म्हणालेत.
जुल्मी राज्यव्यवस्थेचे ते सूत्रधार – फडणवीस , मोदी, शहांना टोला
जुलमी राज्य व्यवस्था आपली सत्ता टिकवण्यासाठी आपल्यासमोरचं आव्हान लोकशाही मार्गाने जेव्हा संपवता येत नाही, तेव्हा सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर करून आपल्या विरोधकांना खतम करणं आणि त्यासाठी ईडी,सीबीआय इन्कम टॅक्स आणि पोलीस यांचं राज्य निर्माण करतात. त्यांना घाबरून काही लोक पळून जातात. पण काही लोक हा दबाव स्वीकारत नाहीत. त्यातूनच हे पुस्तक निर्माण झालं. हे पुस्तक वाचावं. हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनी वाचावं. त्यांनी हे पुस्तक यासाठी वाचावं की त्यांनी यंत्रणांचा गैरवापर केला. जुल्मी राज्यव्यवस्थेचे ते सूत्रधार आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जुल्मी राज्यव्यवस्थेचे सूत्रधार आहेत, त्यांनीही हे पुस्तक वाचलं पाहिजे, अशी टीका राऊतांनी केली.
एकनाथ शिंदेंना लिहीता वाचता येत असेल तर…
एकनाथ शिंदेंनीदेखील हे पुस्तक वाचलं पाहिजे, वाचायलाच पाहिजे. त्यांना व्यवस्थित लिहिता वाचता येत असेल तर त्यांनी शांतपणे या पुस्तकाचा गाभा समजून घेतला पाहिजे असा टोला राऊतांनी हाणला. बराच काळ ते आमचे सहकारी होते. विशेषत: जेव्हा त्यांचा भाजपात पळून जाण्याचा मार्ग निर्माण झाला त्याच्या आधी आणि साधारण त्या काळात ते माझ्यासोबत होते. माझ्या बाबत काय चाललंय याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यामुळे त्या पत्रात मी म्हटलंय या घटनांचे तुम्ही साक्षीदार आहात. त्यामुळे तुम्ही पुस्तक वाचलं पाहिजे, असंही राऊत म्हणाले.
अनेक गोपनीय गोष्टीचा गौप्यस्फोट करावा लागेल. ते नैतिकतेला धरून नाही. स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे. ज्या गोष्टी गोपनीय आहेत असं मानतो त्यावर लिहिणं आणि प्रकाश टाकणं हे नैतिकतेला धरून नाही. आपण विश्वासाने काही गोष्टी चर्चा करतो, किंवा कोणी काही सांगतो नंतर त्याचा आपल्या प्रसिद्धीसाठी गैरवापर करणं, खळबळ किंवा सनसनाटी माजवण्यासाठी मला ते पटत नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
जे ताठ मानेने उभे राहिले त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक
राज ठाकरेंनी हे पुस्तक वाचलं पाहिजे, असंही राऊतांनी आवर्जून नमूद केलं. ” राज ठाकरे उत्तम वाचक आहेत. स्वत: राज ठाकरे यांच्यावर आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरही ईडी, सीबीआयचा फास आवळला होता. त्यातून ते बाहेर पडले. किणी प्रकरणात त्यांना सीबीआयने अडकवण्याचा प्रयत्न केला होता. एक प्रकरण घडंल होतं. तुम्हाला माहीत असेल. आता व्यवहारा संदर्भात ईडीने त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सहकाऱ्यांनाही. त्या प्रत्येकाने पुस्तक वाचावं. जे कधी काळी ईडीच्या सहवासात आले, ज्यांनी ईडीना घाबरून काही निर्णय घेतले, शरण गेले किंवा जे ताठ मानेने उभे राहिले त्या प्रत्येकासाठी हे पुस्तक आहे.” असंही राऊतांनी सांगितलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List