लेख – दुसऱ्या पाकिस्तानचा उदय
अमेरिकाधार्जिण्या मोहम्मद युनूस सरकारची धोरणे आणि पावले ही भारतविरोधी असल्याचे एव्हाना लक्षात आले आहे. अलीकडेच तेथे बांगलादेशचे राष्ट्रपिता शेख मुजीबूर रहमान यांचा पुतळा ढाक्यामध्ये पाडण्यात आला. काही दिवसांपूर्वी बांगलादेशच्या राष्ट्रीय चलनावरून त्यांची प्रतिमा हटवण्यात आली होती. या घडामोडींसह इस्लामी कट्टरतावादाचा, जिहादी विचारसरणीचा वाढता वरचष्मा आणि पाकिस्तान-चीनशी वाढती जवळीक ही सारी भारताच्या पूर्व सीमेवर ‘नवीन पाकिस्तान’ उदयास येत असल्याची लक्षणे आहेत.
भारताचा शेजारी देश असणाऱ्या बांगलादेशामध्ये गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घडामोडी नवनवीन वळणे घेत असून यामुळे हा देश एका धोकादायक स्थितीकडे जात आहे. ऑगस्ट 2024मध्ये बांगलादेशच्या, भारताशी अत्यंत सलोख्याचे संबंध असणाऱ्या पंतप्रधान शेख हसीना यांची सत्तेतून हकालपट्टी झाल्यानंतर बांगलादेशात झपाटय़ाने नाटय़मय राजकारण घडले. पण सध्या तेथे घडत असलेल्या घडामोडी या संपूर्ण दक्षिण आशियाच्या स्थैर्याला हादरा देणाऱ्या आहेत. शेख मुजीबूर रहमान यांचा अवमान, इस्लामी कट्टरतावादाचा वाढता वरचष्मा आणि पाकिस्तान-चीनशी वाढती जवळीक ही भारताच्या पूर्व सीमेवर ‘नवीन पाकिस्तान’ उदयास येत असल्याची लक्षणे आहेत.
बांगलादेशची मूळ ओळख बंगाली अस्मिता, धर्मनिरपेक्षता आणि भारतासोबतच्या ऐतिहासिक संबंधांवर आधारित होती. पण सध्या तेथे असणारे मोहम्मद युनूस यांचे सरकार आणि या सरकारमध्ये सहभागी असणारे धार्मिक मूलतत्ववादी विचारांचा पुरस्कार करणारे राजकीय पक्ष यांची राजवट ही बांगलादेशला पुन्हा एकदा कट्टर इस्लामिक राष्ट्राकडे नेत आहे. शेख मुजीबर यांच्या स्मृती पुसून टाकण्याचा योजनाबद्ध प्रयत्न बांगलादेशात सुरू आहे. शिक्षणक्रमात बदल करून झिया-उर-रहमान यांना स्वातंत्र्याचे खरे नायक म्हणून सादर केले जात आहे. मुजीबूर हुसेन यांचा जन्मदिन आणि पुण्यतिथी या दिवसांना सार्वजनिक सुट्टय़ांमधून वगळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय अनेक सरकारी कार्यालयांतील त्यांच्या प्रतिमा हटवण्यात आल्या आहेत.
यासाठी ‘नॅशनल फ्रीडम फायटर्स कौन्सिल ऍक्ट’मध्ये सुधारणा करण्यात आली असून त्यात ‘स्वातंत्र्यसैनिक’ या संज्ञेची व्याख्या नव्याने केली गेली आहे. सुधारित कायद्यात राष्ट्रपिता वंगबंधू शेख मुजीबूर रहमान या शब्दांसह त्यांचा उल्लेख असलेले सर्व भाग हटवण्यात आले आहेत. यासह मुक्ती संग्रामाची व्याख्याही बदलण्यात आली आहे. यापूर्वीच्या व्याख्येमध्ये हे युद्ध शेख मुजीबूर रहमान यांच्या आवाहनानंतर सुरू झाले होते, असा उल्लेख होता. नव्या व्याख्येमध्ये हा उल्लेख गाळण्यात आला आहे. नव्या पाठय़पुस्तकांमध्ये आता झियाउर रहमान यांनी 1971मध्ये स्वातंत्र्य जाहीर केले, असा उल्लेख करण्यात आला आहे. दुसरीकडे हिंदू अल्पसंख्याकांवर हल्ले, मंदिरांची नासधूस आणि सामाजिक बहिष्कार अशा घटनांमध्ये वाढ झाली असून युनूस यांचे अंतरिम सरकारने याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे.
जमात-ए-इस्लामी सक्रिय
बांगलादेशातील कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामी आणि तिची विद्यार्थी शाखा (स्टुडंट विंग) यांना पुन्हा एकदा राजकीय मान्यता मिळाली आहे. बांगलादेश सर्वोच्च न्यायालयाने या दोघांना नवीन नोंदणीची परवानगी दिली असून त्यामुळे त्या देशातील निवडणुकांमध्ये आता ते सहभागी होऊ शकणार आहेत. 2013मध्ये शेख हसीना यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जमात-ए-इस्लामीवर बंदी घातली होती. अर्थात बंदीनंतरही ही संघटना बांगलादेशात अतिशय सक्रिय राहिली होती. त्यांच्यावर प्रामुख्याने हिंदूंवर हल्ले घडवून आणल्याचा आरोप अनेकदा ठेवण्यात आला आहे. जमाते इस्लामीने 1971च्या बांगलादेश मुक्ती संग्रामा दरम्यान पाकिस्तानचा पाठिंबा घेतला होता. पाकिस्तान सरकारच्या आदेशावरून पाकिस्तानी लष्कराने बांगलादेशी नागरिकांवर बलात्कार, हत्या आणि अन्य अत्याचार केले होते. जमात-ए-इस्लामीने त्या वेळी पाकिस्तानी अत्याचारांना समर्थन दिले होते. गेल्या वर्षी मोहम्मद युनूस सरकार सत्तेत आल्यानंतर जमातवरील बंदी हटवण्यात आली होती. आता सर्वोच्च न्यायालयाने त्यांना निवडणूक लढवण्याचा राजकीय दर्जा अधिकृतपणे मंजूर केला आहे. जमात-ए-इस्लामीचा राजकारणात पुनःप्रवेश आणि पाकिस्तान-समर्थक धोरणे यामुळे बांगलादेशात नव्याने अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. बांगलादेशची वाटचाल सांस्कृतिक राष्ट्रवादावर आधारित राष्ट्राकडून इस्लामिक कट्टरतावादाकडे होत आहे. बांगलादेश आपल्या मूळ मूल्यांपासून दूर जात आहे. शेख मुजीबूर रहमान यांची प्रतिमा हटवणे हे या बदलाचे संकेत आहेत.
भारतासाठी हा बदल आव्हानात्मक आहे. विशेषतः बांगलादेशचा सीमापार दहशतवाद आणि तेथून भारतात होणारे बेकायदेशीर स्थलांतर तसेच चीन व पाकिस्तानशी जवळीक साधून भारताविरुद्ध रचली जात असलेली षडयंत्रे याबद्दल चिंता वाढत आहे. या सर्व परिस्थितीत भारताला नव्याने रणनीती आखण्याची गरज आहे.
भारताचे बांगलादेशाशी संबंध भाषिक राष्ट्रवादावर आणि धर्मनिरपेक्ष मूल्यांवर आधारित होते. पण बांगलादेश पुन्हा पाकिस्तानशी आपली नाळ जोडणार असेल तर त्याचा अर्थ तो अप्रत्यक्षपणे भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील भूमिकेच्या वैधतेवरही प्रश्न उपस्थित करत आहे. ही बाब द्विपक्षीय सहकार्याच्या नैतिक आधाराला तडा देणारी आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यात जगातील सर्वाधिक लांबीची सीमारेषा आहे. या सीमेवरून होणाऱ्या घुसखोरीचे आव्हान भारतासाठी मोठे बनत चालले आहे. बांगलादेशाने चीनला चिकन नेक परिसराजवळील जुन्या विमानतळाचा विकास करण्याचे आमंत्रण दिले आहे. हा भाग भारतासाठी अत्यंत संवेदनशील सीमा क्षेत्र म्हणून ओळखला जातो. यातून बांगलादेशच्या पुढील हालचाली आणि मनसुबे स्पष्ट होताहेत. भारताच्या पूर्व सीमेवर जर दुसरा ‘पाकिस्तान’ तयार झाला, तर आपला उपखंड कायमस्वरूपी अस्थैर्यात बुडण्याचा धोका आहे. कदाचित यामागे पश्चिमी जगताचे मोठे कारस्थान असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तूर्त तरी भारताने बांगलादेशातील घटना-घडामोडींकडे अत्यंत सावधगिरीने पाहून आपली दीर्घकालीन धोरणे आखणे गरजेचे आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List