सामना अग्रलेख – वृक्षवल्ली आणि चितमपल्ली
कालपर्यंत दिगंतराला जाणाऱ्या पक्ष्यांची वर्णने करणारा मारुती चितमपल्ली नावाचा निसर्गऋषी आता दिगंतराला निघाला आहे. पृथ्वीतलावरील माणसेच नव्हे तर निसर्गातील झाडे, पाने, फुले, पशू व पक्षीही चितमपल्ली यांच्या जाण्याने व्याकूळ झाले आहेत. या अबोल वृक्षवल्ली व पशू-पक्ष्यांच्या मुक्या भावनांचा आवाजच आता हरपला आहे. चितमपल्ली यांच्या जाण्याने मानवी वस्त्यांपेक्षा निसर्ग अधिक शोकात आहे. आजवर कुणासाठीही झाले नाही असे अरण्यरुदन आज या अरण्यऋषीसाठी सुरू आहे. या शोकमग्न मानाचे एकमेव धनी आहेत ते फक्त मारुती चितमपल्ली!
आपल्या लेखणीने अनेक पिढ्यांना निसर्गाशी संवाद साधायला शिकवणारे वनमहर्षी मारुती चितमपल्ली गेले. निसर्गाविषयी विलक्षण ओढ असणाऱ्या या ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्वाचा मृत्यू झाला किंवा त्यांचे निधन झाले असे म्हणण्यापेक्षा मारुती चितमपल्ली आज खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप झाले, असे म्हणायला हवे. निसर्ग, पर्यावरण, वन्यजिवांचे संरक्षण, पशू-पक्ष्यांचे एकूणच जीवन समजून घेण्यात व समजावून सांगण्यात चितमपल्ली यांनी आपले समग्र आयुष्य खर्ची घातले. कळत्या वयापासून ते वन खात्यातील नोकरीचा काळ व निवृत्तीनंतरचे जीवनही त्यांनी समर्पित केले होते ते निसर्गालाच! वृक्षवल्ली आणि चितमपल्ली हे जणू समीकरणच होते. चितमपल्ली यांचे जंगल आणि वन्यजिवांविषयीचे ज्ञान केवळ पुस्तकी नव्हते. ते छापील मजकूर वाचून झालेले तज्ञ नव्हते, तर हजारो-लाखो किलोमीटर चालून, प्रवास करून प्रचंड मुशाफिरी करत त्यांनी जंगल व प्राण्यांचे निरीक्षण केले. जे आपल्या डोळय़ांनी पाहिले, अनुभवले त्याचा अभ्यास करत त्यांनी आपल्या लालित्यपूर्ण गद्य लेखनातून जंगलातील हुबेहूब विश्वाचे सुंदर चित्रण केले. आपल्या 21 ग्रंथांतून या वनमहर्षीने आपला समृद्ध असा जीवनानुभव सर्वसामान्य जनतेसमोर मांडला. खूप विद्वत्ताप्रचुर, वाङ्मयप्रचुर वगैरे भारदस्त शब्दांचा वापर न करता साध्यासरळ व सोप्या भाषेतून त्यांनी पक्ष्यांचं बोलणं, प्राण्यांचं जगणं, जंगलांची धडधड आणि झाडांच्या संवेदना आपल्या ग्रंथांतून मांडल्या. मूळ तेलगू भाषिक असलेले मारुती चितमपल्ली लहानाचे मोठे झाले ते सोलापुरात. मात्र आयुष्यातील तब्बल 60 वर्षे त्यांनी खर्च केली ती विदर्भाच्या जंगलांत! कर्नाळय़ाचे पक्षी अभयारण्य, नवेगाव बांधचे राष्ट्रीय उद्यान, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नागझिरा वन्यजीव अभयारण्य यांसारख्या जंगलांत त्यांनी काम केले. मेळघाट व नागझिरा येथे
विस्थापित झालेल्या वन्यजिवांसाठी
अनाथाश्रम उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. वनस्पती, पक्षी, जंगलांशी संबंधित रहस्ये व वन्यजिवांचे वर्तन यांविषयी त्यांनी केलेले संशोधन व लेखन यांस वैज्ञानिक आधार तर होताच, पण जंगलातील हे अनुभव वाचकांसमोर जिवंतपणे मांडताना ते रटाळ होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली. पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, वानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृगपक्षीशास्त्र, घरट्यापलीकडं, पाखरमाया, केशराचा पाऊस, पक्षीकोष, जंगलाची दुनिया अशी विपूल ग्रंथसंपदा चितमपल्ली यांनी निर्माण केली. प्रचंड भटपंती, अभ्यास, संशोधन या माध्यमांतून जन्माला आलेल्या त्यांच्या लेखनकृती म्हणजे मराठी भाषेचे वैभव वाढवणारे संचित आहे. पक्षी, प्राणी, वृक्ष यांच्या कोषनिर्मितीचे चितमपल्ली यांचे एकहाती अफाट कार्य म्हणजे मराठी साहित्यावर केलेले थोर उपकारच म्हणायला हवेत. थंडीच्या दिवसांत वानरांचा कळप माणसांप्रमाणेच लाकडे रचून शेकोटी पेटवून घेतो आणि माकडांना माणसांच्या आधीच दुष्काळाची चाहुल कशी लागते व दुष्काळातून बचाव करण्यासाठी पाने, फळे, फुले, यांचा चोथा जमा करून व त्यात मध मिसळून वानरे आपल्या पिलांसाठी झाडांच्या ढोलींमध्ये कसे लाडू बनवून ठेवतात, गरुडांपासून वाचण्यासाठी मुंगुसे काय करतात अशी कधीही न ऐकलेली, न वाचलेली अनोखी माहिती चितमपल्ली आपल्याला देतात. सोलापुरात झालेल्या 83 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही चितमपल्ली यांनी भूषविले होते. दोन महिन्यांपूर्वीच पेंद्र सरकारने ‘पद्मश्री’ पुरस्कार देऊन मारुती चितमपल्ली यांच्या
कार्याचा गौरव
केला. मात्र केवळ पद्म पुरस्कार देऊन सरकारला मोकळे होता येणार नाही. वन्यजिवांच्या संरक्षणासाठी चितमपल्ली जी तळमळ व्यक्त करीत होते, त्यावर सरकार काय करणार आहे, हा खरा प्रश्न आहे. राजकारण्यांमुळे देशातील वनजमिनी नष्ट होत आहेत. वने छाटून राजकारणी पडद्यामागून वन विभागाच्या जमिनी नावावर करून घेत आहेत. महामार्गांच्या रुंदीकरणासाठी व इतर विकास कामांसाठी हजारो हेक्टरमधील जंगलांची कत्तल होते आहे. याचे परिणाम भीषण असतील, अशी चिंता चितमपल्ली नेहमी व्यक्त करीत. त्यावर सरकारने काही काम केले तर खऱ्या अर्थाने चितमपल्ली यांचा गौरव असेल. केवळ पशू-पक्ष्यांशीच नव्हे, तर रानावनांत राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या झोपडीतही हा शासकीय वन अधिकारी व लेखक एखाद्या फकिराप्रमाणे राहायचा. पशू-पक्षी व प्राण्यांविषयी निरीक्षणातून त्यांनी मिळविलेले ज्ञान इतके अलौकिक की त्यांचे लेखन वाचताना आपल्याला थक्क व्हायला होते. कोकीळ हा नरपक्षीच केवळ गातो. कोकिळा कधीच गात नाही. त्यामुळे लता मंगेशकरांना गानकोकिळा म्हणणे चुकीचे आहे हे ते पटवून देत. राने-वने तुडवत मैलोन् मैल भटपंती करणारे, पशू-पक्ष्यांची भाषा शिकत जंगले तुडवणारे व अरण्यवाचन करत निसर्गसंपदेचा अलौकिक ठेवा आपल्या साहित्यसंपदेतून जगासमोर आणणारे मारुती चितमपल्ली हे खऱ्या अर्थाने अरण्यऋषी होते. कालपर्यंत दिगंतराला जाणाऱ्या पक्ष्यांची वर्णने करणारा मारुती चितमपल्ली नावाचा निसर्गऋषी आता दिगंतराला निघाला आहे. पृथ्वीतलावरील माणसेच नव्हे तर निसर्गातील झाडे, पाने, फुले, पशू व पक्षीही चितमपल्ली यांच्या जाण्याने व्याकूळ झाली आहेत. या अबोल वृक्षवल्ली व पशू-पक्ष्यांच्या मुक्या भावनांचा आवाजच आता हरपला आहे. चितमपल्ली यांच्या जाण्याने मानवी वस्त्यांपेक्षा निसर्ग अधिक शोकात आहे. आजवर कुणासाठीही झाले नाही असे अरण्यरुदन आज या अरण्यऋषीसाठी सुरू आहे. या शोकमग्न मानाचे एकमेव धनी आहेत ते फक्त मारुती चितमपल्ली!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List