देशाला पंतप्रधान नाही… भाजपला आहे; उद्धव ठाकरे यांचा आसूड कडाडला
अस्सल शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन आज माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात मोठय़ा दिमाखात पार पडला. या सोहळ्याचे साक्षीदार महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून आलेल्या शिवसैनिकांनी सभागृह तुडुंब भरले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देताना बहुमोल मार्गदर्शन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांचा आसुड भारतीय जनता पक्ष आणि गद्दारांवर कडाडला. देशाला आज पंतप्रधानाची गरज आहे, देशाला पंतप्रधान कुठे आहे? फक्त भाजपला आहे. देशाला आज गृहमंत्र्यांची गरज आहे, घरफोडय़ा अमित शहांची नाही. देशाला संरक्षणमंत्र्यांचीही गरज आहे, गुंडांना अभय देणाऱया राजनाथ सिंह आणि देवेंद्र फडणवीसांची नाही, असा जबरदस्त घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला. यावेळी सभागृह शिवसेनेच्या जयघोषाने दुमदुमले. टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती कदापि होऊ देणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बजावतानाच, हिंमत असेल तर गुजरातमध्ये सक्ती करून दाखवा, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. गद्दार मिंध्यांचा समाचार घेतानाही त्यांनी उघड आव्हान दिले… कम ऑन किल मी, हिंमत असेल तर अंगावर या, फक्त येताना ऍम्ब्युलन्स घेऊन या… येताना सरळ याल, पण जाताना आडवे होऊन जाल, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.
मुंबई शिवसेनेचीच! आम्हीच जिंकणार!!
काय होणार, कसं होणार, होणार का? अशा बातम्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. त्यावर एकच सांगतो, तुमच्या मनात आहे आणि महाराष्ट्राच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये… मराठी माणसाची शक्तिशाली एकजूट होऊ नये, म्हणून यांच्या मालकांचे नोकर हॉटेलमध्ये गाठीभेटी घेत फिरताहेत. पण मी ठामपणे सांगतोय, मुंबई शिवसेनेचीच! आम्हीच जिंकणार!!
युती… तुमच्या मनात आहे तेच होणार!
मुंबईत शिवसेना जिंकली तर मालकाच्या मित्रांचे काय होणार, अदानींचे काय होणार याची चिंता त्यांना आहे. शेठजींचे नोकर आणि त्या नोकरांचे नोकर असलेल्यांचा मेळावा पलीकडे चालू आहे. युती होणारच नाही असे ते म्हणत आहेत. ते काहीही असो, मराठी माणसांच्या हितासाठी शिवसेना उभी राहणारच. आमचं काय होणार याची चिंता सोडा. आमचं आम्ही बघू. काय होणार ते लवकरच कळेल.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… अशी सुरुवात उद्धव ठाकरे यांनी करताच शिवसेना, शिवसेनाप्रमुख आणि उद्धव ठाकरे यांच्या जयघोषाने सभागृह दुमदुमले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना काही मिनिटे भाषण थांबवावे लागले.
शिवसेनेला 59 वर्षे झाली. पण वर्धापन दिनाचा हा जल्लोष पाहून कुणाचाही विश्वास बसणार नाही. शिवसेना ही तरुण आहे आणि पुढेही तरुणच राहणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेनेचा पहिला मेळावा शिवाजी पार्कवर तुडुंब गर्दीत झाला होता. त्या मेळाव्यात आपणही माँसोबत उपस्थित होतो, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. आज ज्यांना दाढी फुटली आणि दाढी खाजवताहेत ते कुठे होते माहीत नाही, असे म्हणत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर शरसंधान केले. यावेळी रिक्षा चालवत होते असा आवाज गर्दीतून आला.
भाजपला राजकारणात पोरं होत नाहीत तर शिवसेनेकडून घ्या, किती पाहिजेत
नकली शिवसेनेनेही आज वर्धापन दिन साजरा केला. त्याचे बॅनर्स आणि पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले. त्यावर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो होते. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटाची हजेरी घेतली. जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात ज्यांना पोरं होत नाहीत अशी लोकं शिवसेनेच्या घराणेशाहीवर टीका करतात तेव्हा कीव येते. अरे, तुला राजकारणात पोरं होत नाहीत तर आमच्याकडे आहेत, घ्यायचीत तर घे, किती पाहिजेत, कारण भारतीय जनता पक्ष असाच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणताच, वांझोटा… असा शब्द गर्दीतून उच्चारला गेला. शिवसेनाप्रमुखांनी तर त्यापुढचा शब्द वापरला असता असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांना पोरं झाली नाहीत त्यांनी दुसऱयांचे नेते घ्यायचे आणि मोठे करायचे. दुर्दैव असे की ज्या सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी आणली होती त्याच पटेलांना नेता म्हणून जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याची पाळी भाजपवर आली हे त्यांचे कर्तृत्व…आणि शिवसेनेला हिंदुत्व शिकवताहेत, असे टीकास्त्र उद्धव ठाकरे यांनी सोडले.
मराठवाडय़ातील शिवसैनिकांचे कौतुक
शेतकऱयांच्या प्रश्नावरून ‘क्या हुआ तेरा वादा,’ असा सवाल करत आंदोलन करणाऱया मराठवाडय़ातील शिवसैनिकांचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी कौतुक केले. खरी वस्तुस्थिती जनतेसमोर पोहोचवली, असे ते म्हणाले. माताभगिनींना केलेला वादा, जनतेला केलेला वादा जो भाजप पाळत नाही त्याच पक्षाने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाचा शिवसेनेबरोबर वादा करूनही तसे काही घडलेच नाही असे म्हटले होते. मग त्यांनी जनतेशी केलेला वादा खरा होता की खोटा तुम्हीच सांगा, यावरून भाजपची वृत्ती कळते, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या फसवेगिरीवर प्रहार केला.
केंद्रातील भाजप सरकार पनवती
भाजपचे सरकार आल्यापासून सगळी पनवती लागली आहे. सगळय़ा कामांची वाट लागली आहे. एअरपोर्टचे छत गळतेय, मेट्रो स्टेशनमध्ये पाणी साचतेय, प्रयागराजला माणसे चेंगरून मेली, दिल्लीच्या रेल्वे स्थानकावर माणसं चेंगरून मेली. विमान अपघातात माणसं गेली, काल परवा रेल्वेत चेंगरून मेली, पण कुणीही जबाबदारी घ्यायला तयार नाही, अशा शब्दांत केंद्रातील भाजप सरकारवर उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली.
मुंबईकरांमध्ये भांडणे लावताहेत,तिकडे अदानी मोकाट सुटलाय
लाडक्या बहिणीला द्यायला पैसे नाहीत. आदिवासींचा निधी त्यात वळवला जातोय. एसटीला द्यायला पैसे नाहीत, पण धारावीत अदानीला मुद्रांक शुल्क माफ करायला पैसे आहेत. कुठून आणले पैसे? का माफ केले? अदानीला सर्व काही माफ. अदानीला जागा फुकट. स्टॅम्प डय़ुटी माफ. 500 फुटांचा मालमत्ता कर शिवसेनेने माफ केला होता. आता महायुतीने सर्वसामान्यांवर मालमत्ता कर लादला. येत्या काही दिवसांत कचरा कर लादणार आहेत. त्यावर आदित्य ठाकरे यांनी आवाज उठवल्यानंतर तो स्थगित केला, पण रद्द नाही केला. देवनारचे डंपिंग ग्राऊंड अदानीला देताहेत आणि तो कचरा काढण्यासाठी पैसा मुंबईकरांकडून घेतला जाणार आहे. सामान्य माणसाला गिळताहेत आणि आपल्यात भांडणे लावून अदानी मोकाट सुटलाय. ही लढाई केवळ शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची नाही. ही 1960 साली ज्या मराठी माणसांनी रक्त सांडून ही मुंबई आपल्याला मिळवून दिली त्या रक्ताची शपथ घेऊन ही मुंबई तोडू देणार नाही, मुंबईचे महत्त्व कमी होऊ देणार नाही. म्हणून आपण उभे राहिलो तरच ही मुंबई वाचू शकेल, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.
घोटाळ्याच्या बातम्या दाबल्या जातायत
मिंध्यांच्या काळातील तीन हजार कोटींनी जास्त असलेले टेंडर सुप्रीम कोर्टाने रद्द केले अशी बातमी मध्यंतरी आली होती. ते तीन हजार कोटी गेले कुठे? आदित्य ठाकरे यांनी मुंबईतला रस्ते घोटाळा बाहेर काढला होता. ते पैसे गेले कुठे? या बातम्या बाहेर येऊ नयेत म्हणून महिलांवर होणाऱया अत्याचारांच्या बातम्या रोज दिल्या जाताहेत. त्या वाचवतही नाहीत. पण मिंध्यांच्या भ्रष्टाचाराच्या बातम्या दाबल्या जात आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
सिंचन घोटाळ्याच्या नावाने बोंबलले आता एसआयटीची एसटी झाली
शिवसेना घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करते. पण भाजपवाल्यांनी तुरुंगाच्या दरवाजाबाहेर स्टॉल्स टाकले आहेत. इथे येतो का तिथे जातो? लोकांना बदनाम करायचे. आयुष्यातून उठवायचे. भ्रष्टाचारी म्हणून बोंबाबोंब करायची. संपूर्ण कुटुंबाला बदनाम करायचे. मग त्याच्यामागे एसआयटी लावायची. आता बघू ना. देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळी सिंचन घोटाळय़ाप्रकरणी एसआयटी लावू, हे लावू ते लावू असे सांगितले होते. मग आता एसआयटीची एसटी झाली का, सर्वांना घेऊन जाणारी, असा टोलाही त्यांनी हाणला. आता बघूया, 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा म्हणून बोंबलायचे आणि ते भाजपात आले की त्यांचे पाय धुऊन पाणी प्यायचे. भाजपच्या सर्व भ्रष्टाचाऱयांना खतम करून त्यांच्या छाताडावर भगवा नाही लावला तर शिवसेना म्हणून नाव सांगणार नाही, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनाचा दिमाखदार सोहळा माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात गुरुवारी पार पडला. या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. शिवसेना नेते, युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व नेते यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवसेनाप्रमुखांना अभिवादन
शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त रिगल सिनेमाजवळील हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला शिवसैनिक-पदाधिकाऱयांनी अभिवादन केले. या वेळी ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘उद्धव ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है’ अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून गेला. या वेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर, अरुण दुधवडकर, अशोक धात्रक, विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला आघाडी विभाग संघटक युगंधरा साळेकर यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वर्धापन दिन सोहळ्याला रश्मी ठाकरे उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर शिवसेना नेते सुभाष देसाई, दिवाकर रावते, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, अनंत गीते, चंद्रकांत खैरे, खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, राजन विचारे, भास्कर जाधव, अनिल परब, सुनील प्रभू, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना-युवासेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण, पराग डाके, साईनाथ दुर्गे, सुप्रदा फातर्पेकर, सुधीर साळवी उपस्थित होते.
– शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विभागप्रमुख आणि शीव-कोळीवाडा विधानसभेच्या वतीने प्रमोद शिंदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
– विभाग संघटक पद्मा शिंदे यांच्या हस्ते रश्मी ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.
– युवासेनेच्या वतीने मोठा पुष्पहार देऊन उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे स्वागत करण्यात आले.
– शिवसेनेच्या जोशपूर्ण गीतांनी शिवसैनिकांमध्ये यावेळी चैतन्य पसरवले.
हिंदीची सक्ती होऊ देणारच नाही, हिंमत असेल तर करून दाखवा
मराठी माणसाला आता भांडून चालणार नाही. बटेंगे तो कटेंगे असा नारा भाजपने विधानसभेवेळी दिला होता. आपल्याला वाटले होते हिंदू-मुसलमान. पण हिंदू-मुसलमान त्यांनी केलेच. आता मुंबईत विशेषतः हिंदू-हिंदूंमध्ये मारामाया लावायच्या. हिंदी सक्तीची करायची. हिंदी सक्तीची झाली की ज्या हिंदी भाषिकांना 92-93 च्या दंगलीत शिवसेनेने वाचवले होते त्यांनाच शिवसेनेपासून दूर करायचे. हिंदी सक्तीची होऊ देणारच नाही, हिंमत असेल तर फडणवीसांनी करून दाखवावी असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. हिंदीशी शिवसेनेचे वैर नाही, पण सक्तीची का करता, असा सवाल करतानाच, तामिळनाडूत जाऊन हिंदी सक्तीचा फक्त उच्चार करून बघा काय करतात ते बघा असा इशाराही त्यांनी दिला. अजून भाजपने गुजरातमध्ये हिंदी सक्तीची केली की नाही कल्पना नाही, तिथे करा ना, तिकडे काय… सू करे छे. मराठीत त्याचा अर्थ वेगळा होतो, हिंदीत काय होतो मला माहित नाही, असे उद्धव ठाकरे म्हणताच सभागृहात खसखस पिकली. मुंबईकर सर्व एकत्र राहतोय तिथे निवडणुकीच्या तोंडावर भाजपवाले मराठी-अमराठी झगडा लावण्याचा प्रयत्न करताहेत आणि आपण भांडत राहिलो की ते भ्रष्टाचार करायला मोकळे, असा भाजपच्या कटाचा पर्दाफाशच उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
– शिवसेनेवर घराणेशाहीचा आरोप करतात, पण मिंध्यांच्या एका मंत्र्याने भूखंडाचे आरक्षण बदलून त्याच्या पोरासाठी हॉटेल थाटले. एका मंत्र्यांच्या खात्यात बदल्यांमध्ये अनियमितता आहे. एक मंत्री शेतकऱयांचा अपमान करत सुटला आहे. शिक्षण खात्यामध्ये घोटाळा आहे.
– भाजपवाल्यांची दया येते. किती पिढय़ा तुम्ही सतरंज्या उचलण्यात घालणार आहात. आता तर सतरंज्यांच्या खाली गेलात तुम्ही. तुमच्यावर उपरे नाचताहेत. बस करा आता. या आणि तुमच्यात स्वाभिमान, अभिमान शिल्लक असेल तर उपऱयांचे जोखाड झुगारून या बाहेर आणि मर्दासारखे बाहेर या, तुमची किती इंचाची छाती आहे ते तुमच्या नेत्यांना दाखवा.
…मग तुमच्या न केलेल्या शौर्याचे कौतुक सांगायला शिवसेनेचे खासदार जगात का पाठवले
उद्धव ठाकरे यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सुनावले. भाजपला पर्याय म्हणून इंडिया आघाडी उभी राहिली. तेव्हा भाजपने आघाडीवर इंडियन मुजाहिदीन म्हणून टीका केली होती. त्यावेळी भाजपला लाज वाटली नाही आमची इंडियन मुजाहिदीनबरोबर तुलना करायला. शिवसेना इंडियन मुजाहिदीनसारखी होती तर मग भाजपने त्यांच्या न केलेल्या शौर्याचे कौतुक सांगण्यासाठी जगभरात शिवसेनेचे खासदार का पाठवलेत. शिवसेना इंडियन मुजाहिदीन, मग तुम्ही कोण. जगभर फिरलात, पण या कठीण काळात एक मित्र तुमच्या पाठीशी उभा राहिला नाही. शिवसेना तुमच्यासोबत उभी राहिली. मोदी जगभरातील मित्र तुम्ही तोडता आहात, मित्र संपवून टाकताय आणि संकट आल्यानंतर शिवसेनेचे खासदार जगात पाठवताय, असे उद्धव ठाकरे मोदींना उद्देशून म्हणाले. डोकलाम संकटाच्या वेळीही शिवसेना केंद्राच्या पाठीशी उभी राहिली होती, याचीही आठवण त्यांनी करून दिली.
हिंमत असेल तर या अंगावर
उद्धव ठाकरे यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा एक किस्सा सांगितला. 1992-93 च्या काळात मुंबईत दंगली उसळल्या होत्या तेव्हा देशद्रोह्यांच्या विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते आणि छातीचा कोट करून त्यांनी मुंबई वाचवली. त्यावेळी एक व्यक्ती बाळासाहेबांकडे आली आणि त्यांनी म्हटले होते…बाळासाहेब, आता पुरे झाले. ती व्यक्ती आज हयात आहे, पण मी त्यांचे नाव सांगणार नाही. त्यावर बाळासाहेबांनी त्यांना नाना पाटेकर यांच्या ‘प्रहार’ चित्रपटातील एक डायलॉग ऐकवला होता. नाना पाटेकर गुंडांसमोर उभा राहून त्यांना म्हणतो…कम ऑन, किल मी. त्याचप्रमाणे मीसुद्धा गद्दारांसमोर उभा राहून सांगतोय…कम ऑन, किल मी. हिंमत असेल तर या अंगावर आणि येताना अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटासारखी ऍम्ब्युलन्स घेऊन या. येताना सरळ याल, जाताना आडवे होऊन जाल.
वर्धापन दिनाचा जयघोष शिवसेनेच्या विरोधकांनी पाहिला तर
नॅपकिनसकट त्यांचे सगळे कपडे ओले होतील. त्यांना प्रश्न पडेल की, इतकी माणसे फोडली, चिन्ह चोरले, वडील चोरले, पक्ष फोडला तरी शिवसेना संपत कशी नाही. उद्धव ठाकरे संपत कसा नाही. पण त्यांना कल्पना नाही. शिवसेनाप्रमुखांनी रक्त आटवून, विचार पेरून शिवसेना नावाचे वादळ निर्माण केले आहे. पैसे फेकून जमवलेली ही माणसे नाहीत. विचार अंगामध्ये भिनवून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्रधर्म पाळणारे हे शिवसैनिक आहेत.
ट्रम्पचा फोन आला आणि यांचा आवाजच गेला
ऑपरेशन सिंदूरनंतर भाजपवाले घरोघरी जाऊन सिंदूर वाटणार होते. कोण वाटणार.. हे भ्रष्ट, गुंड. हे माताभगिनींना घरोघरी जाऊन सिंदूर वाटणार. यांना जोडय़ाने हाणले पाहिजे. सिंदूर वाटणार कोण तर भाजपचा खासदार विजय शहा. जो लष्कराच्या कर्नल सोफिया कुरेशी यांना पाकिस्तान्यांची बहीण म्हणतो, दहशतवाद्यांची बहीण म्हणतो, अशी नालायक अवलाद भाजपमध्ये आहे. त्याला भररस्त्यात चाबकाने फोडला पाहिजे. पण भाजप त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही. अशा भाजपकडून आपण देश सुधारण्याची आशा करतो. भाजपने सैन्याचे पाय बांधले. सैन्य पाकिस्तानात धडकलेच होते. एव्हाना पाकिस्तान घेतलाही असता. पण ट्रम्पचा फोन आल्यानंतर भाजपचा आवाजच गेला. काय करायचेत असे पंतप्रधान.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List