लेख – अस्वस्थ चीनच्या कुरापती

लेख – अस्वस्थ चीनच्या कुरापती

>> व्ही. के. कौर

‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत केलेल्या कारवाईत केवळ पाकिस्तानला दणका बसलेला नाही; तर पाकिस्तानने चीनकडून घेतलेली सर्व संरक्षण प्रणाली किती फोन आहे, हेही समोर आले आहे. त्यामुळे अस्वस्थ बनलेल्या चीनने अरुणाचलमधील काही ठिकाणांची नावे बदलण्याचा प्रयत्न केला. चिनी सैन्य सातत्याने भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत आहे. चीनचे विस्तारवादी धोरण भारतासाठीच किंवा संपूर्ण आशिया खंडासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी मोठा धोका आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले आणि पाकिस्तान व पाकव्याप्त कश्मीरमधील दहशतवादी प्रशिक्षण केंद्रे नष्ट केली. या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतावर क्षेपणास्त्र डागले खरे, परंतु भारताने ते हवेतच नष्ट करत चोख उत्तर दिले. विशेष म्हणजे पाकिस्तानने वापरलेले क्षेपणास्त्र चिनी बनावटीचे असल्याने त्याचा दुय्यम दर्जा आणि सुमारपणा सिद्ध झाला आहे.

पाकिस्तानचा पराजय हा चीनच्या पचनी पडलेला दिसत नाही. चीन आणि पाकिस्तानची मैत्री ही जगजाहीर आहे. त्यामुळेच आपल्या मित्राच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी चीनने भारताविरोधातील कुरापती नव्याने सुरू केल्या आहेत. अलीकडेच अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांना चिनी नाव देण्याचा उपद्व्याप केला आहे. अर्थात हे पहिल्यांदा घडलेले नाही. यापूर्वीही असा प्रकार घडलेला होता. भारताने या वेळेस अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांना नाव देण्याचा चीनचा प्रयत्न बिनबुडाचा असल्याचे म्हटले आहे. चीनकडून वारंवार विस्तारवादी भूमिका अंगीकारली जात असून अनेकदा दाखले देऊनही चीनच्या कुरापती थांबलेल्या दिसत नाहीत. चीनच्या सततच्या बदलत्या भूमिकेमुळे भारत आणि चीन सीमेवर नेहमीच तणाव राहिलेला आहे. मात्र भारताने अरुणाचल हा भारताचाच भाग असल्याचे स्पष्टपणे बजावतानाच चीन याबाबत केवळ अपप्रचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारताकडून वारंवार संधी दिली जात असतानाही चीनच्या कारवाया सुरूच आहेत, पण ड्रगनकडून अरुणाचलमधील ठिकाणांना नाव देण्याची कृती ही त्याचे छुपे मनसुबे सांगणारी आहे. नाव बदलल्यामुळे वास्तविकता बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहील. यासारख्या बालिश कुरापती करत चीन एक प्रकारे भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करत आहे. या धोरणानुसार तो नेहमीच सीमा भागात बांधकाम, पुलांची निर्मिती, व्यावसायिक केंद्र, रस्ते आदी माध्यमांतून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. कदाचित अरुणाचलमधील नामकरण करण्याच्या उद्योगाने भारत दबावाखाली येईल, असे चीनला वाटले असेल, परंतु भारत आता कोणत्याही दबावाखाली येणार नाही. उलट सक्षमपणे उत्तर देण्यास सज्ज आहे. पाकिस्तानविरोधातील कारवाईत चीनने दिलेल्या संरक्षण यंत्रणांची पोलखोल झाल्याने चीनचा संयम सुटला आहे आणि त्यामुळे गरीब देशांना दुय्यम दर्जाचे शस्त्र विकण्याच्या उद्योगाला चीनला चाप बसवावा लागणार आहे. पाकिस्तानने चिनी बनावटीच्या क्षेपणास्त्रांचा वापर केला खरा, परंतु भारताने अगदी सहजपणाने ही सर्व क्षेपणास्त्रs जमीनदोस्त केली.

भारताने चीनच्या हिताबाबत अधिक सजग राहावे, असे चिनी शासनकर्त्यांना वाटते. मात्र चीनने अनेकदा बेकायदा कारवाया करत किंवा कुरापती करत भारताचा उपमर्द करण्याचा आणि सार्वभौमत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे, याचा विचार केला जात नाही. चीन हा जगातील सर्वात अविश्वास देश आहे. त्यामुळे पाकिस्तानप्रमाणेच चीनबाबत भारताने कठोर भूमिका ठेवणे गरजेचे आहे. नाव बदलण्याचा चीनचा घाट पाहिल्यास त्याच्याशी मैत्री करताना पुरेशी खबरदारी बाळगणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट होते. अन्यथा चीन पाठीत खंजीर खुपसण्यात माहीर आहे.

गेल्या तीन वर्षांत चीनने अरुणाचल प्रदेशातील अनेक ठिकाणांची नावे बदलली आहेत. चीन अरुणाचल प्रदेशला जांगनान असे म्हणतो. त्याच वेळी हा भाग दक्षिण तिबेटचा असल्याचाही दावा करतो. एक प्रकारे चीन हा उभय देशांतील करारापासून नेहमीच दूर राहिला आहे. चीनच्या अध्यक्षांनी 1993,1996 आणि 2013 मध्ये झालेल्या परस्पर सामंजस्य कराराकडे दुर्लक्ष केले आहे. तवांग प्रदेश हा चीनला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. कारण ते बौद्ध धर्मातील महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे आणि दलाई लामांच्या परंपरेशी जोडलेले आहे. चीनला भीती आहे की, दलाई लामांची सत्ता भारताच्या मदतीने तवांगातून पुन्हा स्थापन होऊ शकते. चीनचे पीएलए सातत्याने भारताच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करते. त्यातूनच 2020 मध्ये गलवानची घटना घडली. चीनचे सैनिक गलवान खोऱ्यात आले आणि त्यांना रोखताना संघर्ष झाला. तेव्हापासून उभय देशांतील संबंध ताणले गेले. चीन हा भारताच्या भूभागात छुप्या मार्गाने घुसखोरी करत जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असतो. चीनचे विस्तारवादी धोरण भारतासाठीच नाही, तर संपूर्ण आशिया खंड व जगासाठी मोठा धोका आहे.

आज चीन हा भारताच्या वाढत्या सामर्थ्यावरून अस्वस्थ आहे. भारताची वाढती आर्थिक आाणि सामरिक शक्ती चीनच्या डोळ्यांत सलत आहे. त्यामुळे तो दगाबाजी करत भारताला कमकुवत करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्यक्षात सीमेवरून तो कुरापती करत असतो आणि नवनवीन तथ्ये समोर आणण्याचा प्रयत्न करत असतो. अरुणाचल प्रदेशच नाही, तर अक्साई चीन, तैवान, वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रावरही चीनकडून दावा सांगितला जातो. धूर्त चीन अरुणाचलच्या कोणत्याही कागदपत्रांवर भारताचे नाव मान्य करत नाही काही वेळा तर त्याने चीनच्या नकाशात अरुणाचल प्रदेशचा समावेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारताच्या तीव्र प्रतिकारामुळे तसेच सामरिक शक्ती आणि रणनीती पातळीवर चीन तोंडावर पडला आहे.

आता भारताला अनेक आघाडय़ांवर चीनची मुस्कटदाबी करावी लागणार आहे. यात प्रामुख्याने चीनच्या वस्तूंवर बहिष्कार घालणे. यावर सरकारबरोबरच उद्योगसमूहांनी तसेच नागरिकांनी गांभीर्याने विचार करायला हवा. त्यामुळे चीनचे औद्योगिक कंबरडे मोडले जाऊ शकते. आज जगातील बहुतांश देशांत चीनच्या सामानावर बहिष्कार घातला जात आहे. आपल्यालाही कठोर पावले उचलावी लागतील. भारताने जेव्हा पाकिस्तानमध्ये आश्रयाला असलेल्या दहशतवाद्यांना आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत सामील करण्याचा प्रयत्न केला तेव्हा चीनने नकाराधिकाराचा वापर करून खोडा घातला आहे. संपूर्ण जग दहशतवाद्याच्या मुद्दय़ावर भारताच्या पाठीशी असताना चीनने मात्र पाकिस्तानला साथ दिली आहे. यावरून आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताशी मैत्री करणारा तसेच व्यापार वाढविण्यावर उत्सुक असलेला चीन दुटप्पी भूमिका कशी घेतो, हे आता कळून चुकले आहे. आंतरराष्ट्रीय संघटना आणि व्यासपीठावर भारतासमवेत असल्याचे चीनकडून केवळ नाटक केले जाते.
भारत अणि चीन या उभय देशांत तणाव निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे चीनचा संशयास्पद हेतू. चीनने पुन्हा एकदा अरुणाचलचा मुद्दा उकरून काढत भारताशी असणारे वैर समोर आणले आहे. भारतासमवेत चीनचे वर्तन नेहमीच दुजाभावाचे राहिलेले आहे. चीनकडून पाकिस्तानला भारताविरोधात एखाद्या प्याद्याप्रमाणे कसा वापरतो हेदेखील विसरता येणार नाही. साहजिकच सध्याच्या काळात चीनची कुरापत भारताचे लक्ष विचलित करण्यासाठीच केली आहे. शिवाय पाकिस्तानशी असणारे आपले नाते दृढ आहे हेही दर्शवण्याचा प्रयत्न या कुरापतींमागे दिसतो. आर्थिक महासत्तेच्या नशेत धुंद असलेल्या अहंकारी चीनने आंतरराष्ट्रीय कायद्यांची पायमल्ली केली आहे. त्यामुळे चीनपासून जागतिक व्यवस्थेला धोका निर्माण होत आहे. गरीब देशांना कर्ज देऊन आपल्या जाळ्यात ओढण्याचे चीनचे तंत्र सर्वांना ठाऊक झाले आहे. पण भारत आता 1962 चा राहिलेला नाही, हे चीनने लक्षात घेतले पाहिजे. हा नवीन भारत असून तो पाकिस्तानला पाताळात गाडणारा आहे, तसाच चीनला माघार घेण्यास भाग पाडणारा आहे. भारताची रणनीती स्पष्ट आणि स्वच्छ आहे. भारत आज संवाद आणि परस्पर सहकार्यावर विश्वास ठेवतो, परंतु भारताच्या राष्ट्रीय अस्मितेला धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर भारतही सर्व शक्तीनिशी उत्तर देण्यास खंबीर आहे. शत्रूचे मनसुबे उधळून लावण्याची भारतीय लष्करात क्षमता आहे. त्यामुळे चीनने नकाशात फेरफार केला तरी भारताची जमीन बळकावण्याची त्याची मनीषा कधीही प्रत्यक्षात येणार नाही. अमेरिकेने 145 टके टेरिफ लादल्यानंतर चीनने भारताशी असणारी सलगी वाढवली होती; पण अमेरिकेसोबतचे टेरिफ वार संपताच चीन पुन्हा मूळ पदावर आला आहे. त्यामुळे भारताने आणि भारतीयांनी चीनच्या या लबाड आणि धूर्त चालींपासून सदैव सतर्क राहणे गरजेचे आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हार्ट अटॅक येण्याच्या 5 मिनिटे आधी दिसतात ही 8 लक्षणे; वेळीच समजली तर जीव वाचू शकतो हार्ट अटॅक येण्याच्या 5 मिनिटे आधी दिसतात ही 8 लक्षणे; वेळीच समजली तर जीव वाचू शकतो
हृदयापर्यंत रक्त पोहोचवणाऱ्या कोणत्याही धमन्यांमध्ये अचानक अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकाराचा झटका येतो. त्यामुळे हृदयाला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे मिळत नाहीत,...
JCB च्या मदतीने नदीतून रेती उत्खनन, प्रशासनाचे दुर्लक्ष
विमान पाडून टाकेन! Air India च्या विमानात महिला डॉक्टरचा गोंधळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मोदींचा आणखी एक जुमला! परदेशातील काळा पैसा आलाच नाही, स्वीस बँकेतील हिंदुस्थानींचा पैसा तिपटीने वाढला
हॉरर चित्रपट पाहताना मी आवाज बंद करुनच बघते.. काजोलचा खुलासा
Air India Plane Crash- अपघातातील मृत महिलेबद्दल केली असंवेदनशील टिप्पणी; सरकारी अधिकाऱ्याचे निलंबन
ठाणे महापालिकेच्या तत्कालीन सह आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या फेरीवाल्याला 7 वर्षांची शिक्षा