गुडघाभर पाण्यातून जावे लागते शाळेत! आम्ही शाळेत गेलो नाही, तर अधिकारी कसे होणार! विद्यार्थ्यांचा सवाल
कर्जत तालुक्यातील चिंचोली गावठाण ते मोरे वस्ती आणि खंडाळा येथील गोयकरवाडी या भागांना जोडणारा जुना रस्ता अनेक वर्षांपासून अत्यंत वाईट स्थितीत असून, या रस्त्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. या रस्त्याचा वापर महिला, गरोदर माता, शाळकरी मुले-मुली, शेतकरी व वृद्ध व्यक्ती करतात. पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचते आणि प्रवास जीवघेणा ठरतो. मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर वेड्याबाभळीच्या झाडांनी अडथळा निर्माण केला आणि संपूर्ण रस्ता बंद झाला होता.
सन 2022 साली स्थानिक ग्रामस्थांनी या रस्त्याबाबत तहसीलदार कार्यालयाकडे लेखी तक्रार अर्ज दिला होता. या अर्जावर कारवाई करत ऑक्टोबर 2022 मध्ये तहसीलदारांनी ‘रस्ता ग्रामस्थांसाठी खुला करावा’, असा स्पष्ट आदेश दिला होता. मात्र, हा आदेश प्रत्यक्षात राबविण्यासाठी आलेल्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना काही स्थानिक नागरिकांनी विरोध करत काम थांबवले. तेव्हापासून आतापर्यंत महसूल प्रशासनाला हा रस्ता खुला करता आलेला नाही.
शेतामध्ये जाणाऱ्या अनेक महिला या परिसरामध्ये खराब रस्त्यामुळे व पाण्यात पडून जखमी झाल्या आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत जाताना पाण्यात साप दिसल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि काही विद्यार्थ्यांना शाळा बुडवावी लागली आहे. गुडघाभर पाण्यामधून या विद्यार्थ्यांना शाळेमध्ये जावे लागते. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेड्याबाभळी आहेत. यामधून अनेक प्राणी रस्त्यावर येतात. रात्रीच्या वेळी अंधारामध्ये या रस्त्याने प्रवास करणे जोखमीचे ठरू शकते. यामुळे या रस्त्यासाठी ग्रामस्थांनी अनेकवेळा महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायतीकडे पाठपुरावा केला असूनही अद्यापि कुणीही दखल घेतलेली नाही. या भीषण परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.
राज्य सरकारने अशा रस्त्यांबाबत कायदा करूनही त्याची अंमलबजावणी होत नाही, असे या ठिकाणी दिसून येते. त्यामुळे प्रांत अधिकारी व तहसीलदार या रस्त्यासाठी काय भूमिका घेतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
या आंदोलनात योगेश मोरे, हर्षल मोरे, शेखर मोरे, शिवाजी मोरे, छगन केंदले, देवदास केंदले, रंगनाथ केंदले, दशरथ गायकवाड, मारुती गाडे, सत्यशील मोरे, आजिनाथ आखाडे, भागवत आखाडे, अशोक आखाडे, तुकाराम उबाळे, भाऊसाहेब काकाले यांच्यासह महिला, विद्यार्थी, ग्रामस्थ सहभागी झाले होते. यावेळी नागरिकांनी सदरचा रस्ता खुला करण्याची मागणी केली.
आम्ही शाळेत गेलो नाही, तर अधिकारी कसे होणार! विद्यार्थ्यांचा सवाल
‘आम्हाला शाळेत जायचंय, पण रस्ता नसल्यामुळे आम्ही शाळा बुडवतोय. मग आम्ही अधिकारी कसे होणार?, आम्हालाही तुमच्यासारखे तहसीलदार व्हायचे आहे. रस्त्यामुळे शाळाच बुडाली तर अधिकारी कसे होणार’, असा सवाल करत आमचा रस्ता तत्काळ खुला करून द्यावा’, अशी मागणी विद्यार्थ्यांनी तहसीलदारांकडे केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List