पिशवीतील मृत अर्भकप्रकरणात अधिकाऱ्यांची एकमेकांकडे बोटे, ‘सामना’च्या दणक्यानंतर आरोग्य विभागात भागमभाग
शववाहिनी न मिळाल्याने एका आदिवासी पित्याला त्याचे मृत अर्भक पिशवीत घालून नाशिक सिव्हिल हॉस्पिटल ते खोडाळ्यातील जोगलवाडी असा तब्बल 90 किलोमीटरचा प्रवास एसटीने करावा लागला. याबाबत दैनिक ‘सामना’ने वृत्त प्रसिद्ध करत आरोग्य विभागाची अब्रू वेशीवर टांगली. त्यानंतर आज प्रशासनाची एकच भागमभाग झाली असून आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोटे दाखवत जबाबदारीतून हात झटकले आहेत.
खोडाळापासून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या जोगलवाडीमध्ये राहणारी अविता कवर या गर्भवती महिलेला बुधवारी पहाटे तीनच्या सुमारास प्रसूतिकळा सुरू झाल्या. त्यामुळे पती सखाराम याने 108 क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावण्यासाठी कॉल केला. पण बराच वेळ झाला तरी रुग्णवाहिका आलीच नाही. दुसऱ्या दिवशाही रुग्णवाहिका मिळाली नाही. अखेर अविताला खासगी वाहनाने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. खोडाळ्यातील डॉक्टरांनी तपासून बाळाच्या हृदयाचे ठोके ऐकू येत नसल्याने तिला मोखाड्याच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. या दगदगीत तिचे बाळ पोटातच दगावले. त्यामुळे तिला नाशिक सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून गावात नेण्यासाठी अविताचे पती सखाराम याला तास-दोन तास शोधाशोध करूनही शववाहिनीच मिळाली नाही. अखेर त्याने हे अर्भक चक्क पिशवीत टाकून नाशिक ते जोगलवाडी असा 90 किलोमीटरचा प्रवास एसटीने केला. त्यानंतर अर्भकावर अंत्यसंस्कार केल्याचे समोर आले आहे.
पत्रकारांच्या प्रश्नांनी बोबडी वळली
आरोग्य विभागाच्या कारभाराचे धिंडवडे काढणाऱ्या या घटनेची गंभीर दखल दैनिक ‘सामना’ने घेतली. याबाबत आज ‘मृत अर्भकाला पिशवीत घालून पित्याचा नाशिक ते खोडाळा एसटीने 90 किमी प्रवास’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची भागमभाग झाली असून जबाबदारी झटकण्यासाठी एकमेकांवर खापर फोडले जात आहे. पालघर जिल्हा आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयाकडे बोट दाखवत त्यांनी शववाहिनी उपलब्ध करून देणे आवश्यक होते असे सांगितले. यानंतर पत्रकारांनी प्रश्नांचा भडीमार करताच बोबडी वळलेल्या अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List