मुंबईकरांना कराच्या बोझ्याखाली अडकवून ठेवणे, हेच भाजपचे तंत्र; आदित्य ठाकरे यांचा हल्लाबोल
मालमत्ता कर वाढवल्याची कोणतीही पूर्वसूचना न देता मे महिन्यापासून नऊ लाख मुंबईकरांना वाढीव 16 टक्के मालमत्ता कराची बिले मुंबई महापालिकेने पाठवायला सुरुवात केली आहेत. राज्य सरकारच्या या हुकूमशाही धोरणाविरोधात मुंबईकरांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान राज्य सरकारने वेस्ट मॅनेजमेंट युजर फी म्हणून मुंबईकरांवर लादलेल्या कराला स्थगिती दिली आहे. मात्र आता त्या जागी प्रॉपर्टी टॅक्स वाढवून मुंबईकरांवर कराचा बोझा वाढवला आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकार व भाजपवर जोरदार टीका केली आहे.
”वेस्ट मॅनेजमेंट युजर फी महापालिकेने स्थगित केली आहे, रद्द केलेली नाही. का? कारण मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर वाढवला आहे. मी सातत्याने वेस्ट मॅनेजमेंट फी म्हणजेच, ‘अदानी करा’ला विरोध दर्शवत आलो आहे. हा कर थेट मुंबईकरांवर लादला जाणार आहे, जेणेकरून देवनार डम्पिंग ग्राउंड साफसफाईवर होणारा ₹2500 कोटींचा खर्च अदानी समूहासाठी, मुंबईकरांच्या खिशातून भरता येईल. उद्धव ठाकरे यांचे सरकार असताना 500 चौरस फूटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर पूर्णतः माफ करण्यात आला होता. तेही कोणत्याही अटीशर्ती न ठेवता! आता मात्र भाजप सरकारने एकीकडे मालमत्ता कर वाढवला आहे आणि दुसरीकडे लवकरच अदानी कर (वेस्ट मॅनेजमेंट फी) देखील लावणार आहे. थोडक्यात काय, तर मुंबईकरांवर जास्तीत जास्त कर लादणे व विनाकारण मुंबईकरांना कराच्या बोज्याखाली अडकवून ठेवणे, हेच भाजपचे तंत्र आहे”, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विट केले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List