हेरगिरीच्या आरोपाखाली ATSने घेतलं ताब्यात, कारवाईनंतर रविकुमारचं लग्न मोडलं…
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानसाठी हेरगिरी करत संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप असलेल्या अनेकांना भारतीय तपास संस्थांन ताब्यात घेतलं आहे. हाच तपास महाराष्ट्रापर्यंतही पोहोचला असून एटीएसने काल संध्याकाळी तिघांना ताब्यात घेतलं. त्यापैकी एक जण हा ठाण्यातील कळवा येथील असून रविकुमार वर्मा असं त्याचं नाव आहे. एटीएसने महाराष्ट्रातून एकूण तीन कथित हेरांना पकडले आहे. त्यांनी भारताची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. रविकुमार वर्मा हा कळव्याचा रहिवासी असून तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
भारतीय नौदलाची गोपनीय माहिती तो एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला पुरवत होता असा आरोप आहे. त्याच्याच संपर्कात असलेल्या आणखी दोन जणांविरोधातही शासकीय गुपिते अधिनियम (ओ.एस.ए.) आणि यूएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा रविकुमार याच्या आईने केला आहे.
याचदरम्यान आता आणखी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. एटीएसने काल कारवाई करून रविकुमार याला ताब्यात घेतल्याची बातमी उघड झाल्यानंतर त्याचं ठरलेलं लग्न आता मोडल्याचं समोर आलं आहे. ठाण्याच एटीएसने केलेल्या कारवाईमुळे रविकुमारचं लग्न मोडलं. काही दिवसांपूर्वीच त्याच्या आईने रविकुमारचं लग्न ठरवलं होतं. काही दिवसापूर्वी त्याची आई अयोध्या या गावातून परत आलेली होती , तेव्हाच त्याचं लग्न ठरवलं होतं. मात्र आता हेरगिरीच्या आरोपाखील एटीएसने त्याला अटक केल्यानंतर रविकुमारचं जिच्याशी लग्न ठरलं होतं, त्या कुटुबियांनी हे लग्न करण्यास नकार देत ते मोडल्याचं स्पष्ट केलं आहे.
दरम्यान आरोपी रवि वर्माला काही वेळापूर्वीच ठाण्यातील दहशतवाद विरोधी कार्यालयात आणण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू झाली आहे. त्याच्या या चौकशीत नेमकी काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माझा मुलगा निर्दोष
मिळालेल्या माहितीनुसार, रविकुमार वर्मा मागील पाच वर्षांपासून मुंबई डॉकयार्डमध्ये कनिष्ठ अभियंता-तंत्रज्ञ म्हणून कंत्राटी पद्धतीने काम करत होता. मात्र गेल्या दोन वर्षांत तो एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या संपर्कात आला. त्या महिलेने त्याच्याशी मैत्री केली, त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि मग हळूहळू त्याच्याकडून भारतीय नौदलाशी संबंधित महत्त्वाची, गोपनीय माहिती काढून घेतली, असा आरोप आहे.
पण रविकुमार याच्या आईने मात्र आपला मुलगा निर्दोष असल्याचा दावा केला आहे. माझा पती, रवीचे वडील दारू पितात, घर सांभाळत नाही, आमचा लहान मुलगाही वारला आहे. रविकुमार हा गेली 5 वर्ष नेव्हल डॉकमध्ये कामाला आहे.
फेसबुकवर तो एका महिलेशी संपर्कात आला. ती त्याला नग्न शरीर दाखवून फेस बुक चॅट करत होती, ते पाहून माझा मुलगा घाबरला, मी फेसबूक बंद करतो असं सांगत त्याने माझ्याकडे तक्रार केली होती, असा दावाही त्याच्या आईने केला. माझा मुलगा निर्दोष आहे. माझा पती काहीच कामाचा नाही,दारू पिऊन पडलेला असतो. एक मुलगा कॅन्सरने गेला, आमच्या मुलीचं लग्न झालं होतं पण आता घटस्फोट झाला. रवीच आमचा आधार आहे. तो, माझा मुलगा निर्दोष आहे, आता नरेंद्र मोदींनी माझ्या मुलाला वाचवावं, अशी मागणी त्याच्या आईने साश्रूनयनांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List