पद्मश्री मिळाल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांची आठवण काढत अशोक सराफ भावूक; म्हणाले ‘आजही मला त्याची आठवण…’
मंगळवारी,27 मे रोजी पद्म पुरस्कार 2025 च्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. कला, सामाजिक कार्य आणि संगीत क्षेत्रातील योगदानासाठी 68 प्रतिष्ठित व्यक्तींना पुरस्कारांच्या दुसऱ्या टप्प्यात सन्मानित करण्यात आलं. यामध्ये मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्यसम्राट अभिनेते अशोक सराफ यांचा पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आलं ही खरोखरच सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट ठरली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. हे चित्र पाहून नक्कीच सर्वच चाहत्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. सामान्यांपासून ते कलाकारांपर्यंत सर्वांनीच याबद्दल अभिमानही व्यक्त केला.
पद्मश्री मिळाल्यानंतर लक्ष्मीकांत बेर्डेबद्दल काय म्हणाले अशोक सराफ?
दरम्यान पद्मश्री मिळाल्यानंतर अशोक सराफांनी दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी आनंद तर व्यक्त केलाच पण सोबतच आपल्या प्रिय मित्राची आठवणही काढली. अर्थातच लक्ष्मीकांत बेर्डे. लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सरफांच्या किती जवळचे मित्र होते हे तर सर्वांनाच माहित आहे. वेळोवेळी अशोक सराफ नेहमीच आपल्या मित्राची आठवण काढत असतात.
‘आम्ही मराठीत 50 चित्रपट केले अन्…’
पद्मश्री मिळाल्यानंतर जेव्हा अशोक सराफ यांना एका मुलाखतीत विचारण्यात आलं की ‘पद्मश्री मिळाला तो क्षण तुमच्यासाठी खास होता तर या क्षणी तुम्हाला तुमचे मित्र लक्ष्मीकांत बेर्डे यांची किती आठवण येते?’ तेव्हा ते अशोक सराफ थोडेसे भावूक झाले अन् म्हणाले की ‘मला त्याची फार आठवण येते. आम्ही मराठीत 50 चित्रपट केले आहेत. त्यातील अर्ध्याहून जास्त हिट आहेत. आमची जोडी जमली होती. माझं जे टायमिंग होतं, तेच त्याचं होतं. तो मला फार ज्युनियर आहे. आमच्या दोघांचं टायमिंग एकत्र जुळायचं आणि त्यामुळे लोकांना पाहायला आवडायचं. ते नंतर राहिलं नाही, आमची जोडी होती. मराठी चित्रपटसृष्टीचा जेव्हा पडता काळ होता तेव्हा आम्ही दोघांनी लोकांना चित्रपटगृहापर्यंत येण्यास भाग पाडलं. की बघा मराठी चित्रपट बघा.’ असं म्हणत अशोक सराफांनी लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण काढत त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
“ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट”
पद्मश्री पुरस्कार मिळण्याविषयी विचारलं असता अशोक सराफ म्हणाले, ‘माझा एकंदर आतापर्यंतचा जो प्रवास आहे. मी करिअरसाठी जे समर्पित केलं होतं त्यावर झालेला हा शिक्कामोर्तब आहे. याचा मला फार आनंद झाला. लोकांनी त्याचं कौतुक करावं ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे.’ असं म्हणत त्यांनी सर्वांचे आभारही व्यक्त केले.
पद्मश्री मिळण्यासाठी उशिर झाला का?
पद्मश्री पुरस्कार मिळण्यासाठी उशीर झाला का? असंही त्यांना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होती. तेव्हा त्यावर उत्तर देताना अशोक सराफ म्हणाले, ‘उशीर झाला असं वाटत नाही. त्याचेही काही निकष असतील. माझ्यापेक्षा चांगले लोक त्यांना आधी भेटले असतील.तो क्रम लागलेला असावा. त्यामुळे त्यांना आधी मिळणं हे सहाजिक आहे. मला आनंद आहे की मला मिळाला कारण मिळणं हे महत्त्वाचं आहे.’
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List