‘अकबराचे लग्न जोधाबाईंशी नाही तर दासीच्या मुलीशी झाले होते’, राजस्थानच्या राज्यपालांचा अजब दावा
उदयपूरमध्ये महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त एका सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे उपस्थित होते. यावेळी त्यांनी इतिहासाबद्दल मोठे धाडसी विधान केले आहे. ब्रिटिश इतिहासकारांमुळे हिंदुस्थानातील इतिहासात अनेक चुकीच्या आणि खोट्या माहितींची नोंद झाली असल्याचे बागडे यांनी म्हटले आहे. यामध्ये जोधाबाई आणि मुगल सम्राट अकबर यांची लग्नकथा याचाही समावेश असल्याचे म्हटले आहे.
उदयपूर येथील कार्यक्रमात बोलताना हरिभाऊ बागडे यांनी इतिहासावरच काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. अकबरनाम्यात जोधा आणि अकबराच्या लग्नाचा कोणताही उल्लेख नाही. जोधा आणि अकबर यांचे लग्न झाले होते. त्यावर एक चित्रपटही बनवण्यात आला होता. ऐतिहासिक पुस्तकांमध्येही याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. परंतु हे सर्व चुकीचे असून, भारमल नावाच्या राजाने आपल्या एका दासीच्या मुलीचे लग्न अकबराशी लावून दिले होते. असे विधान यावेळी बागडे यांनी केले.
राज्यपालांच्या या वक्तव्यामुळे अकबर आणि जोधा यांच्या लग्नाच्या ऐतिहासिक तपशीलांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आपल्याकडील अनेक शूर वीरांचा इतिहास ब्रिटिशांनी बदलला. हा बदललेला इतिहास त्यांनी त्यांना हवा तसाच लिहीला असेही यावेळी बागडे म्हणाले. आपल्याकडे आजही ब्रिटीशांनी लिहिलेल्या ऐतिहासिक गोष्टींचे दाखले दिले जातात, असेही बागडे यांनी वक्तव्य केले.
दरम्यान हरिभाऊ बागडे यांनी राजपूत शासक महाराणा प्रताप यांनी अकबराला लिहिलेल्या करार पत्राच्या दाव्यालाही विरोध केला आणि तो पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले. महाराणा प्रताप यांनी कधीही त्यांच्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. आपल्या इतिहासात अकबराबद्दल जास्त आणि महाराणा प्रतापांबद्दल कमी शिकवले जाते. महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराज हे देशभक्तीचे प्रतीक होते. दोघांच्या जन्मात 90 वर्षांचे अंतर आहे. जर ते समकालीन असते तर देशाचा इतिहास वेगळा असता, असे हरिभाऊ म्हणाले आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List