आजवर कधीही न घडलेला चमत्कार; ‘जय जय स्वामी समर्थ’मध्ये अनपेक्षित वळण
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारा एक क्षण उलगडणार आहे.
गणिकेची मुलगी असलेली दत्तभक्त कृष्णावर गावकऱ्यांनी चारित्र्यहननाचे आरोप करत थेट तिच्या मृत्युदंडाची मागणी केली आहे.
गावाची पंचायत, गावकरी आणि त्याच्या भयंकर रागाला सामोरी जाणारी कृष्णा विवशतेने ढासळते आणि स्वामींकडे मागणी करते की, “माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले, मला बदनाम केलं. माझी पात्रताच नाही जगण्याची. मला मृत्युदंड द्या.”
अशा स्थितीत कृष्णा थेट देवीच्या मूर्तीपाशी धाव घेते, तिथून त्रिशूळ उचलते आणि तो स्वतःच्या पोटात खुपसते आणि त्याचक्षणी स्वामी लीला घडते आणि स्वामी समर्थांचा आवाज घुमतो.
“जे आयुष्य आमच्या चरणी वाहिलंस ते संपवण्याचा अधिकार तुला दिला कुणी?” असा आवाज येतो. कृष्णा अवाक् होऊन आजूबाजूला पाहते.
मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यातून पुरुषभर उंचीच्या दत्त चिन्हांचं तेजस्वी प्रकट रूप दिसू लागतं. दिगंबरा दिगंबराचा जप घुमत असताना ही सर्व चिन्हं एकत्र येऊन, तेजाच्या लहरीतून स्वामी समर्थ प्रकट होतात आणि जाहीर घोषणा करतात.
“तुझी पात्रता तुला आणि गावाला आम्ही दाखवतो”, स्वामींची ही घोषणा या कथानकाला एक वेगळंच वळण देते आणि संपूर्ण गावाला हादरवून टाकणारं सत्य पुढे आणण्याचा संकेत देते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List