संध्याकाळच्या वाढीव मतदानाची याचिका हायकोर्टाने फेटाळली, 6 नंतरच्या मतदानाची आकडेवारी उघड करण्याचे आदेश आयोगा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत संध्याकाळी 6नंतर झालेल्या मतदानाचा संपूर्ण तपशील उघड करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. ही मागणी करणारी रिट याचिका न्यायालयाने बुधवारी फेटाळून लावली.
न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरीफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने 27 पानी हा निकाल दिला. संध्याकाळी 6 नंतर मतदान झाल्याचे वृत्त एका वर्तमानपत्राने दिले. त्या आधारावर ही याचिका करण्यात आली होती. या मतदानाची ठोस कागदपत्रे सादर झाली नाहीत. राजकीय मते व एका वृत्ताच्या आधारे निवडणूक आयोगाला माहिती सादर करण्याचे आदेश देता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
विक्रोळी येथील चेतन आहिरे यांनी अॅड. संदेश मोरे यांच्यामार्फत ही याचिका केली होती. संध्याकाळी 6नंतर तब्बल 76 लाख मतदान झाले. मात्र याचा तपशील निवडणूक आयोगाकडे नाही. तशी कबुली आयोगाने माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीत दिली. परिणामी संध्याकाळी 6नंतर झालेल्या मतदानाचा तपशील उघड करण्याचे आदेश न्यायालयाने आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.
कोर्टाला विधानसभा बरखास्तीचा अधिकार
विधानसभा निवडणुकीचे मतदान पारदर्शकपणे झाले नसल्याचे सिद्ध झाल्यास न्यायालयाने विधानसभाच बरखास्त करावी. तसा न्यायालयाला अधिकार आहे, असा जोरदार युक्तिवादही अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला होता.
कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही
विधानसभा निवडणुकीच्या मतदानात अनुचित प्रकार घडल्याची कोणतीही माहिती सादर झालेली नाही. त्यामुळे बोगस मतदान झाले हे ओळखणे कठीण आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List