IMD Rain Forecast : पुढील 48 तास धोक्याचे, महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हाय अलर्ट
यंदा देशासह महाराष्ट्रात मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला आहे, सध्या अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाकडून आता पुन्हा एकदा पुढील तीन दिवस अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिमेकडून जोरदार वारे वाहणार असून, त्याचा परिणाम म्हणजे केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार 31 मे, 1 जून आणि 2 जून रोजी केरळसह, पश्चिम बंगाल, सिक्कीम या राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस गोवा, कर्नाटक, तामिळनाडू, आणि महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर पावसाचा जोर काहीसा कमी होईल असा अंदाज आयएमडीनं वर्तवला आहे.
कुठे -कुठे पावसाचा इशारा?
हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील दोन दिवस महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, महाराष्ट्रामध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, तर ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, जळगाव आणि नाशिक या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. महाराष्ट्रासोबतच आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोरम, त्रिपूरा, पश्चिम बंगाल, सिक्किम आणि ओडिशामध्ये देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रात पूरस्थिती नियंत्रणात
राज्यात सर्व जिल्ह्यात पावसाची नोंद झालेली आहे. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आला होता. मात्र सध्यास्थितीत पूर परिस्थिती नियंत्रणात असून कुठेही पूर आल्याची घटना घडलेली नाहीये. राज्य आपत्कालीन कार्य केंद्र सर्व जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रांच्या सातत्याने संपर्कात आहे.पूर परिस्थिती बाबत उपाय योजना म्हणून प्रशासनातर्फे एनडीआरएफ व एसडीआरएफ यांना आपत्कालीन परिस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List