कुलाबा आपले नाही! आमची मुंबई घाटकोपर, मालाड, ठाण्यात!! सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यातील सामान्य मुंबईकर बोलला
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी ‘आमची मुंबई’ व ‘त्यांची मुंबई’ यातील अंतरावर बोट ठेवत मार्मिक टिप्पणी केली. कुलाब्यात ‘त्यांची मुंबई’ (उच्चभ्रू लोकांची) राहते, तर ‘आमची मुंबई’ (सर्वसामान्यांची) मालाड, ठाणे, घाटकोपरमध्ये राहते, असे सरन्यायाधीश म्हणाले. तथापि, आपण गेट वे ऑफ इंडियाजवळील प्रवासी जेट्टी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर कोणतेही भाष्य केलेले नाही, असे स्पष्टीकरण सरन्यायाधीशांनी गुरुवारी दिले.
गेट वे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीचे बांधकाम करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. ती याचिका सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन मसीहा यांच्या खंडपीठाने फेटाळली. हे ‘आमची मुंबई’ आणि ‘त्यांची मुंबई’ यांच्यातील प्रकरण आहे, असा युक्तिवाद ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी केला होता. त्यावर ‘आमची मुंबई’ कुलाब्यात राहत नाही. ही केवळ ‘त्यांची मुंबई’ आहे, जे कुलाब्यात राहतात. ‘आमची मुंबई’ मालाड, ठाणे, घाटकोपरमध्ये राहते, अशी टिप्पणी सरन्यायाधीशांनी केली.
याचिकाकर्त्यांचे म्हणणे काय?
संरक्षित वारसा स्थळ असलेल्या गेट वे ऑफ इंडियाच्या शेजारी प्रवासी जेट्टी व टर्मिनलचे बांधकाम करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. वाहतूक पोलिसांनी गर्दी, वाहतूककाsंडीचा विचार न करता, स्थानिक रहिवाशांना सूचना न देता, म्हणणे ऐकून न घेता जेट्टी बांधकामाला ‘एनओसी’ दिली. जेट्टी बांधकामाचा निर्णय बेकायदेशीर आहे, असा दावा क्लीन अॅण्ड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशनने केला आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयापुढे उन्हाळी सुट्टीनंतर सुनावणी होणार आहे.
सर्वांना सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प हवा आहे, पण माझ्या अंगणात नको. शहरात काही चांगले घडत असेल तर सर्वजण कोर्टाचे दार ठोठावतात. तुम्हाला माहीत आहे, कोस्टल रोडचा किती फायदा झाला? दक्षिण मुंबईतील व्यक्ती 40 मिनिटांत वर्सोव्यात पोहोचते. पूर्वी यासाठी तीन तास लागायचे, असे मत सरन्यायाधीशांनी व्यक्त केले.
जेट्टी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर भाष्य नाही; कोर्टाचे स्पष्टीकरण
क्लीन अॅण्ड हेरिटेज कुलाबा रेसिडेंट्स असोसिएशनतर्फे ज्येष्ठ वकील संजय घोष यांनी गुरुवारी बाजू मांडली. ‘आमची मुंबई’ व ‘त्यांची मुंबई’ यासंबंधित निरीक्षणाचा कोणताही प्रभाव पडू न देता उच्च न्यायालयाने निर्णय द्यावा, अशी अपेक्षा अॅड. घोष यांनी व्यक्त केली. त्यावर सरन्यायाधीशांनी आपण प्रवासी जेट्टी प्रकल्पाच्या गुणवत्तेवर कोणतेही भाष्य केलेले नाही, असे स्पष्ट करतानाच ते ‘आमची-त्यांची’ नव्हे, तर ‘आमची-तुमची’ आहे, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी पुन्हा केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List