Pandharpur Wari 2025 – VIP दौऱ्यांमुळे भाविक अन् प्रशासन हैराण, वारीच्या नियोजनापेक्षा सरबराईत चालला वेळ
आषाढी वारीचा सोहळा जसजसा जवळ येतोय तसतसे आमदार, खासदार आणि मंत्र्यांच्या विठ्ठल भक्तीला उधाण येऊ लागले आहे. वारी नियोजनाचा आढावा असे निमित्त साधून नित्यनियमाने रोज कोणी ना कोणी व्हीआयपी पंढरपूर दौऱ्यावर आहेच. याचा दर्शन रांगेतील भाविकांना फार मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय वारीच्या नियोजनात गुंतलेल्या अधिकाऱ्यांची ससेहोलपट होताना दिसते. मंत्र्यांच्या या अनाकलनीय दौऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी वेळीच आवर घालावा, अशी वारकऱ्यांनी मागणी केली आहे.
आषाढी वारीचा सोहळा अवघ्या आठवडाभरावर आला आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना आवश्यक त्या मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यासाठी शासकीय यंत्रणेची दमछाक होत असताना रोज व्हीआयपींचे दौरे येत आहेत. वारीच्या नियोजनाचा आढावा घेण्याचे निमित्त करुन आलेली ही राजकीय मंडळी आढावा घेऊन आल्या पावलांनी परतीचा रस्ता धरत नाहीत. तर ते थेट शॉर्टकट मार्गाने श्री विठ्ठल रखुमाईचे दर्शनाला जातात. या राजकीय व्हीआयपी नेत्यांसोबत त्यांचे पाच पन्नास कार्यकर्ते देखील दर्शनासाठी मंदिरामध्ये घुसखोरी करीत करतात. मंदिरातील या राजकीय घुसखोरीमुळे पोलीस, मंदिर प्रशासन आणि नेते यांच्यात रोज शाब्दिक चकमकी झडत आहेत. व्हीआयपीचे दर्शन आणि त्याचा यथोचित सत्कार यातच शासकीय यंत्रणेचा वेळ वाया चालला आहे. या राजकीय घुसखोरांचा त्रास केवळ प्रशासनाला नाही तर, रांगेत अनेक तास तिष्ठत उभ्या असणाऱ्या वयोवृद्ध भाविकांना देखील आहे. वारीच्या तोंडावर कामांचा आढावा घेण्याची नौटंकी करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्याला मुख्यमंत्र्यांनी वेळीच रोखले नाही तर, भाविकांच्या सेवा सुविधांमध्ये कसूर होऊ शकतो.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List