मराठीचा झेंडा हाच अजेंडा… हिंदीसक्ती विरुद्ध सगळे एकत्र! ही तर भाषिक आणीबाणी ; उद्धव ठाकरे यांचा हल्ला
आणीबाणीला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने काळा दिवस साजरा करणाऱया भाजपकडून महाराष्ट्रात हिंदी सक्ती करून भाषिक आणीबाणी लादण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा डाव शिवसेना यशस्वी होऊ देणार नाही. हिंदी सक्तीविरुद्ध मराठीप्रेमींनी राज्यभर आंदोलन सुरू केले आहे. मराठीचा झेंडा हाच अजेंडा… हिंदी सक्तीविरुद्ध सगळे एकत्र! ही भूमिका घेत शिवसेनादेखील सर्व ताकदीनिशी या आंदोलनात उतरणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली.
राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याचे फर्मान महायुती सरकारने काढले आहे. याविरोधात राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनांना शिवसेनेच्या शक्तीची जोड मिळावी यासाठी शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीच्या पदाधिकाऱयांनी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मराठी भाषेसाठी होणाऱया प्रत्येक आंदोलनाला शिवसेनेचा सक्रीय पाठिंबा असेल असे अभिवचन उद्धव ठाकरे यांनी दिले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्रातील भूमिपुत्र मराठी माणसावर होणाऱया अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीच शिवसेनेचा जन्म झाला. मराठी अस्मिता जोपासणारी शिवसेना कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही. पण इतर भाषेची सक्ती मात्र महाराष्ट्रावर लादू देणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी यावेळी ठणकावून सांगितले.
गद्दार मिंधेंना मराठीतून सांगण्याची वेळ
महाराष्ट्रावर हुकूमशाही लादण्यासाठीच भाजपला शिवसेना संपवायची आहे हे आता मराठी माणसाला कळून चुकलेय. हिंदी भाषेच्या सक्तीचा म्हणजे भाजपच्या भाषिक आणीबाणीचा शिवसेना विरोध करत आहे. पण शिवसेनेतले जे गद्दार मिंधे म्हणून तिथे राहत आहेत त्यांनासुद्धा बाळासाहेबांचे विचार काय आहेत हे मराठीतून सांगण्याची वेळ आलेली आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मिंधे गटाला ठणकावले.
मराठी भाषेच्या सुपुत्रांनो, आंदोलनात सहभागी व्हा
तमाम मराठी माणसांनी पक्षीय भेदाभेद विसरून या लढय़ात सामील व्हावे. चित्रपटसृष्टीतील विशेषतः मराठी कलाकार, खेळाडू, साहित्यिक आणि वकील अशा मराठी भाषेच्या सुपुत्रांनी या आंदोलनात उतरले पाहिजे. ज्यांच्या हृदयात मराठी आहे, ज्यांची मातृभाषा मराठी आहे त्यांनी आणि अगदी भाजपमधल्या अस्सल मराठी माणसांनीही या लढय़ात उतरावे, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले.
कानडीची सक्ती होते तेव्हा कुठे जाते सूत्र
1960 साली त्रिभाषा सूत्र आलं, हे सूत्र देशातील किती राज्यांत राबवलं जातं? गुजरातमध्ये हिंदी शिकवलं जातं का, तामीळनाडू, कर्नाटकात शिकवताहेत का. त्रिभाषा जर असेल तर कर्नाटकात आमचे लोक मराठी बोलतात, त्यांना मातृभाषेची आस असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल का होतात? त्यांना कानडीची सक्ती का केली जाते. त्यांच्यावर राजद्रोहाचे गुन्हे का टाकले जातात. तेव्हा कुठे जातं तुमचं सूत्र? असा संतप्त सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
मराठी सक्तीच्या कायद्याचे काय?
मराठी माणसांनंतर मराठी भाषेवरही अतिक्रमण होऊ लागल्याने महाविकास आघाडी सरकारच्या काळात नाईलाजाने मराठी भाषेची सक्ती करावी लागली होती. दुकानाच्या पाटय़ा मराठी असल्या पाहिजेत. मराठी भाषा व्यवहारात आली पाहिजे, अशी ती सक्ती होती. पण त्याहीविरोधात काही लोक कोर्टात गेले होते. ते कुणाचे पाठीराखे होते हे आता उघड झाले आहे. महायुती सरकारने मराठी सक्तीच्या कायद्याची अंमलबजावणी केली काय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
भाजपने निवडणुकीपूर्वी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणा केली. आता बाटेंगे तो काटेंगे असे त्यांचे धोरण आहे. मुंबई-महाराष्ट्रात मराठी माणसे आणि इतर भाषिकांमध्ये जो एकजिनसीपणा आहे त्यात भाजपवाले मिठाचा नव्हे विषाचा खडा टाकताहेत.
महाराष्ट्रद्रोही सरकारकडून कारण नसताना हिंदीची सक्ती केली जात आहे. त्याला विरोध करण्यासाठी सर्व मराठी माणसे पक्षीय भेदाभेद विसरून एकत्र यावीत यासाठी हे आवाहन आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List