डिंभे धरणाची पाणीपातळी घटली अन् धरणग्रस्तांची पावले जुन्या गावाकडे वळली

डिंभे धरणाची पाणीपातळी घटली अन् धरणग्रस्तांची पावले जुन्या गावाकडे वळली

आंबेगाव, जुन्नर, शिरूर तालुक्यांसह नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदा तालुक्यांना वरदान ठरलेले आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाची पाणीपातळी 12 टक्के झाल्याने धरणाच्या बुडीत क्षेत्रातील आंबेगाव हे गाव पुन्हा दृष्टिक्षेपात पडू लागले आहे. त्यामुळे या गावातील रहिवासी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत, या गावाला भेटी देत आहेत.

डिंभे धरण होण्याअगोदर अनेक वाड्यावस्त्यांसह आंबेगाव हे तालुक्याचे ठिकाण होते. डिंभे धरणाच्या बांधणीनंतर या गावातील लोकांना आपलं घरदार, शेती सारं सोडावं लागलं. आजही बुडीत आंबेगावच्या गावठाणमधील घरणाचे पाणी कमी होते. त्यावेळी तेव्हाच्या गावातील गावकऱ्यांना आपले हसतं-खेळतं, नांदत्या गावाचा आज दिसणारा ढिगारा पाहून काळजाचं पाणी पाणी होतं. आजही वृद्ध विटांची बांधकाम केलेली विहीर.

माणसांच्या डोळ्यांपुढे या आठवणी जशाच्या तशा जागृत आहेत. या धरणाच्या उभारणीनंतर अनेक गावे, वाड्यावस्त्या विस्थापित झाल्या. इतकी वर्षे गावात राहिलेल्या या लोकांना गाव सोडावे लागले. आंबेगावचे गावठाण हे 150 घरांचे होते. तर गावाला कोकणेवाडी व कानसकरवाडी या दोन वाड्या होत्या. आंबेगावला असणाऱ्या जिल्हा परिषद शाळेसह सातवीपर्यंत शिक्षण दिले जात होते.

शाळेच्या मालकीची 4 ते 5 एकर जमीन होती. या शाळेला शेतीमूल शाळा म्हणत. मुले या शेतात श्रमदान करत असत. या ठिकाणी वसतिगृहाची सोयही होती. गावात असणाऱ्या शिवशंकर विद्यालयात इयत्ता 5 ते 10 पर्यंत शिक्षण होते, ते आता तळेघरला हलविण्यात आले आहे. आरोग्य केंद्र व पोलीस औट पोस्टही या ठिकाणी होते. आंबेगावात दळणवळणासाठी सकाळी 9 वाजता मुंबई एसटी गाडी व दुपारी 1.30वाजता टपाल एसटी गाडी गावात येत होती. चांगला रस्ता नसल्याने फारच थोडे लोक त्यावेळी श्री क्षेत्र भीमाशंकरला जात होते. आंबेगावची बाजारपेठ ही त्यावेळी रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दीड किलोमीटर अंतरापर्यंत भरत असे. शिमग्याच्या (होळी) बाजार हा दोन ते तीन दिवस चालत होता. मोठ्या प्रमाणात येथे व्यापारी व आदिवासी घरे होती. त्यावेळी आदिवासींची देवाणघेवाण पैशाऐवजी वस्तुरुपातच होत होती.

आंबेगावबरोबरच इतरही अनेक गावे, वाड्या-वस्त्या या डिंभे धरणामुळे विस्थापित झाल्या. वचपे येथे असलेले व घोडनदीच्या संगमावरील सिद्धेश्वर मंदिरही या घरण जलपात्रात बुडीत झाले. आंबेगाव गावठाणात महादेव, मारुती व मुक्ताबाई मंदिरांबरोबरच जैन समाजाचे सुंदर मंदिरही आज इतकी वर्षे पाण्याचा मारा सोसत हे जैन मंदिर उभे आहे. विस्थापित होताना येथील जैन मंदिरातील मूर्ती तळेगाव स्टेशन (ता. मावळ) येथे हलविण्यात आल्या. घोडनदीला असणाऱ्या गावाजवळच्या असणाऱ्या डोहाला बाराही महिने असणारे पाणी गावाला पुरत असे. त्याचबरोबर विहिरी व आड गावात होत्या. आज पाण्याचा मारा सोसत उभे असलेले जैन मंदिर व मंदिराभोवती पूर्ण गावठाणात पडलेले विटांचे ढीग, तेलाच्या घाण्यांचे अवशेष आणि देवतांच्या मूर्ती, शंकराच्या पिंडी, झाडांची खोडे आजही जुन्या आंबेगावच्या आठवणी जाग्या करून विस्थापितांच्या डोळयांत पाणी आणतात.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;