नगर अर्बन बँकेच्या ठेवीदारांना 50 टक्के रक्कम देण्यास परवानगी; राजेंद्र चोपडा यांची माहिती
नगर अर्बन को-ऑप. मल्टिस्टेट बँकेच्या ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. बँकेत 5 लाखांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी असलेल्या सुमारे 1900 हून अधिक ठेवीदारांना 50 टक्के रक्कम परत देण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तसेच केंद्रीय निबंधक विभागाने परवानगी दिली आहे. जुलै महिन्यात पहिल्या पंधरवडय़ात सदर रक्कम ठेवीदारांना दिली जाणार आहे, अशी माहिती बँकेचे सभासद राजेंद्र चोपडा यांनी दिली आहे.
राजेंद्र चोपडा यांनी सांगितले की, नगर अर्बन बँकेतील आर्थिक घोटाळ्यामुळे बँकेचा बँकिंग परवाना रद्द करण्यात आला आहे. बँकेत सर्वसामान्य ठेवीदारांच्या ठेवी अडकल्या आहेत. सदर ठेवीदारांना न्याय मिळवून देण्यासाठी माझ्यासह बँक बचाव कृती समितीचे ऍड. अच्युत पिंगळे, राजेंद्र गांधी, सीए राजेंद्र काळे असे काहीजण पाठपुरावा करीत आहेत. पाठपुरावा केल्याने आता 5 लाखांपेक्षा अधिक ठेवी असलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बँकेचे प्रशासक तथा अवसायक गणेश गायकवाड तसेच काही अधिकारी थकीत कर्जवसुली विशेष परिश्रम घेत आहेत. बँक बचाव कृती समितीही यासाठी वेळोवेळी पाठपुरावा करीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत मिळत आहेत.
अजूनही सुमारे 550 ठेवीदारांनी ठेवी परत मिळण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यांनी बँकेच्या नगर शहरातील मुख्य शाखेत संपर्क साधावा आणि केवायसीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी. तसेच या गुह्यात फॉरेन्सिक ऑडिटनुसार 105 आरोपी निष्पन्न झाले आहेत. या सर्वांची सखोल चौकशी करून खऱ्या दोषींना जेलमध्ये टाकले पाहिजे. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांसह आर्थिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठांजवळ वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे. याशिवाय जामिनावर सुटका झाली म्हणून स्वतःला निर्दोष समजणाऱ्या संचालकांनी ठेवीदारांना संभ्रमात टाकण्याचे उद्योग बंद करावेत तसेच थकीत कर्जे वसुलीसाठी पावलं उचलली पाहिजेत, असे चोपडा यांनी म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List