ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार; जोर्वे ग्रामस्थ आक्रमक; पंचायत समितीवर भव्य मोर्चा आमरण उपोषण करणार
मागील तीन वर्षांपासून जोर्वे ग्रामपंचायतवर विखे गटाची सत्ता असून, आतापर्यंत लाखो रुपयांच्या वस्तूची खरेदी दाखवली दिली गेली आहे. मात्र, या वस्तू गावात आलेल्या नाहीत. याचबरोबर अनागोंदी कारभार करत मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल न घेतल्याने गावकऱ्यांनी आज पंचायत समितीवर घेराव आंदोलन करून या भ्रष्टाचाराचे वाभाडे काढले. याचबरोबर पुढील एक महिन्यामध्ये चौकशी न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे.
जोर्वेमधील भ्रष्टाचाराविरोधात कोणतीही कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी आज पंचायत समितीला घेराव घातला. यावेळी उपसरपंच बादशहा बोरकर, माणिक यादव, सुरेश थोरात, अण्णासाहेब थोरात, हौशीराम दिघे, किसन खैरे, दिगंबर इंगळे, संदीप काकड, मुकेश काकड, रावसाहेब दिघे, राजेंद्र थोरात, रावसाहेब नाना काकड, बाळासाहेब चव्हाण, जालिंदर जोर्वेकर, सागर यादव, राजू बलसाने, संजय थोरात, सुखदेव चव्हाण, डॉ. प्रवीण काकड, अमोल क्षीरसागर, विद्रोही संघटनेचे अध्यक्ष भास्कर बर्डे यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जोर्वे हे गाव संगमनेर तालुक्यातील राजकीयदृष्टय़ा अत्यंत संवेदनशील असून, या गावामध्ये सध्या विखेप्रणित आघाडीची सत्ता आहे. मात्र, मागील तीन वर्षांमध्ये ग्रामपंचायतमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून, अनागोंदी कारभार झाला आहे. लाखो रुपयांच्या वस्तू खरेदी झाल्या असून, त्या वस्तू गावांमध्ये आलेल्या नाहीत. याचबरोबर अनेक कामांमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. रस्त्याच्या कामाचे फोटो दुसरेच दाखविले आहेत. तसेच फोटोत दर्शविलेले रस्ते पूर्वीचेच शेतकऱ्यांनी स्वखर्चाने केलेले आहेत. यामध्ये जवळपास 19 लाखांचा अपहार झालेला आहे. लेबर चार्जेस, झाडेझुडपे काढणे, यांचे मोजमाप व मुरुम दबाई यांचे आकडे विसंगत आहेत. रस्त्यांची कामे दाखवली आहेत, मात्र ते रस्ते झालेले नाहीत. लाखो रुपयांची बाकडे खरेदी झाली असून, ती दिसत नाहीत. या भ्रष्टाचार व अनागोंदी कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, राजकीय दबावातून कोणतीही कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थ हतबल होऊन पंचायत समितीवर दाखल झाले.
यावेळी ग्रामस्थांनी एकमुखी मागणी करत तातडीने झालेल्या सर्व भ्रष्टाचाराची निःपक्षपातीपणे चौकशी करावी व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. राजकीय वरदहस्त लाभलेल्या या मंडळींनी गोरगरिबांचे व आदिवासींचे पैसे लाटून मोठा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला. जुलै महिन्यामध्ये या संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी होऊन दोषींवर कारवाई झाली नाही तर पंचायत समितीसमोर संपूर्ण गाव आमरण उपोषण करेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. गटविकास अधिकारी ठाकुर व विस्तार अधिकारी कासार यांनी गावकऱ्यांचे निवेदन स्वीकारले.
नागरिकांच्या आक्रमकतेपुढे सत्ताधारी गोंधळले
जोर्वे ग्रामपंचायतमधील भ्रष्टाचाराविरोधात ग्रामसभेमध्ये नागरिकांनी आवाज उठवला. भ्रष्टाचाराची मोठी यादीच वाचली, यावर कोणतेही उत्तर न मिळाल्याने ग्रामसेवक व सरपंचांविरुद्ध ग्रामस्थ वेळोवेळी आक्रमक झाले. मात्र, सत्ताधाऱ्यांनी राजकीय वरदहस्तातून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. या विरोधात ग्रामस्थांनी पंचायत समितीला घेराव घातला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List