एका कंत्राटातून ज्यांना 3 हजार कोटींची लाच मिळते, त्यांच्याकडून राज्याच्या सेवेची काय अपेक्षा करणार? संजय राऊत यांचा सवाल
पैशांचा गैरवापर, आमदारस खासदार विकत घेत, ईडीचा धाक दाखवत राज्यात सत्ता स्थापन करण्यात आली आहे. बळी दिल्याने सत्ता आले, असे काहीजण सांगत आहे, ही अंधश्रद्धा आहे. तसेच बळी दिल्याने काहीही होत नाही, ही सत्ता त्यांनी ईडीचा धाक दाखवत आणि पैशांनी मिळवली आहे. मिंधे आणि त्यांचा गट यांची अवस्था भाजपच्या आश्रितसारखी झाली आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
पैसा, प्रसिद्धी, सत्ता मिळण्यासाठी आणि शत्रूंचा नाश होण्यासाठी मिंधे आणि त्यांच्या गटाच्या नेत्यांनी गुवाहाटीत मोठ्या प्रमाणात बळी चढवले. मात्र, असे कही केल्याने पैसा आणि सत्ता मिळते, ही अंधश्रद्धा आहे. आपण पुरोगामी आणि संत गाडगेबाबा यांनी शिकवणूक दिलेल्या महाराष्ट्रात राहतो. आपल्याला ही अंधश्रद्धा आहे, हे समजते. अशाप्रकारे बळी दिल्याने सत्ता मिळत नाही. राज्यात त्यांना ईडीची भीती आणि मोठ्या प्रमाणात पैशांचा दुरुपयोग यामुळेच सत्ता मिळाली आहे, असेही ते म्हणाले.
सत्ता आणि पैसा मिळण्यासाठी त्यांनी हे प्रकार केले, मात्र, आज त्यांची अवस्था बिकट झाली आहे. ते आता भाजपचे आश्रित आहेत. ते कोणत्याही प्रकारे स्वाभिमानाचे बंड करू शकत नाहीत. मुंबईची बोलीभाषा हिंदी आहे, असे विधान मिंधेंच्या एका नेत्याने केले आहे. ही स्वाभिमानी मराठी माणसाचे वक्तव्य नाही. ही आश्रितांची भाषा आहे. मराठी भाषेबाबत अशी वक्तव्ये म्हणजे ते आश्रित असल्याने दबावाखाली ते बोलत आहेत. मराठी माणसाची भाषा हीच मुंबईची भाषा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा हीच महाराष्ट्राची भाषा आहे, याचा त्यांना विसर पडला आहे, असेही संजय राऊत यांनी मिंधे आणि त्यांच्या गटाला फटकारले.
एकनाथ शिंदे यांचा सगळ्यांनी कचरा केला आहे, ते लवकरच जाणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे 3 हजार कोटी लाचेचे प्रकरण उघड केले आहे. एका कंत्राटातून ज्यांना 3 हजार कोटींची लाच मिळते, त्यांच्याकडून राज्याच्या सेवेची काय अपेक्षा करणार, असा सवालही त्यांनी केला. कचऱ्यापासून चिखलापर्यंत ते सर्वत्र पैसे खात आहेत. त्याच पैशातून हे सरकार स्थापन झाले आहे, असा हल्लाही त्यांनी चढवला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List