किल्ले विशाळगडावर पर्यटक, भाविकांची रीघ, कडक पोलीस बंदोबस्त; गाड्यांसह भाविकांची नोंद घेऊनच प्रवेश
किल्ले विशाळगडावरील हजरत सय्यद मलिक रेहान बाबा उरूसाला प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी गडावर येण्या-जाण्यास सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत परवानगी देण्यात आल्याने आज पहाटे पाचपासूनच पर्यटक आणि भाविकांनी विशाळगडावर जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, विशाळगड परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक बंदोबस्तामुळे गडाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. पोलिसांकडून केंबूर्नीवाडी फाटा परिसरातून प्रत्येक गाडीची तपासणी करून प्रत्येक वाहनांसह पर्यटक आणि भाविकांची नोद घेवूनच गडावर सोडत होते.
किल्ले विशाळगड येथे आजपासून सुरू होणाऱ्या हजरत सय्यद मलिक रेहान बाबा दर्ग्यात साजरा होणाऱ्या उरूसाला विरोध करुन, हिंदुत्ववादी संघटनांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. गेल्यावर्षी विशाळगडावरील वादग्रस्त अतिक्रमणांवरून झालेल्या दंगलीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने विशाळगडावर उरूस साजरा करण्यास बंदी घातली होती. पण दर्गा ट्रस्टने गडावरील खासगी जागेत कुर्बानीला परवानगी मागितल्याने मुंबई उच्च न्यायलयाने अटींसह गडावर सकाळी 9 ते 5 यावेळेत परवानगी दिली होती. त्यानुसार प्रशासनाने गडावरील रहिवाशांना कुर्बानीसाठी जागा व वेळ ठरवून देत कुर्बानीनंतर त्या जागेची स्वच्छता करणे, अवशेषांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी संबंधितांना देण्यात आली. तसेच प्रत्येक ठिकाणावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी करडी नजर ठेवली.
दरम्यान, हिंदुत्ववादी संघटनांच्या आक्रमक पवित्र्यानंतर एकिकडे विशाळगडावर कोणताही सण-उत्सव साजरा करण्यास जिल्हा प्रशासनाने मज्जाव केला. पण पर्यटक आणि भाविकांना गडावर जाण्यासाठी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली. गडावर कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर शाहुवाडी तहसीलदारांकडून 15 जूनपर्यंत विशाळगड परिसरात बंदी आदेश काढण्यात आला. काल बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर गडावर एकही कुर्बानी झाली नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पण आजपासुन गडावर हजरत सय्यद मलिक रेहान बाबा उरूसाला सुरुवात झाली. यासाठी पहाटे पाचपासूनच भाविकांनी विशाळगडावर जाण्यासाठी गर्दी केली.
शिवराज्याभिषेक दिनाला परवानगी नाही
सोमवारी तिथीप्रमाणे ऐतिहासिक किल्ले विशाळगडावर शिवराज्याभिषेकदिन साजरा करण्यासाठी मराठा तितुका मेळवावा संघटनेने पुरातत्व विभागाकडे परवानगी मागितली होती. पण ‘सद्यस्थितीत विशाळगडावरील परिस्थिती संवेदनशील असून, कायदा-सुव्यवस्था विचारात घेऊन हा किल्ला राज्य संरक्षित स्मारक असल्याने संघटनेला सोहळ्यासाठी परवानगी देता येणार नाही’, असे लेखी पत्र पुरातत्व विभागाने संघटनेचे अध्यक्ष रणजित घरपणकर यांना दिले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List