नगर जिल्हा वार्तापत्र – वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांचे जगणे झाले मुश्कील
>> मिलिंद देखणे
अहिल्यानगर जिल्हा हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्याने अनेक जिल्ह्यांमधून या ठिकाणी नागरिक येत-जात असतात. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यात अनेक गुंडांचे वास्तव्य असल्याचे अनेक घटनांतून समोर आले आहे. या जिल्ह्यामध्ये आता नव्याने जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे मात्र नगर जिल्ह्यामधील अवैध धंदे आणि गुन्हेगारांना आळा बसून व सर्वसामान्य लोकांना अगदी सहज शक्य जीवन जगता येईल, यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. त्यादृष्टीने पोलिसांना काम करावे लागणार आहे. नगर जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.
नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तीर्थक्षेत्रे आहेत. शिर्डी असेल, शनिशिंगणापूर असेल अथवा पाथर्डी तालुक्यातील अन्य काही महत्त्वाची देवस्थाने आहेत. या ठिकाणी नागरिकांची नेहमीच रेलचेल असते. विशेष म्हणजे सहा जिल्ह्यांच्या सीमा या जिल्ह्यालगत आहेत. एवढेच नाही, तर आता मध्य प्रदेश असो अथवा बंगळुरू असो, की दुसरीकडे महत्त्वाचे असे प्रदेश असो, त्याला जोडणारा मध्यमार्ग म्हणजे अहिल्यानगर जिल्हा आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यामधून अवजड वाहनांचे दळणवळण मोठ्या प्रमाणामध्ये आहे. दुसरीकडे जिल्ह्यामध्ये गुन्हेगारांचा शिरकाव थांबायला तयार नाही. जिल्ह्यामध्ये गावठी कट्टे, तर कधीही आणि कुठेही मिळतात, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यात आता नव्याने गावठी कट्टे दाखवून लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रकारसुद्धा घडत आहेत. वास्तविक पाहाता गावठी कट्ट्यांचा धाक दाखवून व्यापाऱ्यांना लुटण्याचे प्रकारदेखील वाढत चालले आहेत. त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी आता जरी पोलीस प्रशासनाने पावले उचलली असली, तरी दुसरीकडे याच्या मुळापर्यंत जाण्याची गरज असून, त्या दृष्टिकोनातून पावले उचलली गेली पाहिजेत, असे अनेकांचे मत आहे. पोलीस कारवाई करून आरोपींना अटक करत असले तरी गुन्ह्यांचे प्रमाण वाढतच आहे. दिवसेंदिवस गुन्हेगारांची संख्याही वाढत आहे. आज महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक गुन्हे हे नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घडत आहेत.
नगर शहरामध्ये सट्टाबाजार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याचबरोबर ‘बिंगो जुगार’चा मोठा बोलबाला सुरू आहे. अवैध धंद्यांवर आतापर्यंत पोलिसांनी अनेकवेळा कारवाया केल्या आहेत. अनेकांना अटकही केली आहे. एवढे होऊनदेखील आज ते पूर्णपणे बंद झालेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यामुळे युवा पिढीला मोठ्या प्रमाणामध्ये फटका बसत आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याच्या घटना नगरमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यात सट्टेबाजीला तर काहीच सीमाच राहिलेली नाही. अनेकजण कोट्यवधी रुपये त्यामध्ये हरले आहेत. तरीही नगर जिल्ह्यामध्ये जुगार मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे.
आजच्या परिस्थितीतही गावात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई होतात, पण त्याचा म्हणावा तसा उपयोग होत नाही. एकंदरीत नगर जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी थांबायला तयार नाही. आज अनेक टोळ्यांना मोक्का लावण्यात आला आहे. तर, अनेकांचे प्रस्ताव सादर केलेले आहेत. नवनवीन गुन्हेगार जिल्ह्यामध्ये तयार होत आहेत. गुन्हे केल्यानंतर त्यांना शेजारच्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात साधने उपलब्ध होतात, ही वस्तुस्थिती आहे.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने आपली भूमिका बदलली पाहिजे. पोलीस प्रशासनाने धाडसी पावले उचलून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. आजही नगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारांची संख्याही काही कमी नाही. श्रीरामपूर असो किंवा अन्य कोणतेही तालुके, या ठिकाणी अनेकवेळा मोठ्या प्रमाणामध्ये गावठी कट्टे सापडले आहेत. मध्यंतरी पोलिसांनी धडक कारवाई करत जिल्ह्यातून 40 हून अधिक कट्टे जप्त केले होते.
गावठी कट्ट्यांमुळे गुन्हेगारी वाढत चालली आहे. यामधून रस्ते लूट, व्यापाऱ्यांना धमकावणे, खंडणीची मागणी, आदी प्रकार वाढीला लागले आहेत. याला पायबंद घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने आपली भूमिका कठोर करून अशा व्यक्तीला पाच जिल्ह्यांतून हद्दपार करण्याची गरज आहे. अशी कठोर भूमिका बजावली तरच गुन्हेगारांना जरब बसेल; अन्यथा जिल्हाबंदी करून काहीच उपयोग होत नाही. गुन्हेगार शेजारच्या जिल्ह्यातून आपला कारभार हाकतात आणि प्रशासनही अंधारात राहत असून, काहीच करू शकत नसल्याचे दिसून येते. असा सर्व काळाबाजार जिल्ह्यात सुरू आहे.
मुलींच्या छेडछाडीचेही अनेक प्रकार जिल्ह्यात सुरू आहेत. क्लासेस असो अथवा महाविद्यालय असो, या ठिकाणी सर्रासपणे छेडछाडीचे प्रकार घडतात. याबाबत पोलीस प्रशासन ठोस अशी कधीच कारवाई करत नाही. यातून गुन्हेगारांचे बळ वाढते आहे. हीसुद्धा वस्तुस्थिती आहे. वास्तविक पाहाता प्रशासनाने दामिनी पथक, गस्ती पथक आदींवर आपले लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पोलीस प्रशासनात काहीकाळ योजना राहतात आणि नंतर ती बारगळली जाते, असेच पाहायला मिळते. या बाबींमुळे एकप्रकारे गुन्हेगारांना बळ मिळते. मात्र, प्रशासनाने आता आपली भूमिका ठोस घेऊन विविध प्रकारची पथके तैनात करून गुन्हेगारीला आळा घालण्याची गरज आहे. नागरिकांनीही किरकोळ गुन्हेदेखील दखल केले, तर गुन्हेगारीला चाप बसेल, ही वस्तुस्थिती आहे, जेणेकरून यामध्ये क्रॉस पद्धतीने गुन्हा दाखल करायचा व त्यामध्ये तडजोड करायची, असे घडताना दिसत आहे. याला आता नूतन पोलीस अधीक्षकांनी पायबंद घालावा, अशी मागणीदेखील जोर धरू लागली आहे. ‘भविष्यात कायदा व सुव्यवस्था राखायची असेल तर प्रथम पोलीस अधीक्षकांना आपल्या कामकाजात बदल करून सर्वांना तंबी देण्याची गरज आहे.
गेल्या काही कालावधीत जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामागे अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचा सहभाग असल्याचा आरोप करून चक्क दक्षिणेतील खासदारांनी उपोषणही केल्याने जिल्ह्याची गुन्हेगारी राज्याच्या चर्चेत आली होती. गुन्ह्यांचा तपास बोकाळल्याने चोऱ्या, घरफोडी आणि सोनसाखळ्या लांबवण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहेत. भ्रष्टाचारातून अव्यवस्था वाढीस लागल्याने अवैध व्यवसायांचेही स्तोम माजले आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याचा पदभार स्वीकारणारे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याचा ‘शब्द’ दिल्याने, त्याच्या पूर्ततेसाठी ते किती कठोर पावले उचलतात, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List