आजपासून विमानतळ भूसंपादन हरकतींवर सुनावणी
पुरंदर तालुक्यामध्ये प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी करण्यात येणाऱ्या भूसंपादनाबाबत सात गावांमधील शेतकऱ्यांनी सुमारे 2 हजारांहून अधिक हरकती घेतल्या आहेत. या हरकतींवर उद्यापासून (दि. 9) सुनावणी सुरू होणार आहे.
या विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी आणि पारगाव या सात गावांमधून सुमारे 2 हजार 673 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या गावांतील शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर विमानतळासाठी जागा आरक्षित असे शेरे मारण्यात आले आहेत. परिणामी सद्यस्थितीमध्ये जमिनीची खरेदी विक्री बंद केलेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी भूसंपादन अधिकाऱ्यांमार्फत भूसंपादनासाठी 32 (2) च्या नोटीस शेतकऱयांना दिल्या. या नोटिसीनंतर हरकती नोंदविण्यासाठी 29 मेपर्यंत मुदत देण्यात आली होती. शेतकऱयांनी त्यावर 2 हजार 52 हरकती नोंदविल्या. त्याची सुनावणी आता सोमवारपासून सुरू होईल. भूसंपादनासाठी तीन अधिकारी नियुक्त करण्यात आले असून हेच अधिकारी ही सुनावणी घेणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी सांगितले. भूसंपादन, तसेच जमिनीचा मोबदला ठरविण्यासाठी या जमिनीची मोजणी आवश्यक आहे. प्रशासनाच्या वतीने तीन मे रोजी यासाठी ड्रोन सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, गावकऱयांनी त्याला जोरदार विरोध केला.
- विमानतळाच्या भूसंपादनासाठी इरादा जाहीर करणे, त्यानंतर अधिसूचना जाहीर केल्यानंतर प्रत्यक्ष भूसंपादन करावयाच्या क्षेत्रावर असणारे संबंधित जमीन मालक त्यांचे सातबारा उतारे यांच्यावर भूसंपादनाचे शेरे म्हणजेच शिक्के मारणे. भूसंपादनाच्या कलम 32 (2) नुसार नोटिसा बजावल्यानंतर त्यावर हरकती सूचना घेणे. हरकतींवर सुनावणी घेऊन निर्णय देणे ही भूसंपादनातील सर्वात महत्त्वाची आणि कायदेशीर प्रक्रिया आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List