राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाचे अधिकारी राजीव कुमार आणि ज्ञानेश कुमार यांनी द्यावीत – संजय राऊत
राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले भारतीय जनता पक्षाला नाही असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केले आहे. तसेच याची उत्तरं उत्तर राजीव कुमारांपासून ते ज्ञानेश कुमारापर्यंत या लोकांनी द्यायचे आहे. हे प्रश्न फक्त निवडणुकीपुरते नाहीयेत असेही संजय राऊत म्हणाले.
आज मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, उर्दूला विरोध करण्याची त्यांच्या पक्षाची भूमिका आहे. योगी आदित्यनाथ असतील किंवा इतर काही जे त्यांचे प्रमुख नेते आहे त्यांनी उर्दूला विरोध केला. पण मला कौतुक आहे देवेंद्र फडणवीस यांचं, त्यांनी राहुल गांधींना उत्तर देण्यासाठी उर्दू शायरीचा आधार घेतला. ही शायरी फार नवीन नाहीये, शाळेतली मुलं वापरतात. मूळ मुद्दा बाजूलाच राहतोय तुम्ही निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ का पुसताय? देवेंद्र फरडवीस निवडणूक आयोगाच्या चेहऱ्यावरची धूळ पुसतायत. स्वतः निवडणूक आयोगाने पुसायला पाहिजे. भारतीय जनता पक्षाला काय कॉन्ट्रॅक्ट वगैरे मिळालंय का निवडणूक आयोगाकडून की आमच्या चेहऱ्यावर जी चिखलफेक झालेली आहे, सर्व राजकीय पक्षांकडून, जगभरातून जी धूळ उडवली जाते आहे, ते पुसण्यासाठी देवेंद्र फडणवीस वगैरे लोकांना आम्ही नियुक्त करतो असं काय मला माहित नाही. राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले भारतीय जनता पक्षाला नाही. याचे उत्तर राजीव कुमारांपासून ते ज्ञानेश कुमारापर्यंत या लोकांनी द्यायचे आहे. हे प्रश्न फक्त निवडणुकीपुरते नाहीयेत. गेल्या दहा वर्षात निवडणूक आयोगाने जे कांड केलेले आहेत, कांड म्हणजे मग ते मूळ शिवसेना शिंदेना देण्यापासून ते मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या हयातीत अजित पवारांना देण्यापर्यंत हे सर्व अमित शहांच्या राजकीय दबावाखाली झालं. हा सुद्धा निवडणूक जिंकण्याचाच एक भाग होता. याच्यावर सुद्धा निवडणूक आयोगाला उत्तर द्यावी लागणार आहेत. तुमची जी उत्तर चाललेली आहेत ना थातूर मातूर छाचूगिरी आहे. तुम्ही अथॉरिटी नाही आहात. गेल्या दहा वर्षातला निवडणूक आयोग हा मोदी शहांच्या पिंजऱ्यातला पोपट झाला आहे. तो आधी विठू विठू तरी बोलत होता. आता विठू विठूही बोलत नाही. याची अवस्था त्या अकबर बादशाहाच्या पोपटासारखी झाली आहे, तो जिवंत आहे की मेला आहे सांगण्याची हिममत होत नाहीये. हे असे प्रकार महाराष्ट्रात सुरू आहेत. ना याला उत्तर द्या त्याला उत्तर द्या आहेत आणि ही सोंगं आहेत. गेल्या दहा वर्षापासून राज्याचा आणि देशाच्या निवडणूक आयोगाने आत्मा विकलेला आहे आणि हा आयोग भारतीय जनता पक्षाची एक शाखा म्हणून ते काम करतात हे लपून राहिलेलं नाही. सरकारवर, भारतीय जनता पक्षावर आम्ही आरोप केला तर राजीव कुमार नावाचे निवडणूक आयुक्त उत्तर द्यायचे. निवडणूक आयोग हे एक संविधानिक पद आहे घटनात्मक पद आहे त्यांनी निष्प:क्षपाती पद्धतीने या देशातल्या निवडणुका घ्यायच्या असतात. मोदी शहा सांगतील त्या पद्धतीने निवडणुका घ्यायच्या नसतात. एक लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस तुम्ही वकील असाल पण कायद्याचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त आमचा आहे असेही संजय राऊत म्हणाले.
तसेच आदित्य ठाकरे यांनी जे विधान केलेलं आहे ती शिवसेनेची, माननीय उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका आहे. आणि काही काळापूर्वी राज ठाकरे यांनी पण तीच भूमिका मांडली होती की मोदी शहाला महाराष्ट्रात पाय ठेवून देऊ नका, हे लोक महाराष्ट्र गिळतायत. काँग्रेसचीही तीच भूमिका आहे. सर्व समविचारी पक्ष आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान जपू पाहणारे किंवा महाराष्ट्र उद्योगपतींच्या गुजरातच्या उद्योगपतींच्या घशात जाण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करणारे या सगळ्यांनी एकत्र यावे आमची भूमिका आहे असे संजय राऊत म्हणाले. तसेच आमच्या आधीच्या पिढीने संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढवला त्याच प्रकारचा नवीन लढा आपल्याला आता उभा करावा लागेल ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे. आणि आम्ही सगळे त्यासाठी तयार आहोत असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List