मुंबई – नाशिक प्रवास महागला; घोटी – समृद्धीच्या दुहेरी टोलचा भुर्दंड
समृद्धी महामार्गाने नाशिक-मुंबई प्रवासाचा वेळ वाचला आहे. मात्र घोटी आणि समृद्धी अशा दुहेरी टोलमुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. एकच टोल आकारण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले. समृद्धीमुळे नाशिक-मुंबई प्रवासाचा एक तास कमी झाला आहे. वेळेची बचत झाली असली तरी दोन ठिकाणी टोल असल्याने नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
समृद्धी महामार्गाने जाणाऱया वाहनांसाठी एकाच ठिकाणी टोल आकारणी केली जावी, अशी मागणी होत आहे. शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्यांचा विचार करून सरकारने समृद्धीचा अंतिम टप्पा सुरू होण्यापूर्वीच हा निर्णय घ्यायला हवा होता, असे बोलले जात आहे. एकाच ठिकाणी रक्कम घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष संजय सोनवणे यांनी पेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
समृद्धीवर जाण्यासाठी नाशिकहून घोटी टोल नाक्यावरून जावे लागते, येथे कारसाठी 150 रुपये, तर मालवाहतूक वाहनांसाठी 500 रुपये टोल आकारला जातो. तेथून तीन किलोमीटर अंतरावरच समृद्धी महामार्गाचा टोलनाका आहे, तेथेही कारसाठी 160 रुपये घेतले जातात. मालवाहतूक वाहनांना मोठा टोल आहे. अवघ्या तीन किलोमीटर अंतरासाठी दुहेरी टोलचे पैसे द्यावे लागत आहेत. सामान्य प्रवासी, शेतकरी, शेतीमाल व इतर मालवाहतूकदारांना याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List