अखेर ठाणे पालिकेने दिव्यातील कचरा उचलला; शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग
दिवा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 28 मधील कचरा जवळपास 8 महिन्यांपासून उचलला गेला नव्हता. याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ठाणे महापालिका प्रशासनाला कचरा उचलला गेला नाही तर तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला. शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला जाग आली असून अखेर ठाणे पालिकेने दिव्यातील कचरा तत्काळ उचलला आहे.
ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 28 मधील दातिवलीगाव स्मशानभूमीजवळील कचरा जवळपास 7 ते 8 महिन्यांपासून उचलला गेला नव्हता. त्या कचरा टाकलेल्या जागेची डम्पिंग ग्राऊंडपेक्षा वाईट परिस्थिती झाली होती. त्याचा परिणाम आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांवर व शाळेतील विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणात होत होता. तेथील नागरिकांनी शिवसेनेच्या दातिवली शाखेत तक्रारदेखील केली होती. या तक्रारीची दखल घेत कल्याण ग्रामीण महिला विधानसभा संघटक योगिता नाईक यांनी सहाय्यक आयुक्तांची भेट घेतली. कचरा तत्काळ उचलावा अशी विनंती करत आंदोलनाचा इशारा नाईक यांनी दिला होता.
अधिकाऱ्यांनी जेसीबी व डंपर मागवले
झोपेचे सोंग घेणाऱ्या अधिकाऱ्यांनी तत्काळ हालचाली सुरू केल्या. अधिकाऱ्यांनी कचरा उचलण्यासाठी आज तत्काळ जेसीबी व डंपर मागवले. हा परिसर कचरामुक्त केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. इतक्या महिन्यात न उचललेला कचरा उचलला गेला असल्याने योगिता नाईक यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List