चूक दिसेल तिथे प्रश्न विचारा, तरच बदल घडवाल; आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र
आर्टस्, सायन्स, कॉमर्समधून आपण आजही बाहेर पडलेलो नाही. व्यक्त होत नाही. प्रश्न विचारत नाही. कोणतीही थिएरी असो वा सामाजिक व्यवस्था, चूक दिसेल तिथे प्रश्न विचारा, तर आणि तरच बदल घडेल आणि यशस्वी व्हाल, असा मूलमंत्र शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज भावी पिढीला दिला. शिवसेना-युवासेना सचिव व आमदार वरुण सरदेसाई यांच्या पुढाकाराने सांताक्रूझ येथे दहावी-बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी आदित्य ठाकरे बोलत होते.
पहिली पायरी यशस्वी ठरली आहे, आजपर्यंत आईवडील आणि शिक्षक जे सांगत आले त्यावर भर द्या, मग आयुष्यातील पुढचे टप्पेही यश देतील, असे आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना केले. भविष्यात आपल्याला काय बनायचेय हे आत्ताच मनाशी ठरवा आणि त्या दिशेने अभ्यास करा, उद्या कदाचित कॉलेजमध्ये केलेले एखादे आंदोलन तुम्हाला राजकारणातही घेऊन येईल आणि आज राजकारण चांगल्या दिशेला नेण्याची गरज आहे, त्यासाठी सुशिक्षित लोकांची गरज आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले. याप्रसंगी शिवसेना नेते-आमदार अनिल परब आदी उपस्थित होते.
मराठी माणसांनो, उद्योग उभारा म्हणजे नोकऱ्याही मिळतील
उद्योग उभारायचा नाही, धंदा स्थापन करायचा नाही, पैशापासून लांब राहायचे असा मराठी माणसाचा एक विचार असतो. पण त्याला बगल देऊन मराठी माणसाने उद्योगधंदे उभारले तरच पुढच्या पिढीसाठी आपण नोकऱ्या निर्माण करू शकू, असे मतही आदित्य ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले. आजवर जे यशस्वी ठरलेत ते कुठेही भरकटले नाहीत पण त्यांनी मुख्य मार्गापासून थोडंसं वेगळं होऊन विचार करण्याचा प्रयत्न केला, असे उदाहरणही त्यांनी यावेळी दिले.
स्वप्ने मनात बाळगाल तर ‘एआय’सारखे ध्येयाजवळ जाल
ज्येष्ठ पटकथा लेखक, कवी जावेद अख्तर यांची एक मुलाखत आपण पाहिली. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) जग बदलू शकते का, असा प्रश्न त्यांना त्यात विचारला गेला. त्यावर, नॅचरल स्टुपिडीटी आणि एआयमध्ये तुम्हाला एक निवडायचे असेल तर एआय निवडा असे उत्तर त्यांनी दिले. एआयला ऐकू येत नाही, पण ते आपण काय शोधतोय त्यानुसार आपल्या मनाचा वेध घेऊन स्क्रीनवर आपल्यासमोर आणते. तशीच तुमची स्वप्ने आहेत. तुम्ही मनात ठेवले की मला हेच व्हायचे आहे तर तुमचा आत्मविश्वास त्या सर्च इंजिनप्रमाणे तुम्हाला ध्येयाच्या जवळ नेईल, असे आदित्य ठाकरे म्हणाले. भाषा कोणतीही असो, भरपूर वाचन करा, वेगवेगळ्या भाषा शिका, असा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List