एलपीजी टँकरची बसला धडक, 30 शिक्षक जखमी, गॅस गळतीनंतर आगीचा भडका; मुंबई – गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये भीषण अपघात

एलपीजी टँकरची बसला धडक, 30 शिक्षक जखमी, गॅस गळतीनंतर आगीचा भडका; मुंबई – गोवा महामार्गावर चिपळूणमध्ये भीषण अपघात

मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूणहून रत्नागिरीकडे येणारी खासगी बस एलपीजी टँकरच्या जोरदार धडकेने 30 फूट खोल दरीत कोसळली. यात बसमधील 30 शिक्षक आणि चालक असे 31 जण जखमी झाले असून त्यातील सात जणांची प्रकृती गंभीर आहे. रत्नागिरीजवळील निवळी-बावनदी घाटात रविवारी सकाळी हा भीषण अपघात घडला. अपघातग्रस्त टँकरमधून गॅसगळती झाल्याने आगीचा भडका उडाला. त्यात दोन घरे खाक झाली तर दोन वाहनेही जळाली. अपघातानंतर महामार्ग 9 तास ठप्प होता. वाहने पर्यायी मार्गाने वळवण्यात आली. दरम्यान, खबरदारी म्हणून पोलिसांनी लगतचा परिसर रिकामा केला.

शिक्षक प्रशिक्षणासाठी बसने रत्नागिरीत येत होते. सकाळी आठच्या सुमारास बावनदी येथील रस्त्यावर बसला मागून भरधाव येणाऱया टँकरने धडक दिली. त्यात बसचालकाचे नियंत्रण सुटल्याने बस 30 फूट खोल दरीत कोसळली, तर टँकर पलटी झाला. एलपीजी टँकर जयगड येथून मुंबईकडे चालला होता. बावनदीच्या अलीकडील उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले आणि समोरून जाणाऱ्या खासगी बसला टँकर धडकला. खासगी बसमधून प्रवास करणारे 15 शिक्षक आणि 16 शिक्षिका असे एकूण 31 जण अपघातात जखमी झाले. त्यातील सात जणांना गंभीर दुखापत झाली आहे. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून दोन जखमी महिला प्रवाशांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.

पाली, संगमेश्वरमार्गे वळवली वाहतूक

एलपीजी टँकर रस्त्यावर पलटी झाल्यानंतर गॅस गळती होऊन परिसरात आग लागली. त्यात काही झाडे व रिकामी घरे जळाली. गॅस गळतीचे वृत्त समजताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी स्वतः हजर राहून संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवले. यादरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद ठेवली होती. येथील वाहतूक पाली आणि संगमेश्वरमार्गे वळवण्यात आली.

जखमींची नावे

अमोल कोतवाल, राजेश यादव, धर्मेंद्र देरुगडे, दिलीप डोंगरे, संकेत जागुष्टे, कमल महाडिक, विराज सावंत, निशिकांत वानरकर, मंदा खाडे, वृषाली यादव, श्वेता चव्हाण, स्मिता पाटील, जयश्री गावडे, मीना घाडगे, नेहा मेस्त्री, मनीषा कांबळे, प्रियांका जाधव, रुपाली भुवड, उषा खुडे, नीता बांद्रे, हर्षाली पाकळे, सुलक्षणा पाटील, मालिनी चव्हाण आणि मिता शिरकर अशी जखमींची नावे आहेत.

प्रशासनाचा आडमुठेपणा; शिक्षक संघटनेचा आरोप

प्रशिक्षणाला वेळेपूर्वी हजर राहण्यासाठी घाईने येणाऱया शिक्षकांच्या गाडीला निवळी बावनदी येथे अपघात झाला. या अपघाताला शिक्षण विभाग जबाबदार आहे. प्रशिक्षणास हजर राहण्यास पाच मिनिटे उशीर झाला तरी शिक्षकांना प्रशिक्षणातून बाहेर काढले जाते. प्रशिक्षण तालुकास्तरावर घेण्यास प्रशासनाचा नकार होता. त्यामुळे प्रशिक्षणाला लवकर पोहोचण्यासाठी शिक्षकांना खासगी बसने प्रवास करणे भाग पडले, असा आरोप कोकण विभागीय शिक्षक लोकशाही आघाडी व रत्नागिरी जिल्हा अध्यापक संघाचे अध्यक्ष सागर पाटील यांनी केला.

रखडलेल्या महामार्गावर चाकरमान्यांची रखडपट्टी, माणगावात वाहनांच्या रांगा

उन्हाळी सुट्टीनिमित्त कोकणात गेलेले चाकरमानी येत्या 16 जूनपासून मुलांच्या शाळा सुरू होणार असल्याने मुंबईत परतत आहेत. या परतीच्या प्रवासात मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामामुळे चाकरमान्यांची जागोजागी रखडपट्टी होत आहे. महाड ते वडखळदरम्यान महामार्गाचे बरेचसे काम अर्धवट स्थितीत पडले आहे. कोलाड येथील पुलाचे काम मागील काही वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. त्यामुळे या परिसरात शनिवारपासून मोठय़ा प्रमाणावर वाहतूककोंडी होत आहे. रविवारीही वाहतूककोंडीचा मनस्ताप वाहनचालकांना सोसावा लागला.

महामार्गाच्या जागोजागी रखडलेल्या कामांमुळे चाकरमान्यांचा कोकण ते मुंबई प्रवासातील वेळ चार ते पाच तासांनी वाढला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम 13 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले होते. अजूनही ते पूर्ण झालेले नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करत व्हिडीओ केला व्हायरल; 7 आरोपींना अटक गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य करत व्हिडीओ केला व्हायरल; 7 आरोपींना अटक
विकृत मानसिकतेच्या तरुणांनी गोवंशासोबत अनैसर्गिक कृत्य केले आणि त्याचा व्हिडीओ समाजमाध्यमात वायरल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील सात...
मला आणि रवीश कुमार यांना पंतप्रधान मोदींनी मुलाखत द्यावी, संजय राऊत यांचे खुले आव्हान
राहुल गांधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं निवडणूक आयोगाचे अधिकारी राजीव कुमार आणि ज्ञानेश कुमार यांनी द्यावीत – संजय राऊत
Jolly LLB 3: अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांना राजस्थान उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, शूटिंग बंदीची केली होती मागणी
Gas After Eating Food- पोटातील गॅसवर प्रभावी उपाय, फक्त पाच सेकंदात होईल झटक्यात सुटका
ट्रम्प-मस्क यांची दोस्ती तुटली अन् नवरा-बायकोत दुरावा वाढला; अमेरिकेतील प्रसिद्ध कपल चर्चेत
अखेर ठाणे पालिकेने दिव्यातील कचरा उचलला; शिवसेनेच्या दणक्यानंतर प्रशासनाला आली जाग