शहापुरातील आरोग्य यंत्रणा ‘सलाईन’वर
शहापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सध्या सलाईनवर आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते उपजिल्हा रुग्णालयापर्यंत डॉक्टर, नर्सेस तसेच कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्ण व नातेवाईकांची हेळसांड होत आहे. येथील सरकारी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध नसल्याने नाइलाजाने रुग्णांना खासगी रुग्णालयाची वाट धरावी लागत आहे. दरम्यान राज्य सरकार आरोग्य व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च करते. पण हे पैसे नेमके जातात कुठे, असा थेट सवाल शहापुरातील ग्रामस्थांनी केला आहे.
शहापूर तालुक्याची लोकसंख्या 3 लाखांहून अधिक असून 228 गावे, 365 पाडे व 107 ग्रामपंचायती आहेत. शहापुरात एक उपजिल्हा रुग्णालय, खडींमध्ये ग्रामीण रुग्णालय व किन्हवली, अघई, डोळखांब, कसारा, शेंदुण, शेणवा, टाकीपठार, टेंभा, वासिंद येथे प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. खडर्डीला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा सरकारने दिला. येथे 47 पदे मंजूर असून प्रत्यक्षात फक्त 18 कर्मचारी उपलब्ध आहेत. तर 29 कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
महिला सुरक्षारक्षकांचा अभाव
खर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात महिला सुरक्षारक्षक नसल्याने रात्री ओपीडीसाठी येणाऱ्या महिला रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. शहापूर तालुक्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 215 पदे मंजूर असताना 36 पदे रिक्त आहेत. यात पर्यवेक्षक, कुष्ठरोग तज्ज्ञ, आरोग्य सेवक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ व शिपाई आदींचा समावेश आहे. शहापूर उपजिल्हा रुग्णालय व खर्डी ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. आशीलाक शिंदे यांनी दिली.
सर्पदंशाने विद्यार्थिनीचा तडफडून मृत्यू
सर्पदंशामुळे इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा रस्त्यातच तडफडून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना आज पहाटे घडली. शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणा झाल्याने तिचा मृत्यू झाला असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. राणी निमसे असे या 19 वर्षीय दुर्दैवी मुलीचे नाव असून तिच्या मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे उपजिल्हा रुग्णालयातील बेफिकीर कारभारदेखील चव्हाट्यावर आला आहे.
शहापूरच्या आरमाईट इंजिनीयरिंग कॉलेजमध्ये शिकणाऱ्या राणी निमसे हिला झोपेतच रात्रीच्या सुमारास मण्यार जातीच्या सापाने दंश केला. काहीतरी चावल्याची जाणीव झाल्याने घरच्या लोकांनी तिला तातडीने शहापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तिच्यावर प्रथमोपचार सुरू केले, पण अत्याधुनिक यंत्रणा व सोयीसुविधांची कमतरता असल्याने राणी हिला ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला डॉक्टरांनी नातेवाईकांना दिला.
उपचार का होत नाहीत?
शहापूरला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा असूनही सर्पदंशावर उपचार का होत नाहीत, असा संतप्त सवाल राणीच्या नातेवाईकांनी केला. त्यामुळे नाइलाजाने तिला ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले. मात्र त्यापूर्वीच तिचा तडफडून मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान या घटनेची चौकशी करून दोषोंवर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईकांसह ग्रामस्थांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List