राज्यात 41 हजार हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका, वापसा नसल्याने खरीप पेरण्या लांबणीवर पडणार
राज्यामध्ये गेले काही दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतपिकांचे आणि जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आजअखेर हा आकडा 40 हजार 949 हेक्टरवर पोहोचला आहे. यामध्ये प्रामुख्याने काढणीला आलेला उन्हाळी कांदा, बाजरी, मका, तसेच भाजीपाल्याच्या पिकांचा समावेश आहे. शेतकऱयांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला गेला आहे.
कृषी विभागाकडून शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे सध्या सुरू आहेत. कृषी आयुक्तालयाकडे आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार, अमरावती, बुलढाणा, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर या जिह्यांना सर्वाधिक तडाखा बसला आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून बहुतांशी जिह्यांत मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीस सुरुवात झाली. राज्यभरात जवळपास गेले 20 दिवस पावसाने 34 तालुक्यांत हजेरी लावली. अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या अनेक भागांत वेळेआधी मान्सूनदेखील सक्रिय झाला. याचा एकत्रित परिणाम राज्यातील उन्हाळी पिकांना, त्याचबरोबर खरिपासाठी आगाऊ घेतल्या जाणाऱया पिकांनादेखील बसला आहे. पावसाचे हे प्रमाण असेच सुरू राहिल्यास नुकसानीचा आकडा वाढणार आहे.
प्रामुख्याने उन्हाळी हंगामातील भात, मूग, उडीद, ज्वारी, तीळ, मका, भुईमूग, कांदा, भाजीपाला, टोमॅटो, कांदा, बटाटा, लिंबू, पपई, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा उत्पादनांचे नुकसान झाले आहे. तसेच अन्य फळबागांनाही हानी पोहोचली आहे. सिंधुदुर्ग, नाशिक जिह्यांत शेतकऱयांनी तयार केलेल्या भातरोपवाटिकाही वाया गेल्याची स्थिती आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List