ऑस्ट्रेलियाला जायला निघालेले तीन तरुण इराणमध्ये बेपत्ता, कुटुंबीयांकडून मानवी तस्करीचा आरोप
ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी निघालेले पंजाबमधील तीन तरुण इराणमध्ये बेपत्ता झाल्याचे उघडकीस आले आहे. पाकिस्तानातील मानवी तस्करांकडून तिघांचे अपहरण झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. बेपत्ता तरुणांची ओळख पटली असून अमृतपाल सिंग (23), जसपाल सिंग आणि हुसनप्रीत सिंग (27) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी पंजाब पोलिसांनी दोन ट्रॅव्हल एजंटसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पंजाब पोलिसांनी होशियारपूरमधील दोन ट्रॅव्हल एजंट धीरज अटवाल, कमल अटवाल आणि त्यांची कर्मचारी साविता सोया यांच्यावर कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
बेपत्ता तरुणांच्या कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही इराणमार्गे ऑस्ट्रेलियाला निघाले होते. मात्र मे महिन्याच्या मध्यापासून त्यांचा शोध लागत नाही. 11 मे ते 17 मे दरम्यान व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्याशी शेवटचा संपर्क झाला होता. त्यावेळी तिघेही व्हिडिओ कॉलमध्ये रक्ताळलेले आणि व्यथित दिसत होते. तसेच मदतीसाठी याचना करत होते.
जसपाल सिंगचा मोठा भाऊ अशोक कुमारने दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबियांनी एजंटना 19 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम दिली होती. जसपालला प्रथम 1 एप्रिल रोजी दुबईला नेले आणि एक महिना तिथेच ठेवण्यात आले. यानंतर अमृतपाल आणि हुसनप्रीत दोघे जण पूर्ण रक्कम भरल्यानंतर 25 एप्रिल रोजी दुबईत गेले. त्यानंतर तिघांना मे महिन्याच्या सुरुवातीला वेगवेगळ्या विमानांनी तेहरानला नेण्यात आले.
तेहरानमध्ये पोहोचल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि हिंदुस्थानी एजंटने पाठवल्याचा दावा केला. तसेच त्यांना पुरावा म्हणून फोटो दाखवले. त्यांना टॅक्सीतून नेण्यात आले, नंतर त्यांचे अपहरण झाल्याचे उघड झाले. कुटुंबियांना पाकिस्तानमधील बँक खात्यांमध्ये प्रत्येकी 18 लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याचा दावाही बेपत्ता तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List