केदारनाथजवळ हेलिकॉप्टर कोसळले, 7 ठार… महाराष्ट्रातील दाम्पत्यासह चिमुकलीचा मृत्यू
अहमदाबाद विमान दुर्घटना ताजी असतानाच देवभूमी उत्तराखंडमध्ये रविवारी हेलिकॉप्टर कोसळले. रुद्रप्रयाग येथील गौरीपुंड परिसरात पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. यात हेलिकॉप्टरमधील वैमानिक, महाराष्ट्रातील दांपत्य आणि त्यांची दोन वर्षांची चिमुकली यासह सात जणांचा मृत्यू झाला. हेलिकॉप्टर केदारनाथ येथून भाविकांना घेऊन गुप्तकाशीला जात होते.
उड्डाणानंतर काही मिनिटांतच ते खाली कोसळले. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे हा अपघात घडला. मागील दोन महिन्यांतील हा पाचवा हेलिकॉप्टर अपघात आहे. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर आर्यन कंपनीचे होते. हेलिकॉप्टरने रविवारी पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी भाविकांना घेऊन केदारनाथ हेलिपॅडवरून गुप्तकाशीच्या दिशेने उड्डाण केले होते. वाटेत खराब हवामानामुळे ते हेलिकॉप्टर भरकटले आणि गौरीकुंड-त्रिजुगीनारायण यादरम्यानच्या जंगल परिसरात कोसळले. अपघातात हेलिकॉप्टरमधील पायलट व इतर सर्व भाविकांचा मृत्यू झाला. पायलट कॅप्टन राजवीर सिंग चौहान, विक्रम, विनोद देवी, तुस्ती सिंह, राजकुमार सुरेश जयस्वाल, शारदा राजकुमार जयस्वाल आणि 23 महिन्यांचे बाळ काशी अशी मृतांची नावे आहेत. यातील तीन प्रवासी महाराष्ट्राचे, तर तीन प्रवासी उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. रुद्रप्रयाग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला. गवत कापण्यासाठी गेलेल्या महिलांना जंगलात हेलिकॉप्टर कोसळल्याचे आढळले. राजवार यांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पोलीस व इतर यंत्रणांसह एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी तातडीने रवाना झाल्या आणि मदतकार्य सुरू केले. मात्र हेलिकॉप्टर जळून खाक झाल्याने आतील सर्व प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.
काही दिवसांपूर्वीही टळला होता अपघात
- जूनच्या पहिल्या आठवडय़ातही तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टरने आपत्कालीन लँडिंग केले होते. ते हेलिकॉप्टर यात्रेकरूंना केदारनाथ धामला घेऊन जात होते. बदासू हेलिपॅडवरून उड्डाण केल्यानंतर लगेच हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लँडिंग करावे लागले होते. हेलिकॉप्टर क्रिस्टल एव्हिएशन कंपनीचे होते.
- दुर्घटनेनंतर मुख्यमंत्र्यांनी तत्काळ उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि चारधाम येथील भाविकांच्या सुरक्षेसाठी खबरदारी घेण्याचे तसेच डीजीसीएच्या नियमांचे उल्लंघन न करण्याच्या सूचना दिल्या.
काशीला घेऊन काशी दर्शनाला जाणार होते…
राजकुमार जयस्वाल हे ‘राजा’ म्हणून लोकप्रिय होते. ते वणीतील धार्मिक व सामाजिक कार्यात पुढे असायचे. ते शिवभक्त होते. त्याच श्रद्धेतून त्यांनी मुलीचे नामकरण ‘काशी’ केले होते. याच नामकरणाच्या पार्श्वभूमीवर चिमुकलीला काशी येथे दर्शनासाठी घेऊन जाण्याचे स्वप्न होते. ते पूर्ण होण्याआधी जयस्वाल कुटुंबावर काळाने आघात केला. कुटुंबातील मुलगा विवान पांढरकवडा येथे आजोबांकडे असल्याने तो प्रवासात सोबत नव्हता. अपघाताचे वृत्त कळल्यापासून यवतमाळ पोलीस उत्तराखंड पोलिसांच्या संपर्कात आहेत. घटनेमुळे जिह्यात शोककळा पसरली आहे.
हेलिकॉप्टर सेवा दोन दिवस बंद
अपघातानंतर चारधाम परिसरातील हेलिकॉप्टर सेवा दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी माहिती दिली.
- हेलिकॉप्टर दुर्घटनेत यवतमाळ जिह्यातील वणी येथील एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले. राजकुमार जयस्वाल (42), श्रद्धा जयस्वाल (34) व दोन वर्षांची काशी जयस्वाल अशी त्यांची नावे आहेत. हे कुटुंबीय अन्य नातेवाईकांसोबत चारधाम यात्रेला गेले होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List