फुटीची चिंता करू नका, काही फरक पडत नाही! शरद पवारांचे उद्गार

फुटीची चिंता करू नका, काही फरक पडत नाही! शरद पवारांचे उद्गार

आपल्या पक्षात फूट पडेल असं काही वाटत नव्हतं पण पडली. जे राहिले आहेत ते विचारांनी राहिले आहेत. उद्या निवडणुका होतील तेव्हा वेगळं चित्र बघायला मिळेल. त्यामुळे फुटीची चिंता करू नका. आपण एकसंध राहिलो आणि जनतेशी बांधिलकी कायम ठेवली तर काहीही फरक पडत नाही, असे उद्गार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना काढले.

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज पुण्यात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार म्हणाले, 26 वर्षांपूर्वी आपण एकत्र आलो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापन करण्याचा निर्णय घेतला. काही संकटं आली तर नाउमेद न होता पक्षाला पुढे नेण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं आणि पक्षाला उभारी आली. पण, पक्षात फूट फडली, यासंबंधी मी अधिक भाष्य करू इच्छित नाही, असे सांगत शरद पवार यांनी 1980 चे उदाहरण देत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. राष्ट्रवादीला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. मला शंभर टक्के विश्वास आहे, येत्या निवडणुकीत चांगले चित्र पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार अमोल कोल्हे, नीलेश लंके, बजरंग सोनवणे, रणजितसिंह मोहिते-पाटील, सुरेश म्हात्रे, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी हा पक्ष सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याला संधी देतो. महाराष्ट्राचा चेहरा बदलणाऱया कष्ट करणाऱया कार्यकर्त्यांचा हा पक्ष आहे. तुम्हा सर्वांच्या बांधिलकीवर आणि कष्टावर हा पक्ष उभा आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाल्यावर त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. त्याचा परिणाम राज्यातसुद्धा झाला. मुलींना संधी मिळाल्यानंतर त्यांनी जनतेमध्ये विश्वास निर्माण करण्याचे काम केले. अगदी सैन्यदलातही ते दिसून आले. ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत दोन महिलांनी माहिती देऊन हे सिद्ध केले, असे शरद पवार म्हणाले.

50 टक्के भगिनींना निवडून द्या

जिल्हा परिषद, महापालिका आणि नगरपालिकेच्या निवडणुका दोन-तीन महिन्यांवर आल्या आहेत. कर्तृत्वाचा वाटा पुरुषांचाच असतो यावर माझा विश्वास नाही. भगिनींना संधी मिळाली तर त्यासुद्धा कर्तृत्व दाखवू शकतात. उद्याच्या निवडणुकीत 50 टक्के जागा भगिनींना द्यायच्या आहेत. हा धोरणात्मक निर्णय आपण घेतला आहे. तो यशस्वी करण्याचे काम करा, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

शेजारी राष्ट्रांबरोबर जाणीवपूर्वक सुंसवाद नाही

राष्ट्रवादीने राष्ट्रहिताच्या बाबतीत कधीच राजकारण केलेले नाही. पहलगाम हल्ल्यानंतरही आम्ही देशहिताची भूमिका स्वीकारली. देशात एक काळ असा होता की, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे नेतृत्व आणि भारत हा सगळय़ांना सोबत घेऊन जाण्यासाठी ओळखला जायचा. आज पाकिस्तान, चीन, बांगलादेश, श्रीलंकेसोबत आमचे चांगले संबंध नाहीत. ज्या बांगलादेशसाठी भारताने त्याग केला तो बांगलादेशदेखील आपल्यासोबत नाही. दक्षिणेकडील श्रीलंका आपला मित्र आहे की नाही, याबाबत शंका आहे; कारण तोही चीनच्या प्रभावाखाली आहे. देशाचे नेतृत्व करणाऱयांनी सुंसवादाची परिस्थिती जाणीपूर्वक निर्माण केलेली नाही, त्याची किंमत देशाला द्यावी लागत आहे, अशी टीका पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव न घेता केली.

पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल – सुप्रिया सुळे

शरद पवार आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी महात्मा गांधी, पंडित नेहरू, इंदिरा गांधी तसेच यशवंतराव चव्हाण यांचे विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल, लडेंगे और जितेंगे, असे सांगत अजित पवार यांच्यासोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले. सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण राज्याचा दौरा करणार असल्याची घोषणादेखील त्यांनी केली.

…तर या राज्याची लढाई पुन्हा जिंकू – जयंत पाटील

एकेकाळी देशात भाजपचे अवघे दोन खासदार होते. आज तोच भाजप देशातील सर्वांत मोठा पक्ष आहे. त्यामुळे घाबरुन जाऊ नका. आपण सगळे ताकदीने कामाला लागलो तर या राज्याची लढाई पुन्हा जिंकू. आपली लढाई ही तुकाराम विरुद्ध नथुरामाची आहे, हे कायम लक्षात ठेवा. आम्ही सर्व जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या विचारांचे आहोत. तुकाराम महाराजांनी सांगितले आहे, ‘भले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी.’ आपल्याला आता रस्त्यावर उतरून काम करण्याची भूमिका घेतली पाहिजे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

जयंत पाटील म्हणाले जबाबदारीतून मुक्त करा

मला शरद पवार यांनी बरीच संधी दिली. प्रदेशाध्यक्ष म्हणून सात वर्षांचा कालावधी दिला. पक्षाने आता नव्या चेहऱयांना संधी देणे आवश्यक आहे. तुम्हा सर्वांदेखत साहेबांना विनंती करतो, त्यांनी निर्णय घ्यावा, असे सांगत जयंत पाटील यांनी जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती केली.

निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार

नव्या पिढीला संधी देऊन त्यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका जयंत पाटील यांनी मांडली आहे. त्याबाबत राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबत प्रमुख सहकाऱयांना सोबत घेऊन चर्चा करून निर्णय घेतला जाईल. निवडणुकीनंतर नव्या नेतृत्वाला संधी देणार. राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाने सामान्य माणसाला संधी दिली आहे, असे शरद पवार म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

हे फळ खा अन् दिसा तरूण; वय वाढलं तरी चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत हे फळ खा अन् दिसा तरूण; वय वाढलं तरी चेहऱ्यावर सुरकुत्या येणार नाहीत
तरुण राहायला, दिसायला कोणाला नाही आवडतं. पण वय वाढणं थांबवणं आपल्या हातात नाही. पण वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकूत्या, किंवा...
Air India Plane Crash – दहा मिनिटं लेट झाल्याने फ्लाईट सुटली अन् ‘ती’ वाचली, महिलेने मानले गणपती बाप्पाचे आभार
Air India Plane Crash – दैव बलवत्तर! विमानातील एक प्रवासी जिवंत सापडला, रुग्णालयात दाखल
पंजाब नॅशनल बँकेला मराठीचं वावडं, कोपरखैरणेमधील शाखेत RBI च्या नियमांचं उल्लंघन
Ahmedabad Plane Crash – 204 मृतदेह आढळले, 41 जण हॉस्पिटलमध्ये दाखल; ओळख पटवण्यासाठी DNA नमुने देण्याचे प्रशासनाकडून आवाहन
Air India Plane Crash – मी वाढदिवस साजरा करणार नाही… आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांना आवाहन
Ahmedabad Plane Crash – भीषण…! अहमदाबादमधील दुर्घटनेत विमानातील सर्वच्या सर्व 242 जणांचा मृत्यू!