18 वर्षांच्या प्रतीक्षेला 18 तासांतच लागले गालबोट, बंगळुरूच्या विराट स्वप्नपूर्तीनंतर क्रिकेट जगतावर कोसळली शोककळा

18 वर्षांच्या प्रतीक्षेला 18 तासांतच लागले गालबोट, बंगळुरूच्या विराट स्वप्नपूर्तीनंतर क्रिकेट जगतावर कोसळली शोककळा

18 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आयपीएल जेतेपदाच्या स्वप्नपूर्तीचा आनंद मंगळवारी रात्रभर अवघा बंगळुरू साजरा करत होता. या स्वप्नपूर्तीचा जल्लोष बंगळुरूतही झालाच पाहिजे, या भावनेने संघांची विजय यात्राही काढण्याचे ठरले आणि सारी यंत्रणा आयोजनाच्या कामाला लागली. कर्नाटक विधानसभेपासून चिन्नास्वामी स्टेडियम हा दोन किमीचा मार्ग विजय यात्रेसाठी निश्चित करण्यात आला. या मार्गावर दुपारपासूनच बंगळुरू संघाच्या चाहत्यांनी अभूतपूर्व गर्दी केली होती. बंगळुरूचा उत्साह पाहून लाखोंची गर्दी होणार याचा अंदाज असूनही घाईगडबडीत विजय यात्रेचे केलेले आयोजन 11 चाहत्यांच्या अंतिम यात्रेचे कारण ठरले आहे. मंगळवारी बंगळुरूच्या चाहत्यांनी आपल्या आयपीएल कारकीर्दीतील संस्मरणीय क्षण अनुभवला होता, तर आज त्या क्षणानंतर अवघ्या जगाला दुर्दैवी क्षण अनुभवण्याचेही दुःख पचवावे लागले.

घाईगडबडीतल्या नियोजनाने घात केला

मंगळवारी रात्री 11.30 च्या ठोक्याला बंगळुरूने आपल्या 18 वर्षांची जेतेपदाची प्रतीक्षा संपुष्टात आणली. आयपीएलचे पहिलेवहिले जेतेपद जिंकण्याच्या आधीपासून आरसीबी चाहत्यांनी जल्लोषाची जबरदस्त तयारी केली होती. बंगळुरूच्या विजयाचा आनंद अवघ्या हिंदुस्थानला झालाच होता, पण बंगळुरूकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. जणू बंगळुरूने वर्ल्ड कप जिंकला असा जल्लोष आणि आनंदाचे वातावरण अवघ्या बंगळुरूत झाले होते. अवघ्या कर्नाटक राज्यात आनंदाला उधाण आले होते. त्यामुळे बंगळुरूच्या फ्रेंचायझी आणि कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने विराट स्वप्नपूर्तीनंतर अतिविराट विजय यात्रा काढण्याचे ठरवले. आनंदाच्या भरात घेतलेल्या या निर्णयाला प्रत्यक्षात कसे साकारायचे याचे कोणतेही प्लॅनिंग ना पोलीसांकडे होते ना प्रशासनाकडे. बंगळुरूचे क्रिकेटप्रेमी किती वेडे आहेत आणि किती गर्दी होऊ शकते, याचा कुणीही अंदाज बांधला नाही आणि सारे विजय यात्रेच्या तयारीत बुडून गेले. त्यांचा हाच निर्णय स्वप्नपूर्तीनंतर अवघ्या 18 तासांतच जीवघेणा ठरला.

बसमधून विजय यात्रेला परवानगी नाकारली

बंगळुरूचा संघ सकाळी 10 वाजता विमानतळावर दाखल झाला, तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शेकडोच्या संख्येने चाहत्यांनी गर्दी केली होती. मग ती गर्दी हळूहळू कर्नाटक विधान सौदाच्या दिशेने वळू लागली. विजेत्या संघाचे चिन्नास्वामी स्टेडियमवर जाहीर स्वागत केले जाणार असल्याचेही जाहीर करण्यात आले होते. तसेच विधान सौदा ते चिन्नास्वामी स्टेडियम या दोन किमी मार्गावर खुल्या बसमधून विजय यात्रा काढण्याचेही नियोजन करण्यात आले होते. पण बंगळुरूच्या पोलिसांनी तुफान गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे खुल्या बसमधील विजय यात्रेला परवानगी नाकारली. पण त्याआधीच लाखोच्या संख्येने चाहते खेळाडूंच्या एका झलकेसाठी विधान सौदा परिसरात जमा झाले होते. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रवेश करण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात असल्याचे कळताच ती मिळवण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाहते दुपारी 12 वाजताच चिन्नास्वामीवर धडकले. काहींना मिळाली तर हजारोंना ती मिळाली नाहीत. त्यामुळे जो तो तिकिटे मिळवण्यासाठी धडपडू लागला.

कर्नाटक सरकारची घुसखोरी

आयपीएल विजेत्या संघाचा जाहीर सत्कार चिन्नास्वामी स्टेडियमवर करण्याचे ठरले असतानाही कर्नाटक सरकारने बंगळुरू संघाचे विधान सौदेत जोरदार स्वागत केले आणि त्यांचे सत्कार करत कार्यक्रमात घुसखोरी केली. त्यामुळे विधान सौदेत गेलेल्या खेळाडूंचा सत्कार सोहळा तासभर रंगला आणि त्यादरम्यान विधान सौदेच्या बाहेर आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी लाखांची गर्दी तेथे पोहोचली. खेळाडू विधान सौदेतून बाहेरही पडले नव्हते आणि चिन्नास्वामी स्टेडियमवर चाहत्यांचे तुफान आले. सत्कार सोहळा सायंकाळी 5 नंतर होणार होता. प्रवेशासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. ती तिकिटे मिळवण्यासाठी चाहत्यांनी जोरदार प्रयत्न केले. तिकिटे मोजक्याच प्रेक्षकांना मिळाली, पण चाहत्यांची प्रचंड गर्दी पाहून दुपारीच स्टेडियमचे दरवाजे उघडण्यात आले. काही मिनिटांतच स्टेडियमही खचाखच भरले. तरीही गर्दी थांबत नव्हती. चाहते कुणाचेही ऐकत नव्हते. तेव्ंहा गर्दी रोखण्यासाठी पोलिसांना लाठीमारही केला आणि येथेच परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. गर्दीचा अंदाज आणि गर्दीचे योग्य नियोजन करण्यात पोलीस आणि प्रशासन पुरते अपयशी ठरल्यामुळे चिन्नास्वामीच्या गेट नं. 3 वर चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ती रोखण्यात पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली. या गर्दीसाठी पुरेसे सुरक्षाबलही स्टेडियम परिसरात तैनात नव्हते. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेली आणि गर्दीचे चेंगराचेंगरीत रूपांतर झाले. या घटनेमुळे विराट विजय यात्रा क्षणार्धात शोककळेत बदलली. आपल्या आवडत्या खेळाडूंचे दर्शन घेणे 11 चाहत्यांच्या जिवावर बेतले. शेकडोच्या संख्येने चाहते जखमीही झाले आहेत.

एका रात्रीत मुंबईनेही केले नव्हते नियोजन

मुंबईने आजवर अनेक विजय यात्रा पाहिल्या आहेत. 2007 साली हिंदुस्थानने पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकला तेव्हा दोन दिवसांनी मुंबईत प्रचंड मोठी आणि संस्मरणीय अशी विजय यात्रा काढली होती. ती यात्रा बेस्टच्या खुल्या बसमधून काढण्यात आली होती. मुंबई पोलीस आणि प्रशासनाने तसेच मुंबई क्रिकेट संघटनेने दीड दिवसात या विजय यात्रेचे अभूतपूर्व आयोजन केले होते आणि गर्दीचे योग्य नियोजनही केले होते. त्यानंतर गेल्या वर्षी पुन्हा एकदा टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर विजय यात्रा काढण्यात आली, मात्र यावेळी गर्दीचे नियोजन करण्यासाठी यात्रेचा मार्ग अवघा एका किमीचा करण्यात आला होता. या यात्रेत दहा लाखांपेक्षा अधिक गर्दी जमा झाली होती. तरीही मुंबई पोलिसांनी अत्यंत चतुराईने आणि सावधपणे ही विजय यात्रा पार पाडली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले IND Vs ENG – ‘ही तर पतौडी कुटुंबाच्या योगदानाबद्दल असंवेदनशीलता…’ सुनील गावसकर भडकले
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये 20 जून पासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. परंतु या करंडकाच्या नावात बदल...
Photo किल्ले रायगडावर उत्साहात संपन्न झाला शिवराज्यभिषेक दिन सोहळा
मिंधे गटात जाणे ही फार मोठी चूक, पण आता माझ्या माहेरी परतले; सुजाता शिंगाडे यांचा शिवसेनेत प्रवेश
आरोग्यासाठी ही इवलीशी वेलची ठरते अमृत, तज्ञांनी सांगितले याचे आरोग्यदायी फायदे
केमिकल पद्धतीने पिकवलेले कलिंगड कसे ओळखावे? ‘या’ 5 ट्रिक्स करतील काम
आयुर्वेदानुसार चुकूनही ‘या’ 5 पदार्थांचे सेवन एकत्र करू नयेत, आरोग्यासाठी ठरू शकतात घातक
तेव्हा पाकिस्तानला हिंदुस्थानच्या ताकदीची जाणीव होईल, ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचे मोठे विधान