समुद्र खवळणार… मुंबई ठाण्याला यलो अलर्ट तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडात रेड अलर्ट
मुंबई-महाराष्ट्रात तब्बल दोन आठवडे आधीच मुसंडी मारून दाणादाण उडवणारा पाऊस उद्यादेखील आणखी जोरदार बरसणार असल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे. यातच समुद्र खवळणार असल्याने धोका वाढल्यामुळे किनाऱयांवर हाय टाइडचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर पाहता उद्या मुंबई-ठाण्याला ‘सतर्कते’चा ‘यलो’ अलर्ट तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि रायगडला धोक्याचा इशारा देणारा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. जोरदार पावसाचे चार दिवसांतील अक्राळविक्राळ रूप पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कोकणासह राज्यातील विविध भागांमध्ये गेल्या आठवडय़ापासून वादळी बरसणाऱया पावसाचा जोर अजूनही उतरलेला नाही. मुंबईसह राज्यभरात गेल्या चार दिवसांपासूनची ही स्थिती कायम आहे. याचा मोठा फटका मुंबईची जीवनवाहिनी रेल्वेला बसला असून मध्य आणि हार्बर मार्गावर धीम्या गतीने वाहतूक सुरू असल्याचे समोर आहे. याचा मोठा फटका कामावर जाणाऱया चाकरमान्यांना बसत आहे.
कमी दृश्यमानतेमुळे विमान उड्डाणांना विलंब
बुधवारी ढगाळ वातावरणामुळे मुंबईच्या हवेत कमी दृश्यमानता होती. त्याचा परिणाम विमान सेवेवर झाला. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अनेक विमानांनी निर्धारित वेळेनंतर तास-दीड तास उशिराने उड्डाण केले. त्यामुळे विमान प्रवाशांची गैरसोय झाली. मध्य रेल्वे मार्गावरील लोकलचे वेळापत्रक बुधवारी सलग तिसऱया दिवशी कोलमडले. सकाळपासूनच अप व डाऊन अशा दोन्ही दिशेने ये-जा करणाऱया लोकल गाडय़ा जवळपास 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या. त्याचा ‘पीक अवर्स’ला कार्यालय गाठण्यासाठी लगबग करणाऱया नोकरदार मंडळींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मुंबईत पावसाचा पहिला बळी
मुंबईत जोरदार वाऱयासह झालेल्या पावसामुळे विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे झाड अंगावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तेजस नायडू असे या तरुणाचे नाव आहे. तेजस आपल्या दोन मित्रांसह झाडाखाली पावसापासून आश्रय घेण्यासाठी उभा होता. या दुर्घटनेत दोन तरुण थोडक्यात बचावले. तेजसला गोदरेज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, आज शहरात 3 ठिकाणी, पूर्व उपनगरात 2 तर आठ ठिकाणी झाड़े-फांद्या पडल्याच्या घटना घडल्या, तर चार ठिकाणी शॉर्टसर्किट झाल्याच्या घटना घडल्या.
अंधेरी सब वे पाण्यात
पावसाचा फटका पूर्व-पश्चिम द्रुतगती मार्गांना बसला. दोन्ही मार्गांवर गाडय़ांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यातच अंधेरी सब वेमध्ये पाणी भरल्याने वाहतूककाsंडी झाली.
प्रदूषण घटले
हवामान विभागानुसार एअर क्वालिटी इंडेक्स दोन ठिकाणी वगळता संपूर्ण मुंबईत 100 पेक्षा कमी होता. अनेक ठिकाणी तर 34 ते 50 पर्यंतच एक्यूआय दिसून आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List