महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या आणि भाषेच्या लढ्याचे नेतृत्व ठाकरेच करतील; संजय राऊत यांचा विश्वास
महाराष्ट्रात त्रिसुत्री भाषा धोरणाच्या नावाखाली शालेय शिक्षणात हिंदी सक्तीची करून राज्यातील लहान मुलांवर हिंदी लादली जात आहे. या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसे यांचा एकत्र मोर्चा 5 जुलै रोजी काढण्यात येणार आहे. हिंदीला आमचा विरोध नाही, प्राथमिक शालेय शिक्षणात हिंदीच्या सक्तीला विरोध आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खायदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच हिंदी सक्ती, मराठी भाषा आणि ठाकरे बंधूच्या एकत्र येण्याबाबतही त्यांनी महत्त्वाची माहिती दिली.
महाराष्ट्रात त्रिसुत्री भाषा धोरणाच्या नावाखाली शालेय शिक्षणात हिंदी सक्तीची करून राज्यातील लहान मुलांवर हिंदी लादली जात आहे. हे ओझे आपल्या मुलांना पेलवणार नाही, असे अनेक भाषातज्ज्ञ आणि शिक्षण तज्ज्ञांचे मत आहे. हिंदी भाषेला आमचा विरोध नाही. मात्र, शालेय शिक्षणात अशाप्रकारे भाषेची सक्ती करता येणार नाही. गुजरातला नेहमीप्रमाणे या सक्तीतून वगळले आहे. या सक्तीविरोधात राज्यात वातावरण तापत आहे. सरकारही त्यांच्याकडून सादरीकरण करत आहे. या सादरीकरणाचे नेपथ्य कोणाचे आहे असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. याविरोधात एकत्र उभे राहण्याची त्याची भूमिका आहे, असे संजय राऊत म्हणाले.
या सक्तीविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची एकच भूमिका आहे. मराठी भाषेचे तज्ज्ञ दीपक पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतील. या समितीने 7 जुलै रोजी राज्यभरात आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. या महत्त्वाचा विषय असल्याने उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. त्याचवेळी सरकारचे काहीजण राज ठाकरे यांच्याकडे सादरीकरणासाठी गेले होते. कदाचित राज यांना ते आवडले नसावे. त्यामुळे राज ठाकरे यांनीही 6 जुलैला आंदोलनाची, मोर्च्याची घोषणा केली. आम्ही पत्रकार परिषदेत असल्याची याबाबतची माहिती नव्हती. त्यानंतर राज ठाकरे यांनी फोनद्वारे याबाबत माहिती दिली. मराठी भाषेसाठी दोन मोर्चे निघणे योग्य नाही, त्याऐवजी एकच मोर्चा निघाला तर निश्चितच प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना आनंद होईल. राज ठाकरे यांची भूमिका आपण उद्धव ठाकरे यांना सांगितली. त्यानंतर त्यांनीही दोन मोर्चे निघणे योग्य नसल्याचे सांगितले, अशी माहिती त्यांनी दिली.
आषाढी एकादशी 6 जुलैला असल्याने राज्यभरात उत्सव असतो. त्यामुळे मराठी माणसापर्यंत पोहचण्यासाठी एकत्र मोर्चा काढण्यात अडचण नाही. मात्र, 6 ऐवजी 7 तारखेला त्यांनी आपल्या मोर्चात सहभागी व्हावे किंवा 5 तारखेला मोर्चा काढू. उद्धव ठाकरे यांचा हा निरोप आपण राज ठाकरे यांना दिला. त्यांनीही 5 तारखेला मोर्चा काढण्यात सहमती दिली. कोणत्याही राजकीय हेतूशिवाय फक्त मराठी माणसासाठी आणि मराठी भाषेसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, मोर्चाची वेळ 10 वाजेची ठरली आहे. मात्र, त्यात बदल होण्याची शक्यता असून सर्वाच्या सोयीसाठी योग्य ती वेळ ठरवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मनात जे आहे तेच होईल, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. याबाबत आपल्या मनात, अंहकार, इगो किंवा मतभेद नाहीत. मोर्चाबाबत दोघांनीही समन्वयाची भूमिका घेतली आहे. ती दोघांच्याही आणि महाराष्ट्राच्या सोयीची आहे. त्यामुळे आता 5 जुलैला एकत्र मोर्चा निघणार आहे. दोन्ही ठाकरे मनाने एकत्र आले आहेत. आता मराठी माणसासाठी लढा उभा करण्याची गरज दोघांनाही वाढत आहे. मुंबई तोडण्याचे कारस्थान होत आहे. त्याविरोधात उभे राहण्याची आणि लढा देण्याची गरज आहे. त्याचे नेतृत्व ठाकरेच करणार आहेत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीतील घटक पक्षाचीही तीच भूमिका आहे. त्यामुळे त्यांनाही या मोर्चासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. मराठी भाषेसाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. शालेय विद्यार्थ्यांवर प्राथमिक शिक्षणात तिसऱ्या भाषेची सक्ती करता येणार नाही, हा मुद्दा समजून घेण्याची गरज आहे. भाषेला विरोध नसून भाषेच्या सक्तीला विरोध आहे. या मुद्द्यावर मिंधे आणि अजित पवार यांची काही भूमिका नाही. ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत बसले आहे. मिंधे शिवसेना असल्याचे भासवत आहे, तर मराटी भाषेच्या मुद्द्यावर ते कुठे आहेत. ते कोणत्या बंकरमध्ये लपून बसले आहे. आता या मुद्द्यावर ते गप्प का, त्यांची काय भूमिका आहे, ते यावर मूग गिळून बसले आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List