चंद्रभागेतील मंदिरे पाण्यात, आषाढीच्या तोंडावर पंढरीत पुराचे सावट
उजनी व वीर धरणांतून भीमा नदीत पाणी सोडल्याने पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जुना दगडी पूल आणि पात्रातील मंदिरे पाण्यात बुडाली असून, आषाढीच्या तोंडावर पुराचे संकट ओढवल्याने प्रशासन आणि भाविकांत चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान, वारीपूर्वी चंद्रभागा पूर्ववत होईल, असा विश्वास जिल्हाधिवारी कुमार आशीर्वाद यांनी दिला आहे.
उजनी आणि वीरमधून सुमारे 60 हजार क्युसेक विसर्ग भीमा नदीत असल्याने जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जाऊ लागले असून, वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पाण्याने चंद्रभागा पुंडलिक मंदिरासह वाळवंटातील अन्य मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. आषाढी यात्राकाळात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने आषाढीपूर्वीच चंद्रभागेच्या पाण्याचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.
वीर धरण व उजनी धरण पाणलोटक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वीर धरणातून नीरा नदीत, तर उजनी धरणातून भीमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वीर धरणातून नीरा नदीपात्रात 22360 क्युसेक, उजनी धरणातून 41600 क्युसेक विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे पंढरपूरमध्ये रात्री 63 हजार 960 इतका विसर्ग असणार आहे. परंतु मंगळवारी सायंकाळी पंढरपूर येथे 40 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. या पाण्याने चंद्रभागा नदीवरील दगडी पूल पाण्याखाली गेला आहे, तर वाळवंटातील मंदिरांना पाण्याने वेढा दिला आहे. छोटी मंदिरे पाण्यात बुडाली आहेत, तर पुंडलिक व इतर मोठी व उंच मंदिरे पाण्यात अर्धी बुडाली आहेत. पाणी महाद्वार, विप्रदत्त घाटाला लागले आहे. यामुळे सध्यातरी चंद्रभागा नदीपात्रात पाय ठेवायला जागा नसल्याने भाविक घाटाच्या पायऱ्यांवर थांबून स्नान करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
जिल्हा प्रशासनाकडून आपत्कालीन व्यवस्था
चंद्रभागा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच आषाढी यात्रेला येण्यासाठी पालख्या, दिंडय़ा पंढरपूरकडे येत आहेत. त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा स्नानासाठी व श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दीही वाढत आहे. याचा विचार करून स्नानासाठी येणाऱ्या भाविकांना नदीपात्रात सुरक्षा पुरविण्यासाठी आपत्तिव्यवस्थापन टीम स्पीड बोटींसह तैनात करण्यात आलेली आहे. जीवरक्षक दल नदीकिनारी थांबून सेवा पुरवीत आहे.
आठ बंधारे पाण्याखाली; वाहतूक बंद
भीमा नदीवरील पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली, गुरसाळे, इसबावी, पंढरपूर, गोपाळपूर, मुंढेवाडी, खरसोळी, पुळूज हे कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जाऊ लागले आहेत. यामुळे या बंधाऱ्यांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List