फडणवीस यांच्या झोलची पोलखोल, घोटाळे करून जिंकल्याचे पुरावे उघड; देवाभाऊंच्या मतदारसंघात पाच महिन्यांत 8 टक्के मतदार वाढले
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत वाढलेला मतदानाचा टक्का आणि लोकसभेनंतर अचानक वाढलेली मतदारांची संख्या याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे घोटाळे करून निवडणूक जिंकले या झोलची पोलखोल लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. फडणवीस यांच्या मतदारसंघात लोकसभेनंतर अवघ्या पाच महिन्यांत 8 टक्के म्हणजे तब्बल 29 हजार 219 मतदार वाढले. काही बूथवर तर 20 ते 50 टक्के मतदार मतदानाच्या दिवशी वाढल्याची माहिती पुराव्यानिशी आता उघड झाली आहे.
भाजपने मतदार यादीत बोगस मतदार घुसवून कशा प्रकारे मतांची चोरी केली याबाबत राहुल गांधी यांनी वर्तमानपत्रात सविस्तर लेख लिहून खळबळ उडवून दिली होती. त्यापाठोपाठ आता त्यांनी न्यूजलॉण्ड्री या संकेतस्थळावरील एका बातमीचा हवाला देत एक्स पोस्ट करत फडणवीस यांची चोरी सर्वांसमोर आणली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात, मतदार यादीत 5 महिन्यांत 8 टक्के मतदारांची वाढ झाली. काही मतदान केंद्रांवर 20 ते 50 टक्के वाढ झाली आहे. काही बूथ स्तरावरील अधिकारी (बीएलओ) यांनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याच्या नोंदी केल्या होत्या. माध्यमांनी केलेल्या पडताळणीत हजारो मतदारांचा पत्ताच नसल्याचे उघड झाले आहे. मात्र या सगळ्यावर निवडणूक आयोग गप्प आहे. हे मौन आहे की निवडणूक आयोगही या घोटाळ्यात सहभागी आहे, असा सवाल राहुल गांधींनी केला आहे.
निवडणूक आयोगाचे राहुल गांधी यांना निमंत्रण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांवर चर्चा करण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना पत्राद्वारे निमंत्रण पाठवले आहे. हे पत्र 12 जून रोजी मेलद्वारे आणि राहुल गांधी यांच्या निवासस्थानीही पाठवण्यात आल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. देशात निवडणुका अतिशय काटेकोरपणे, निवडणूक कायद्याद्वारे तसेच नियमांद्वारे आणि वेळोवेळी निवडणूक आयोगाच्या सूचनांद्वारे घेतल्या जातात. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रक्रिया विधानसभा मतदारसंघ पातळीवर, केंद्रीय पातळीवर आयोजित केली जाते, असे निवडणूक आयोगाने पत्रात नमूद केले आहे.
फडणवीसांची सारवासारव
महाराष्ट्रात 25पेक्षा जास्त मतदारसंघ आहेत जिथे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यान 8 टक्केपेक्षा जास्त मतदार वाढले आहेत आणि अनेक ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला आहे. पश्चिम नागपूर मतदारसंघात 7 टक्के मतदार (27,065) वाढले आणि काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी तेथे निवडणूक जिंकली. उत्तर नागपूरमध्ये 7 टक्के (29,348) मतदार वाढले आणि काँग्रेसचे उमेदवार नितीन राऊत यांनी विजय मिळवला. मालाड पश्चिममध्ये 11 टक्के (38,625) मतदार वाढले आणि तुमच्या काँग्रेस पक्षाचे अस्लम शेख यांनी विजय मिळवला. पुणे जिह्यात, वडगाव शेरी 10 टक्के (50,911) मतदार वाढले आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे बापूसाहेब पठारे यांनी विजय मिळवला. मुंब्य्रामध्ये 9 टक्के (46,041) मतदार वाढले आणि राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड विजयी झाल्याचे सांगत फडणवीसांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे.
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन
मतदार यादीत नव्याने समाविष्ट करण्यात येणाऱया मतदारांच्या संख्येबाबत निवडणूक आयोगाने काही मार्गदर्शक तत्त्वे आखून दिली आहेत. त्यानुसार मतदार यादीत 4 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक मतदारांची नव्याने नोंदणी झाली असेल तर वाढलेल्या मतदारांची पडताळणी होणे गरजेचे आहे. तसेच मतदारांची संख्या का वाढली याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल मतदार नोंदणी अधिकाऱयांनी देणे बंधनकारक आहे. मात्र या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन झालेले नसल्याचे दिसून येत आहे.
मी नाही त्यातला, हेराफेरी उघड होताच फडणवीसांनी ‘मी नाही त्यातला’ अशी भूमिका घेत
कॉँग्रेस, राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झालेल्या मतदारसंघांतील वाढलेली मतदारांची टक्केवारी देत प्रश्न विचारले.
ही मतांची चोरीच
ही मतांची स्पष्ट चोरी आहे. या प्रकरणी कव्हरअप करणे हाच कबुलीनामा आहे. त्यामुळेच मशीन-रिडेबल डिजिटल मतदार यादी व सीसीटीव्ही फुटेज प्रसिद्ध करण्याची आमची मागणी आहे, असे राहुल म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List