शिधापत्रिकांची ‘ई-केवायसी’ करण्यास अनास्था; साताऱ्यात अजूनही साडेतीन लाख जणांनी केले नाही प्रमाणिकरण
शिधापत्रिकाधारकांसाठी ई-केवायसी करणे बंधनकारक असताना सातारा जिह्यात अजूनही 3 लाख 61 हजार 209 जणांनी अद्यापि ई-केवायसी प्रमाणिकरण केलेले नाही. धान्यापासून कुणीही वंचित राहू नये, यासाठी शासनाने 30 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, 36 हजार 483 जणांचे आधार कार्ड व रेशन कार्डकरील नाव न जुळल्याने त्यांची ई-केवासयी रिजेक्ट करण्यात आली आहे.
सातारा जिह्यात एकूण 17 लाख 92 हजार 84 शिधापत्रिकाधारक आहेत. त्यापैकी 9 लाख 49 हजार 365 जणांचे केवायसी मंजूर झाले आहे. 36 हजार 483 जणांचे आधार कार्ड व रेशन कार्डकरील नावे जुळली नाहीत, तर 4 लाख 81 हजार 510 केवायसी मंजुरीसाठी प्रलंबित आहेत. अजूनही 3 लाख 61 हजार 209 लाभार्थी म्हणजेच 20.16 टक्के ई-केवायसी बाकी आहेत.
गेल्या आठ महिन्यांपासून शासनाने रेशन कार्डसाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे. वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली आहे. 28 फेब्रुवारी, 31 मार्च आणि त्यानंतर 31 मे, अशी मुदतवाढ दिली होती. तरीही, मोठय़ा संख्येने कार्डधारकांनी ई-केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे आता 30 जूनपर्यंत पुन्हा केवायसीसाठी मुदत द्यावी लागली आहे.
ज्या रेशन दुकानदारांकडील लाभार्थ्यांची ई-केवायसी कमी प्रमाणात झाली आहे, त्या दुकानदारांनी लाभाथ्यांशी वैयक्तिक संपर्क साधून त्यांना ई-केवायसीसाठी करण्याबाबत प्रबोधन करावे, असे आदेश पुरवठा विभागाने दिले आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पुरवठा विभागाकडून ई-केवायसीसाठी पाठपुरावा सुरू आहे. याबाबत तहसील कार्यालयांना दोन महिन्यांपूर्वी पत्र पाठवून ई-केवायसी प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सर्व तालुक्यांत ई-केवायसी मोहीम प्रभावीपणे राबवण्यात आली. तरीही 3 लाख 61 हजार 209 जणांनी अद्याप ई-केवायसी प्रमाणिकरण केलेले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List