हा पूल कधीतरी तुटेल याचा अंदाज गावकऱ्यांना होताच, सूचना देऊनही पर्यटकांनी केले दुर्लक्ष
पुण्यातल्या कुंडमळा येथे 30 वर्ष जुना पूल कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. हा पूल कधीना कधी कोसळेल असा अंदाज इथल्या गावकऱ्यांना होता. हा पूल खरंतर इथल्या ग्रामस्थांसाठी बांधण्यात आला होता. पण कालांतराने हा पिकनिक स्पॉट झाला आणि तिथेच घात झाला.
NDTV ने याबाबत वृत्त दिले आहे. अनेक गावकरी म्हणत होते की हा पूल कधीतरी कोसळेल याचा अंदाज आम्हाल होताच. गावात राहणारे गणेश यांनी सांगितले की इथे येणाऱ्या लोकांना आम्ही बजावत होतो पण आमचं कोणीच ऐकलं नाही. खरंतर हा पूल स्थानिकांसाठी बांधण्यात आला होता. पण कालांतराने हा पूल पर्यटकांच्या आकर्षणाच केंद्रबिंदू ठरला. लोणावळ्यात दर शनिवारी रविवारी अफाट गर्दी होते. त्यानंतर तिथल्या पर्यटकांची पावलं इथे वळायला लागली. आणि त्यामुळे दर शनिवारी रविवारी इथे दोन ते चार हजार पर्यटक येऊ लागले आणि हा पूल त्यांचा फेवरेट स्पॉट झाला.
सृष्टी भेगडे ही या गावाची रहिवासी आहे आणि आपल्या नेहमीच्या कामासाठी ती हा पूल वापरायचीय सृष्टीने सांगितले की त्या दिवशी किमान चार ते पाच हजार पर्यटक या भागात आले होते. तसेच 70 ते 80 जण पुलाच्या एकाच भागावर उभे होते आणि तोच भाग तुटला आणि अपघात झाला. हा पूल तुटल्याचा सर्वात जास्त फटका गावातील विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. ज्या प्रवासाला त्यांना फक्त काही मिनिटं लागायची आता त्याच प्रवासासाठी त्यांना 35-40 किमी प्रवास करावा लागत आहे. या ठिकाणी नवीन पूल असावा अशी मागणी गेली अनेक वर्ष होत होती. या मागणीला गेल्या वर्षी मंजूरी मिळाली. पण त्या कामाची अधिसूचना पाऊस सुरू झाल्यानंतर 10 जून रोजी निघाली.
एकीकडे या पुलासाठी सरकारी अडथळा होता. आणि दुसरीकडे या दोन कुटुंबातील वादामुळेही या पुलाच्या बांधकामाला वेळ लागत होता. दोन पैकी एका कुटुंबाने हा पूल आपल्या घराच्या भिंतीजवळ नको अशी मागणी केली. त्यामुळे पुलाचे स्थान बदलावे लागले आणि पुलाच्या बजेटमध्ये 8 कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली.
भाजप नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की 2024 साली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लागोपाठ झाल्या. वर्षातून दोन वेळा आचारसंहिता लागली त्यामुळे या पुलाच्या कामाला मंजूरी मिळाल्या उशिर झाला.
हा पूल धोकादायक आहे, तसा फलकही या भागात लावण्यात आला होता. तरी पर्यटक या पुलावर गर्दी करत होते. शनिवारी आणि रविवारी या पुलावर इतकी गर्दी होते की या पुलाची दुसरी बाजूही दिसत नाही. पोलिस सुत्रांना दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी दोन दुचाकीस्वारांची भांडणं झाली होती. त्यामुळे आणखीन गर्दी वाढली होती.
या पुलावर सेल्फी घेण्यासाठी पर्यटकांची झुंबड उडायची. दर वर्षी सेल्फी घेताना इथून 20 ते 25 जणांचा मृत्यू होतो. जेव्हा आम्ही त्यांना सांभाळून राहण्याचा सल्ला द्यायचे तेव्हा आमच्यावरच डाफरायचे अशी माहिती गावकऱ्यांनी दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List