शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणं जमत नसेल तर खुर्च्या खाली करा – हर्षवर्धन सपकाळ

शेतकरी कर्जमाफी आणि लाडक्या बहिणीला 2100 रुपये देणं जमत नसेल तर खुर्च्या खाली करा – हर्षवर्धन सपकाळ

शेतकरी कर्जमाफी जाहीर करण्याची आज गरज असताना भाजपा युती सरकार जाणूनबूजून टाळाटाळ करत आहे. अवकाळी पावसाने शेतकरी संकटात सापडलेला आहे, शेतमालाला हमीभाव नाही. जगाच्या पोशिंद्याचे कंबरडे मोडले असताना सरकार शेतकरी कर्जमाफी देत नाही. निवडणुकीवेळी कर्जमाफीचे आश्वासन देऊन मते घेतली व सत्ता मिळवली आणि आता कर्जमाफीबद्दल आम्ही बोललोच नाही, असे सत्ताधारी निर्लज्जपणे सांगत आहेत. शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या आणि जमत नसेल तर खुर्च्या खाली करा, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

यासंदर्भात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात संतप्त शेतकऱ्यांनी जाब विचारला असता अजित पवारांनी दमदाटी केली, ही दादागिरी चालणार नाही. तुम्ही जनतेचे सवेक आहात मालक नाहीत, याचे भान ठेवा. कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा करता, आश्वासन देताना समितीची आठवण आली नाही का? राज्याची आर्थिक परिस्थिती दिसली नाही का? आणि सर्वात महत्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी सकारकडे निधी नाही तर, अदानी अंबानीसाठी लाखो करोडो रुपयांचा लाभ देण्यासाठी पैसा येतो कोठून? शेतकऱ्यांना व लाडक्या बहिणींना पैसे द्यायचे म्हटले की तिजोरीची आठवण येते का? असा जाब त्यांनी सरकारला विचारला आहे.

भाजपा युती सरकार हे फक्त अदानी अंबानीसाठी पायघड्या घालते, पण शेतकरी व राज्यातील भगिनींना पैसे देताना चालढकल करत आहे. सुरजागडच्या खदानीमधून मलई खाणार, समृद्धी महामार्गात भ्रष्टाचार, घोडबंदर भाईंदर बोगदा प्रकल्पात भ्रष्टाचार, पुणे रिंग रोड आणि आता अदानीच्या हितासाठी शक्तीपीठच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा मलिदा खाण्याचा उद्योग फडणवीस, अजित पवार व एकनाथ शिंदे यांचा सुरु आहे. सत्तेतून मलाई खाता आणि शेतकरी व भगिनींना देण्यासाठी पैसे कसे नाहीत? असा प्रश्न सपकाळ यांनी विचारला आहे.

राज्य सरकारची तिजोरी रिकामी असेल तर दिल्लीत जाऊन मोदी शहांकडून राज्यासाठी भरीव निधी आणा, तेवढी तरी हिम्मत दाखवा. समितीचा खेळ करू नका व तातडीने शेतकरी कर्जमाफी व लाडक्या बहिणीला 2100 रुपये द्या. शेतकरी, भगिनी व जनतेच्या संयमाचा अंत पाहू नका ते महागात पडेल, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News