गुलदस्ता- दोन प्रतिभावान कलाकार

गुलदस्ता- दोन प्रतिभावान कलाकार

>> अनिल हर्डीकर

प्रत्येक गाण्यामध्ये संगीत दिग्दर्शकाने दिलेल्या सुंदर स्वररचनेला आशा भोसले यांनी स्वतची कल्पकतापूर्वक जोड दिली आहे. त्या स्वरांच्या मालकिणीशी जेव्हा ख्यातनाम लेखिका शांता शेळके यांची भेट झाली तेव्हा तिच्या मनमोकळ्या, लाघवी, थट्टेखोर स्वभावाने शांताबाईं भारून गेल्या. या दोन प्रतिभावान कलाकारांच्या भेटीच्या प्रसन्न क्षणांचे वर्णन शांताबाईंने त्यांच्या  शैलीत सुंदररीत्या केले आहे.

आशा भोसले यांनी अनेक भारतीय भाषांमध्ये शेकडो गाणी गायल्येत, पण मराठी चित्रपट संगीताला आशाच्या गळ्याने दिलेली जोड, त्यात निर्माण केलेले सौंदर्य आणि सामर्थ्य केवळ अपूर्व म्हणावे लागेल. ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात’ किंवा ‘मामाच्या गावाला जाऊ या’सारखे अवखळ, प्रसन्न बालगीत असो, ‘कुणीतरी बोलवा दाजीबाला’ किंवा ‘बुगडी माझी सांडली गं’सारखी ढंगदार लावणी असो, ‘सहज सख्या एकदाच येई सांजवेळी‘ किंवा ‘विसरशील खास मला’ यासारखी संयत अभिरुचीची प्रणयगीते असोत, ‘पांडुरंगकांती दिव्य तेज झळकती’सारखे ज्ञानदेवांचे भक्तिगीत असो किंवा ‘का हो धरिला मजवरी राग’सारखी रागदारीने अलंकृत झालेली कोठीवरची लावणी असो, प्रत्येक गाण्यामध्ये संगीत दिग्दर्शकाने दिलेल्या सुंदर स्वररचनेला आशाने स्वतची काही कल्पकतापूर्वक जोड दिली आहे असे आपल्या प्रत्ययाला आल्यावाचून राहत नाही. आशाच्या गाण्यात विलक्षण नाटय़ असते. केवळ उच्चारित शब्दच नव्हेत, तर दोन शब्दांत तिने सोडलेली मोकळी जागादेखील अर्थगर्भ, सूचक बनते. याची असंख्य उदाहरणे तिच्या गाण्यांत दाखवता येतील. विशिष्ट ठिकाणी नुसता स्वर लांबवूनदेखील ती खूप गंमत निर्माण करते. ‘सवत’ चित्रपटासाठी शांताबाईंनी लिहिलेल्या गाण्यात ‘मी सहजच जांभई दिली’ अशी काहीतरी ओळ होती. संगीत दत्ता डावजेकर यांनी दिले होते. ‘जांभई’ हा शब्द काही मोठा सुंदर वा काव्यपूर्ण नव्हे, पण  आशाताईंनी तो उच्चारताना जांभई आल्याचा भाव इतक्या सहजपणे प्रकट केला आहे की, कुणीही चकित होऊन जावे.

माडगूळकरांची गीत रचना, सुधीर फडके यांची स्वररचना आणि आशाने त्याला दिलेली गोड गळ्याची जोड या त्रिवेणी संगमातून मराठी चित्रपटसृष्टीला अनेक रसपूर्ण गीतांचा लाभ झाला आहे. आशा लावणी फार ढंगदार रीतीने गाते. ‘मराठा तितुका मेळवावा’ या भालजींच्या चित्रपटाला लताबाईंनी ‘आनंदघन’ नावाने संगीत दिलं होतं. गाणी शांताबाईंनी  लिहिली होती. ‘रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी,  कर्नाटकी कशिदा मी काढीला, हात नका लावू माझ्या साडीला’ ही लावणी आशाने अतीव नखऱयाने गायली आहे.गाणे ध्वनिमुद्रित झाल्यावर शांताबाई त्याबद्दल कौतुकाने आशाला काही सांगू लागल्यावर आशाताई  मिश्कीलपणे त्यांना म्हणाल्या,  “अहो, मी आणखीसुद्धा  नखऱयाने गायिले असते, पण दीदीची चाल आहे ना! दीदीची मला भीती वाटते. तिचं गाणं तिच्याच मनासारखं व्हायला हवं.’’

शांताबाईंनी अनेक प्रकारची गाणी समर्थपणे लिहिली. मंगेशकर कुटुंबीय त्यांना आपल्याच कुटुंबातील सदस्य असल्यासारखा मान देत, आपुलकीने वागवत. ‘वडीलधारी माणसं’ या पुस्तकात आशाताईंशी त्यांची झालेली पहिली भेट त्यांनी वर्णन केली आहे.

एकोणीसशे अठ्ठेचाळीस किंवा एकूणपन्नास साल असेल ते. भालजी पेंढारकर यांच्या ‘स्वराज्याचा शिलेदार’ या चित्रपटासाठी गीते लिहिण्यासाठी त्या कोल्हापूरला गेल्या होत्या. गावाच्या मध्यवर्ती मोठय़ा रस्त्यावर असलेल्या ‘आराम’ हॉटेलात भालजींनी  त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती. संगीत दिग्दर्शक दत्ता डावजेकर हेही तिथेच उतरले होते. शांताबाईंची डावजेकरांशी जुनी ओळख होती. गीते गाण्यासाठी आशा भोसले येणार आहेत हे शांताबाईंना डावजेकरांकडून कळलं. डावजेकर शांताबाईंना म्हणाले, “आशाशी ओळख आहे का तुमची?’’ त्यावर शांताबाईंनी ओळख नसल्याचं सांगितलं. डावजेकर म्हणाले, “उद्या ती येणार आहे. मग होईलच तुमचा तिच्याशी परिचय. छान आहे आशा. तुम्हाला ती फार आवडेल.’’ डावजेकरांच्या तोंडून आशाजींचे वर्णन ऐकून तिला भेटण्याची शांताबाईंना उत्सुकता वाटू लागली. आशाताईंनी गायलेली काही मराठी गाणी तेव्हा नुकतीच गाजू लागली होती. वसंत प्रभू यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली आशाने ध्वनिमुद्रित केलेल्या ‘गळ्यात माझ्या तूच राजसा मंगलमणी बांधिले’सारख्या गाण्यांनी मंगेशकर घराण्याच्या सुरेल गळ्याची लखलखीत नोंद शांताबाईंच्या मनावर पूर्वीच केली होती, पण त्या स्वरांची मालकीण मात्र अद्याप शांताबाईंनी पाहिलेली नव्हती. शांताबाई आशाला बघण्यासाठी उत्सुक झाल्या. त्या तिच्या स्वभावाचा त्यांच्या मनाशी अंदाज बांधू लागल्या.

दुसऱया दिवशी आशा आणि तिचे पती भोसले हे दोघेजण कोल्हापूरला आले. योगायोगाने शांताबाईंच्या शेजारच्या खोलीत त्यांचा मुक्काम होता. दोन्ही खोल्यांमधल्या पातळ लाकडी पार्टिशनआडून आशाचे उंच सुरातले लगबग बोलणे, खळखळ हसणे सारखे कानावर येऊन शांताबाईंना खूप गंमत वाटत असे. लवकरच आशाशी ओळख झाली. पहिल्या भेटीतच तिच्या मनमोकळ्या, लाघवी, थट्टेखोर स्वभावाने शांताबाईंना तिने भारून टाकले. तिच्या प्रथम दर्शनाचं, रूपाचं वर्णन करताना त्यांनी लिहिलंय…

‘फिक्या मंद रंगाचे साधे पाचवारी पातळ, कोपऱयापर्यंतच्या बाह्यांचे पोलके, कसल्याही प्रसाधनांचा स्पर्श नसलेला गोल हसरा चेहरा, कपाळावर कुंकवाचा मोठा टिळा, दाट केसांच्या दोन घट्ट वेण्या आणि हातामध्ये खूपशा सोन्याच्या बांगडय़ा.’

दोन प्रतिभावान कलाकारांची ती भेट शांताबाईच वर्णन करू जाणोत.

z [email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसी किती तापमानावर ठेवावा? जेणेकरून सर्दी-खोकला होणार नाही अन् वीज बिलही कमी येईल एसी किती तापमानावर ठेवावा? जेणेकरून सर्दी-खोकला होणार नाही अन् वीज बिलही कमी येईल
आता जवळपास सर्वांच्याच घरी एसी असतोच. कारण उन्हाळ्यात तर एअर कंडिशनरची थंड हवा वरदानापेक्षा कमी नसते. पण काहीवेळेला सतत एसीच्या...
तुमच्या बेडरूममधून या 3 गोष्टी ताबडतोब फेकून द्या, अन्यथा रात्रीची झोप होऊ शकते खराब
कुंडमळा येथील दुर्घटना धक्कादायक तितकीच मनाला वेदना देणारी, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केल्या भावना
Pune Bridge Collapse : इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; 2 जणांचा मृत्यू, 32 जखमी, बचावकार्य सुरू
Ratnagiri Rain News – भारजा नदीला पूर, मांदिवली येथील पूल पाण्याखाली; वाहतूक थांबली
Shivaji Maharaj Statue : शिवरायांच्या पुतळ्यात भ्रष्टाचार? राजकोट किल्ल्यावरील चबुतऱ्याला भगदाड
पवित्र स्नानासाठी नदीत गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने एकाच कुटुंबातील 5 तरुण गोदावरीत बुडाले