मंत्र्यांच्या चेहऱ्यावर दु:खाचा लवलेशही नाही, मृत्युच्या ढिगाऱ्यावर उभे राहून रील बनवत बसले; संजय राऊत कडाडले
ड्रीमलायनरच्या अपघातानंतर लोकांच्या मनामध्ये भीती आहे. सरकारने नागरी विमान वाहतूक क्षेत्र गांभीर्याने घेतले नाही. काल मंत्री मृत्युच्या ढिगाऱ्यावर उभे राहून ज्या पद्धतीने वागत होते त्याला रील बनवणे म्हणतात. त्यांच्या कुणाच्याही चेहऱ्यावर दु:खाचा लवलेशही नव्हता. आम्ही अजूनही अस्वस्थ आहोत. महाराष्ट्रातील 20 च्या आसपास मरण पावले. आम्हाला 300 लोकांच्या मरणाचे दु:ख आहे. पण सरकारला फार मोठा धक्का बसला किंवा सरकारच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या असे तरी या क्षणी दिसत नाही, असा जोरदार हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
एअर इंडियाचे AI171 हे विमान अहमदाबादमध्ये कोसळून 290 जणांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. याचे व्हिडीओ त्यांनी म्यूझीक लावून शेअर केले. यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. संजय राऊत यांनीही याचा समाचार घेतला.
अहमदाबाद विमानतळ हा अपघाताचा केंद्रबिदू आहे. अहमदाबादलाच हा अपघात का होऊ शकला यासह असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. मेडिकल इमारतीवर विमान कोसळून तिथेही डॉक्टर, विद्यार्थी मरण पावले. इमारतीच्या आसपास छोटे दुकानदार, स्टॉल होते तिथेही मुलं मरण पावली. हे सहज विसरता येणार नाही. पहलगाममध्ये ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याच पद्धतीचा हा अपघात आहे, असे राऊत म्हणाले.
मोदी आणि अपघातग्रस्त विमान, 32 कॅमेरे 8 अँगल; फोटोसेशनवर सोशल मीडियात टीका
या अपघातातून सरकार काय धडा घेणार आहे का. हवाई क्षेत्रामध्ये सर्वात जास्त सतर्क असायला हवे. सरकारला एअर इंडियाचे खासगीकरण करून जबाबदारी झटकता येणार नाही. रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाला एअर इंडिया संदर्भात गांभीर्य आहे की नाही असा प्रश्न गेला वर्षभर अनेकांना पडला आहे. विमानांची दुरुस्ती, विमानांमधील सेवा अशा अनेक गोष्टींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे, असेही राऊत म्हणाले.
जगभरातील विमान वाहतूक क्षेत्राला कोडं पडलंय की एकाचवेळी दोन इंजिन बंद पडली कशी? – संजय राऊत
हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये उद्योगपतींची स्पर्धा सुरू आहे. कुणी कोणते एअरपोर्ट घ्यायचे आणि कुणी कोणती विमान कंपनी खरेदी करायची. या क्षेत्रावर कब्जा मिळवण्याचा जो घाणेरडा प्रयत्न सुरू आहे त्याचीसुद्धा प्रवाशांना भीती वाटू लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात झालेल्या व्यवहारांची श्वेतपत्रिका काढण्याची विरोधकांची मागणी योग्य आहे, असेही ते म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List