सातारा शहरासह जिल्ह्यात तापाच्या रुग्णांची संख्या वाढली; रोज 300 रुग्ण घेत आहेत उपचार
सातारा जिल्हा शासकीय रुग्णालयासह शहरातील प्रमुख खासगी रुग्णालयांत घशात खरखर, ताप, अंगदुखी तसेच पंधरा दिवस कोरडा खोकला असलेल्यांची संख्या वाढली आहे. लोकांमध्ये कोरोना परत आला की काय, अशी धास्ती आहे. 15 दिकसांपासून खोकला काही जात नाही, अशी तक्रार करत रोज 300 रुग्ण उपचार घेत आहेत.
सध्या ऊन-पावसाचा खेळ सुरू आहे. त्यामुळे अनेकजण आजारी पडले आहेत. कोणाच्या घशात खरखर होतेय, तर कोणाला ताप, थंडी, जुलाब असाही त्रास होऊ लागला आहे. त्यातच कोरोनाने पुन्हा शिरकाव केल्याने नागरिकांनी धास्ती घेतली आहे. पंधरा दिवसांपासून खोकला जात नाही, म्हटल्यावर कोरोनाची लागण झाली, असा समज अनेकजण करत आहेत. परंतु वास्तविक हा वातावरणातील बदल असल्याचे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची धास्ती घेऊ नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अनेक लोक सध्या अंगदुखी तसेच घसादुखीने हैराण झाले आहेत. हे लोक शासकीय रुग्णालयासह जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होत आहेत. रोज किमान 300 ते 400 रुग्ण अशाप्रकारची लक्षणे सांगत आहेत. ताप, खोकला, घसादुखी अशी लक्षणे असल्यास तज्ञांचा सल्ला घ्या. केवळ मेडिकलमधून गोळ्या आणून खाऊ नका, त्याचे उलट परिणाम होतात. केवळ वातावरणाचा बदल आहे, असे समजून दुर्लक्ष करू नका, वेळ पडल्यास कोविड टेस्टसुद्धा करावी. जेणेकरून कोरोनाची लागण असेल तर वेळीच उपचार होऊ शकतात. त्यामुळे निष्काळजीपणा करू नका, असे आवाहनही तज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.
कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यास तातडीने उपचार घ्यावेत. सध्या वातावरणातील बदलांमुळे अनेक लोक आजारी पडत आहेत. कोरोनाची धास्ती घेऊ नये.
– डॉ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List