Chandrapur News: पाऊस रुसला! दुबार पेरणीचे संकट; शेतकरी कर्जाच्या फेऱ्यात अडकणार, पिके वाचविण्यासाठी धडपड
>> अभिषेक भटपल्लीवार, चंद्रपूर
महाराष्ट्रातील कोकण किनार पट्टी, मुंबई, नाशिक, पुणे, नगर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली असली तरी विदर्भाकडे विशेष करून चंद्रपुरात पावसाने दडी मारल्याने शेतकरी बांधव संकटात सापडला आहे.
जून महिना शेवटच्या टप्प्यावर आला तरीही चंद्रपूर जिल्ह्यात हवा तसा पाऊस झालेला नाही. अनेक शेतकऱ्यांनी कापसाची धूळ पेरणी केली. तुरळक पावसाने कोंब बाहेर आलेत. अशातच पावसाने अचानक दडी मारल्याने कोवळे कोंब करपत आहेत. पावसाच्या प्रतीक्षेत थकलेला बळी राजा आता देवाकडे साकडे घालीत आहे. शेतकरी मोटर पंपाद्वारे पाणी करून पीक वाचवण्यासाठी धडपड करत असल्याचे चित्र चंद्रपूर जिल्हात दिसत आहे.
आणखी काही दिवस पाऊस आला नाही तर दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. खरीप हंगामातील मशागत पूर्ण करून शेतकऱ्याचे डोळे आता चातकाप्रमाणे आभाळाकडे लागले आहेत. पुरेसा पाऊस न आल्याने चिंतातूर शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. धानाच्या शेतीसाठी मुबलक पाण्याची आवश्यकता आहे. बऱ्याच धान उत्पादक शेतकऱ्यांनी अद्याप परे (रोप) टाकले नाही. पुरेसा पाऊस आला नाही तर अंकुर करपून जाईल, याची भीती आहे. त्यामुळे मशागत पूर्ण करून पावसाची वाट पाहत आहेत. मात्र, कापूस व सोयाबीन लागवडीचे वेळापत्रक पावसाने बिघडवले.
अनेक शेतकरी अजूनही लागवडीचा खर्च जुळवण्यासाठी धावाधाव करीत आहेत. त्यातच पावसाने दडी मारल्याने यंदाच्या शेतीचे काय होणार, याबाबत शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत.
शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली, पण पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आली असून तो पुन्हा कर्जात अडकण्याची शक्यता आहे. स्प्रिंकल लावून पीक वाचवण्याचा प्रयत्न सुरू असले तरी पुरेसे नाही. हे मोठं आर्थिक संकट असल्याचे शेतकरी रवी बल्की म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List