बसस्थानकांचे मोठ्या थाटात उद्घाटन केल्यानंतर निकृष्ट कामाची चौकशी, धाराशिवच्या पालकमंत्र्यांचा उफराटा ‘प्रताप’
धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 मे रोजी धाराशिव आणि तुळजापूर बसस्थानकांचे मोठ्या थाटात उद्घाटन केले आणि आता याच बसस्थानकांच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. उद्घाटन करताना पालकमंत्र्यांना अर्धवट काम तसेच निकृष्ट दर्जा दिसला नाही का, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहणासाठी आलेले पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते धाराशिव आणि तुळजापूर बसस्थानकांचे अत्यंत घाईघाईत उद्घाटन उरकण्यात आले. उद्घाटनापूर्वी काम पूर्ण झाले आहे का? कामाचा दर्जा चांगला आहे का? याची तपासणीही करण्यात आली नाही. केवळ कामाचे श्रेय घेण्यासाठी उद्घाटन करून घेण्यात आले. पहिल्याच पावसात धाराशिवच्या नव्या बसस्थानकाला गळती लागली. बसस्थानक परिसरातील क्राँक्रिटचे काम अजूनही झालेले नाही, त्यामुळे प्रवाशांना बसपर्यंत जाण्यासाठी चिखलातून वाट काढावी लागते. गुत्तेदाराने 10 कोटींचा अक्षरश: चिखल केला. माध्यमांनी या कामावरून आता टीकेची झोड उठवली.
पालकमंत्री प्रताप सरनाईक हे काल धाराशिव दौर्यावर आले होते. यावेळी पत्रकारांनी त्यांच्यावर धाराशिव तसेच तुळजापूर बसस्थानकांच्या निकृष्ट कामाबद्दल प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर सरनाईक यांनी बसस्थानकांच्या कामाबद्दल बर्याच तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊनच दोन्ही बसस्थानकांच्या बांधकामाची चौकशी करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले असल्याचे सांगितले. मीच या दोन्ही बसस्थानकांचे उद्घाटन केले, पण नंतर चौकशी केली असता काम अर्धवटच असल्याचे स्पष्ट झाले. घाईघाईत उद्घाटन करण्यास प्रवृत्त करणार्या अधिकार्यांचीही चौकशी केली जाईल, अशी सारवासारवही सरनाईक यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List